बुधवार, 11 सितंबर 2013

सर्वच पक्षांना 'मनसे'ची डोकेदुखी

 बुधवार, 11 सप्टेंबर 2013 - 04:00 AM IST

कणकवली - आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रभावी विरोधी पक्ष म्हणून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवेश जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. या निवडणुका आघाडी विरुद्ध महायुती अशा लढल्या जातील हे जवळपास निश्‍चित असले तरी या मतदारसंघामध्ये मनसेचा संभाव्य प्रवेश मतविभाजनाचे कारण ठरणार आहे. अर्थात पक्षाध्यक्ष राज ठाकरे ऐनवेळी काय निर्णय घेतील यावरच सर्व चित्र अवलंबून राहील.

राज्यात मनसेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. महायुतीने साद घालून राज ठाकरेंना जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवेल हे जवळपास निश्‍चित आहे. याची तयारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरा काढून सुरू केली आहे. कोकणातील खेडमधील त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र सिंधुदुर्गात राज ठाकरेंनी मोठी जाहीर सभा घेण्याचे टाळले.
मनसे स्थापनेपासून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजन दाभोळकर यांनी पार पाडली. त्या काळापासूनच पक्षाचे वेगळे अस्तित्व त्यांनी टिकवले. अलीकडेच माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. श्री. उपरकर हे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यात मनसेची ताकद निश्‍चितच वाढली. पक्षाच्या वाढीसाठी श्री. उपरकर यांनी वेगवेगळे उपक्रम आणि आंदोलने हाती घेतली. त्याचा थेट परिणाम शिवसेना-भाजप युतीवर होऊ लागला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. श्री. उपरकर यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाची जबाबदारी विभागून देण्यात आली. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद श्री. दाभोळकर यांच्याबरोबर शैलेश भोगले यांच्याकडे विभागून देण्यात आले. त्यानंतर तालुकानिहाय आणि गाववार पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या. एकूणच गेल्या काही महिन्यांत मनसेने जिल्ह्यात संघटना वाढविण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर पक्षाने आपली भूमिका वेगळेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला. परिणामी पक्षाचा वेंगुर्ले नगर परिषदेत एक नगरसेवक निवडून आला. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये मनसेने उमेदवार उतरवून पक्षाचे चिन्ह घरोघरी पोचविण्याचा प्रयत्न केला. मनसेकडे जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी नसली तरी राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव येथील मतदारांवर पडतो. याचबरोबर मुंबईतील मनसेचे निम्म्याहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. या सर्व ताकदीचा वापर करून मनसे येत्या निवडणुकीत थेटपणे स्वतंत्र लढण्याची तयारी करेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. याचे कारण या खेपेस जरी मनसे सत्तेच्या आसपास पोचू शकली नसली तरी सत्तेची चावी मनसेच्या हातात राहील, अशी सध्या राजकीय स्थिती आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पायाभरणी करण्यासाठी मनसे निश्‍चितच प्रयत्नशील राहील.

लोकसभेसाठी मनसेने उमेदवार उतरविल्यास याचा परिणाम महायुतीच्या उमेदवारावर होईल. परंतु याचबरोबर आघाडीला याचे चटके बसतील. चिपळूणपासून बांद्यापर्यंत विस्तारलेल्या या मतदारसंघात मनसेच्या मराठीसारख्या मुद्द्यावर विचारधारा असणारे मतदार निश्‍चितच आहेत. याचा कितपत फायदा होईल हेही निश्‍चित होणार आहे. एकूण सात विधानसभा मतदारसंघ जोडलेल्या या लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पाठबळाचे चित्रही स्पष्ट होईल. त्यानंतरच मनसेला जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद आजमावावी लागेल. हे करत असताना श्री. उपरकर वगळता मनसेकडे स्थानिक पातळीवर प्रभावी उमेदवार नाही. त्यामुळे मुंबईहून उमेदवार आयात करण्याची पाळी मनसेवर येणार आहे. परंतु अद्याप तरी पक्षाने निवडणूक लढण्याची तशी तयारी केलेली नाही. पण ऐन वेळी राज्यात निर्माण होणारे प्रश्‍न आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून मनसे स्वतंत्रपणे विचार करून निवडणुकीला सामोरे जाऊ शकते. तशी चाचपणी वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. एखादा आर्थिक सक्षम कार्यकर्ता शोधला जात आहे. मधल्या कालावधीत अशा पद्धतीने काही कार्यकर्ते उतरविण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला म्हणावे तसे यश आले नाही. परंतु अलीकडच्या काही महिन्यांत मनसेने गावागावात पोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पारंपरिक पक्षाच्या विचारधारेला कंटाळलेला तरुण वर्ग मनसेच्या जाळ्यात अडकला जात आहे. याचा फायदा पक्षाला कितपत होईल हे निवडणुकीला सामोरे गेल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

'सिंधुदुर्गात मनसे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते पक्षाकडे येत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही पुऱ्या करत आहोत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. विरोधी पक्ष म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रश्‍न आम्ही रस्त्यावर उतरून सोडवत आहोत. त्यामुळे पक्षाकडे तरुण, महिला कायकर्त्यांची संख्या वाढत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मनसे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत.''
- परशुराम उपरकर, मनसे नेते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें