सोमवार, 27 जनवरी 2014

राज्यात 'मनसे'ची 'टोल'धाड

मंगळवार, 28 जानेवारी 2014
मुंबई - 'टोल वसुलीचे कारण समजल्याशिवाय राज्यातील एकाही नाक्‍यावर टोल भरायचा नाही. टोल मागण्यासाठी कोणी आडवे आले, तर तुडवून काढा,'' असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर त्याचे पडसाद कालपासूनच राज्याच्या विविध भागांत उमटले. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या टोलनाक्‍यांवर "मनसे'च्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्‍यांवर तोडफोड केली.

'मनसे'च्या कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाक्‍यावर आंदोलन करून तेथील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे बराच वेळ दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती. दहिसरमध्ये मनसेचे नेते प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे आणि संजय घाडी यांनी टोलनाक्‍याविरोधात आंदोलन केले. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले.

मनसेच्या नवी मुंबई शाखेच्या वतीने रविवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्या वेळी बोलताना ठाकरे यांनी टोलविरोध भूमिका मांडली होती. महाराष्ट्रात टोलच्या नावाखाली दररोज लाखो रुपयांची लूट सुरू आहे. ती त्वरित थांबली पाहिजे; अन्यथा टोल नाके तोडल्याशिवाय मनसेचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, असा इशारा ठाकरे यांनी दिला होता.

नवी मुंबई, पुणे, सांगली, बीड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथेही तीव्र आंदोलने करण्यात आली. कॉंग्रेसने मात्र टोल रद्द करता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

नवी मुंबई, मुंबई एरोली, वाशी, मुलुंड, दहिसर येथे टोलबूथ व केबिनचे नुकसान. "मी टोल भरणार नाही', अशा आशयाचे स्टीकर गाड्यांवर चिकटविले. प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे, संजय घाडी आदी नेत्यांना अटक. 50हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे.

खालापूर (द्रुतगती महामार्ग, रायगड) वाहतूक रोखून धरली. पुणे आणि मुंबई दोन्ही बाजूंकडून वाहनांच्या रांगा

पुणे चांडोली (पुणे-नाशिक मार्ग), उर्से, शेवाळेवाडी (लोणी काळभोर), चांदणी चौक, आंबेगाव येथे आंदोलन. चांडोलीला पोलिस निरीक्षकाच्या डोळ्यात काच घुसली. जांभूळवाडी नवीन बाह्यवळण महामार्गालगत रिलायन्स कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड. मांजरीला पोलिस बंदोबस्त असतानाही नाका फोडला. महिला कार्यकर्त्यांना अटक.

सांगलीवाडी (सांगली) टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्‍याच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. डिजिटल फलक फोडले. 25 जणांविरुद्ध गुन्हा.

मराठवाडा मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांतील टोलनाक्‍यांची रविवारी रात्री आणि सोमवारी तोडफोड केली. औरंगाबाद-नगर मार्गावरील वाळूजजवळील (औरंगाबाद) टोलनाक्‍यावर कडक पोलिस बंदोबस्तामुळे तोडफोडीचा प्रयत्न फसला.

विदर्भ नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, भंडारा आणि बुलडाणा जिल्ह्यांतील एकूण 10 टोलनाक्‍यांवर "मनसे' आंदोलन. पैकी नागपूर जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन, तर वर्धा जिल्ह्यातील एका टोलनाक्‍याची तोडफोड करण्यात आली. उमरेड रोडवरील टोलनाक्‍याची मुदत संपली असतानाही अनेक वर्षांपासून अवैध वसुली केली जात आहे. कालांतराने टोलचे दर कमी केले जातात. मात्र, येथे दर वाढवण्यात आले आहेत.

राज्यात पंधरा वर्षांपासून टोलचे धोरण आहे. त्याचा त्रास होत असेल, तर ते दूर कसे करता येईल, यावर विचार होऊ शकतो. परंतु, टोल भरू नका. मोडतोड करा, असे कोणी सांगत असेल, तर तपासणी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. "टोल फ्री' रस्त्यांचा यापूर्वी विचार झाला आहे. परंतु त्यासाठी येणारा बोजा पाहिला, तर सर्व विकासकामे बंद करावी लागतील. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा देता येईल, का या दृष्टीने विचार सुरू आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्याची महत्त्वाची कामे खासगी संस्थांकडून केली जातात. यासाठी "टोल' द्यावा लागतो. जो चारचाकी गाडी घेऊ शकतो, तो टोलही भरू शकतो. गुजरातमधील रस्तेदेखील "टोल फ्री' नाहीत.
- छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री, 

संगमनेर बाह्यवळण रस्त्याच्या उद्‌घाटनावेळी अशा प्रकारची तोडफोड करण्याला राजकारणात स्थान नाही. टोल आकारणीबद्दलचे आक्षेप दूर करण्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत.
- मुकुल वासनिक, कॉंग्रेसचे प्रवक्ते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें