सोमवार, 31 मार्च 2014

शिवसेनेला औकात दाखवतोच - राज ठाकरे

पुणे - 'लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्या महायुतीमध्ये घ्यायचे होते, तर चर्चा पसरविण्यापेक्षा मला थेट फोन करायचा होता. पण, शिवसेनेला मला युतीमध्ये घ्यायचेच नव्हते. माझी औकात काय, असे विचारणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत माझी औकात दाखवूनच देतो,'' असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत शिवसेनेला सोमवारी थेट आव्हान दिले. पंतप्रधानपदासाठी भाजपचे नरेंद्र मोदी यांनाच "मनसे' पाठिंबा देणार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

लोकसभा निवडणुकीतील "मनसे'च्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ राज ठाकरे यांनी फोडला. येथील नदीपात्रात सायंकाळी झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. या प्रसंगी "मनसे'चे सर्व उमेदवार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज-गडकरी भेट, तर शिवसेना आणि दै."सामना'तून त्यावर झालेली टीका, यावर राज ठाकरे यांनी भर देतानाच उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर प्रखर टीका केली. एकीकडे मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष करतानाच दुसरीकडे मात्र नितीन गडकरी यांची पाठराखण केली. "त्यांच्या पोटात एक आणि ओठात असा हा माणूस नाही. तो एक चांगला माणूस आहे, आजही माझे त्यांच्याबद्दल हेच मत आहे,' असे स्पष्ट करून ठाकरे यांनी गडकरींशी मैत्री असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसविरुद्ध लढण्याऐवजी "मनसे'च्या अंगावर येण्याचे कारण काय, असा प्रश्‍नही ठाकरे यांनी उपस्थित केला. कोणाला मदत व्हावी म्हणून नाही, तर विजयी होण्यासाठी, दिल्लीत मराठी माणसाचा आवाज काढणारे कोणीतरी असावे, यासाठीही उमेदवार उभे केले आहेत, असा दावाही राज यांनी केला.

ठाकरे म्हणाले, 'लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा प्रस्ताव गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या "सामना'तूनही त्याबाबत भाष्य प्रसिद्ध झाले होते. शिवसेनेने हात पुढे केला असून, "मनसे'ने टाळी द्यायला हवी, असे त्यात म्हटले होते. पण खरोखरच मनसेला बरोबर घ्यायचे होते, तर एक फोन तरी करायचा होता. सगळी चर्चा वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनच. महायुतीमध्ये मनसेला घेण्यास शिवसेनेचा नकार होता. शिवसेनेला फक्त आम्ही किती उदार आहोत, हेच दाखवायचे होते. शिवसेनेचा विरोध होता, असे भाजपचे नेते सांगत होते. याबाबत खरे-खोटे करायचे असेल, तर केव्हाही समोर येण्यास मी तयार आहे.''

मुंबई महापालिका ताब्यात असूनही शिवसेनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारता येत नाही. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ जाते, ही शिवसैनिकांशी प्रतारणा नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, ""पाहिजे तेव्हा वापरायचे, पाहिजे तेव्हा भेटायचे असे उद्योग यांचे.''

भारती विद्यापीठाकडून डोनेशन परत घ्या कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. विश्‍वजित कदम यांच्यावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. या देशाला कॉंग्रेसने आजपर्यंत लुटले. त्यामुळे निवडणुका हाच त्यांना लुटण्याचा एक मार्ग आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""भारती विद्यापीठात प्रत्येक प्रवेशासाठी डोनेशन घेतले जाते. ज्यांनी ज्यांनी डोनेशन दिले त्यांनी आता भारती विद्यापीठात जाऊन डोनेशन परत मागावे. त्यांना ते लगेचच मिळेल. प्रवेशापोटी कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या भारती विद्यापीठाकडून आता निवडणुकीत मतदारांना पैसे मिळणार आहेत. ते जरूर घ्या, पण "मनसे'लाच मत द्या,''

पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोंदी यांनाच पाठिंबा देतील, असे राज ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेसह भाजपमध्येही खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजपने आयोगाकडेही तक्रार केली. त्यावर राज यांनी या पुढेही "मोदी अजेंडा' राहणार असल्याचे सूचित केले. ठाकरे म्हणाले, ""या देशाला सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. असे नेतृत्व मोदी देऊ शकतात. म्हणूनच त्यांना पाठिंबा देऊ केला आहे.'' काही गोष्टी त्यांच्या मला पटल्या नाहीत. त्यामुळे मध्यंतरी मी त्यांच्यावर बोललो. परंतु ती टीका नव्हती. तर तो मैत्रीचा सल्ला होता, असेही खुलासा ठाकरे यांनी केला.

'बाळासाहेबांना आणि शिवसेनेला सोडून का गेला म्हणून मला विचारता. परंतु मला पक्ष सोडण्याची वेळ या नालायकांच्या गोतवळ्यामुळेच आली. बरे झाले शिवसेना सोडली, आता असे वाटते.''
- राज ठाकरे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें