रविवार, 9 फ़रवरी 2014

हिंमत असेल तर अटक करून दाखवा : राज ठाकरे

पुणे- "राज्यातील खोटे टोल नाके बंद होत नाहीत आणि जोपर्यंत सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत टोल नाक्‍यांविरोधातील आंदोलन सुरूच राहणार,'' अशी टोलविरोधी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करून ""येत्या बुधवारी (ता. 12) संपूर्ण राज्यभर टोलच्या विरोधात "रस्ता रोखो' आंदोलन पक्षाच्या वतीने करण्यात येईल. हिंमत असेल तर अडवून दाखवा आणि मला अटक करून दाखवा,'' असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मनसेच्या जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, माजी आमदार दीपक पायगुडे आदी उपस्थित होते. आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आलेलो नाही, तर त्याच नारळाने सरकारचे टाळके फोडण्यासाठी आलो आहे, असे सांगून ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यातील आघाडी सरकारबरोबरच शिवसेनेवरही टीका केली.

टोल नाक्‍यांच्या माध्यमातून चालणाऱ्या "झोल' दर्शविण्यासाठी ठाकरे यांनी सभेच्या ठिकाणी माहिती अधिकारात मागविलेली कागदपत्रे सादर करून आपण हाती घेतलेले आंदोलन योग्य असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तर "टोलबद्दल बोलणारे राज ठाकरे आता गप्प का झाले,' असे विचारणाऱ्यांना "मला विकत घेणारा अजून पैदा व्हायचाय,' असे उत्तर दिले.

मी इतका अव्यवहार्य नाही, राज्य सरकार चालविण्यासाठी पैसे लागतात, हे मलादेखील माहिती आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""मोडतोड नको म्हणून टोल नाक्‍यांबद्दल मुख्यमंत्र्यांकडे गेलो, तर ते म्हणाले आघाडीचे सरकार आहे, माझे हात बांधले आहेत. न्यायालयात गेलो, तर तारीख पे तारीख. सगळ्या मार्गाने प्रयत्न केले. माझ्या पूर्वीही ज्यांनी न्यायालयात टोलविरोधी दावे दाखल केले आहेत. ते दावे सुनावणीसाठी अजूनही उभे राहिले नाहीत. टोल नाक्‍यांवर जो पैसा गोळा होतो, तो जातो कुठे हेदेखील विचारायचे नाही. ते जर मंत्र्यांच्या घरात जात असतील, तर आम्ही टोल भरणार नाही. रोज जाणाऱ्या-येणाऱ्यांनी निवडणुकीचा फंड यांना द्यायचा का?''

भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील टोल नाके आधी बंद करा, या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आरोपाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ""कर्नाटक आणि गुजरात राज्यातील टोल नाक्‍यांना मी भेट दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमानुसार तेथे टोलची वसुली होते. टोलची रक्कमही कमी आहे. सुविधादेखील तेवढ्या देतात. ती पारदर्शकता महाराष्ट्रात नाही. केंद्राच्या नियमानुसार 80 किलोमीटरनंतर टोलनाका असला पाहिजे.
महाराष्ट्रात तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरच टोल नाके आहेत. महाराष्ट्रात रस्त्यांसाठी 13 प्रकारचे कर आपण भरतो. त्यातील एकट्या मोटार वाहनकरातून गेल्या अकरा वर्षांत 22 हजार 266 कोटी महसूल राज्याला मिळाले. असे असताना
14 वा टोलचा कर कशाला.''

पोलिसांचा समाचार घेऊन ठाकरे म्हणाले, "मंत्री आणि पोलिसांच्या गाड्यांवरील लाल-पिवळे दिवे कोणत्याही दुकानात मिळतात. त्यातून गुन्हे घडले तर काय करणार. त्यासाठी राज्य सरकार खमके पाहिजे.'

शिवसेनेवरही टीका
सरकारच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध मी राज्य सरकारविरोधात लढत असताना शिवसेना मात्र माझ्यावर टीका करीत आहे. ते सरकारच्या विरोधात आहेत की सत्ताधारी. ही परिस्थिती पाहून गरगरायला होते, अशी टीकाही राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. एकीकडे शिवसेनेवर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही.

राज ठाकरे उवाच...
मला विकत घेणारा पैदा व्हायचाय
मुख्यमंत्री म्हणतात, माझे हात बांधलेत
मुख्यमंत्री म्हणजे बिनपगडीचे मनमोहनसिंग
कोर्टात टोलबाबत "तारीख पे तारीख'
टोलचा पैसा मंत्र्यांच्या घरात जातो
केवळ रस्त्यांसाठी आपण 13 कर भरतो
मोटारवाहन करातून 22,266 कोटींची कमाई
टोलच्या नावाखाली तुमची फक्त फसवणूक
महाराष्ट्रात साधी बाथरूमचीही सोय नाही
सुप्रिया सुळेंनी सांगितलंय, मंत्र्यांच्या गाड्या फोडा. ठीक आहे उद्यापासून "चुन-चुन के मारूंगा'

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें