मंगलवार, 4 मार्च 2014

लोकसभा निवडणूक नऊ टप्प्यांत;16 मेला निकाल

नवी दिल्ली - बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज (बुधवार) मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी केली. देशभरात नऊ टप्प्यांत मतदान होणार असून, 16 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेबरोबरच सरकार आणि राजकीय पक्षांसाठी निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

व्ही. एस. संपत पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना म्हणाले, की लोकसभा निवडणुकांबरोबरच विभाजन झालेल्या तेलंगण व सीमांध्र, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांत मतदान होणार आहे. या तिन्ही विधानसभांचे निकालही 16 मे रोजीच लागणार आहेत. देशभरात सात एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान होणार आहे.

या आधीची, म्हणजे 2009ची लोकसभा निवडणूक 16 एप्रिल-13 मे या काळात व पाच टप्प्यांत झाली होती. विद्यमान लोकसभेचा कालावधी एक जूनला संपत असल्यामुळे 31 मेपर्यंत नवे सभागृह अस्तित्वात येणार आहे.

निवडणुकांची वैशिष्ट्ये -
  • लोकसभा निवडणुका नऊ टप्प्यांत होणार
  • सात एप्रिल ते 12 मे दरम्यान देशभरात मतदान होणार
  • पहिला टप्पा 7 एप्रिल, दुसरा 9 एप्रिल, तिसरा 10 एप्रिल, चौथा 12 एप्रिल, पाचवा 17 एप्रिल, सहावा 24 एप्रिल, सातवा 30 एप्रिल, आठवा 7 मे आणि नववा 12 मे 
  • 16 मे रोजी मतमोजणी होणार
  • 10, 17, 24 एप्रिलला तीन टप्प्यांत महाराष्ट्रात मतदान होणार
  • आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओरिसामध्ये विधानसभा निवडणुका होणार
  • निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली माहिती
  • लोकसभा निवडणुकांच्या तारखा ठरविताना परीक्षा, हवामानाचा विचार
  • विभाजनानंतर आंध्र प्रदेशात प्रथमच निवडणुका होणार
  • यंदाच्या निवडणुकीत देशातील 81.4 कोटी मतदार मतदान करणार
  • 31 मे पूर्वी 16 वी लोकसभा स्थापन होणार
  • गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 कोटी मतदार वाढले
  • मतदानासाठी 9 लाख मतदान केंद्रांची उभारणी
  • आजपासून आचारसंहिता लागू
  • गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदार केंद्रांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली
  • लोकसभा निवडणुकीत नकारात्मक मतदानाचा वापर होणार
  • मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 9 मार्चला राबविण्यात येणार विशेष मोहिम
  • उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें