शनिवार, 1 नवंबर 2014

मनसेच्या पराभवामागे मोठे कारस्थान- राज

राज ठाकरे; टोल वसुलीसाठी "कॅशलेस‘ व्यवहाराची मागणी कायम
नगर - ‘विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदरी पडलेल्या अपयशाचा सध्या खोलात जाऊन विचार सुरू आहे. पराभवाचे बहुतांशी विश्‍लेषण झाले आहे. त्यात पक्षाचा, पदाधिकाऱ्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा काहीच संबंध नाही. त्यामागे मोठे कट-कारस्थान आहे. राज्याचा दौरा पूर्ण झाल्यानंतर त्याबद्दल सविस्तर बोलू,‘‘ असे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितले.

नगर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की राज्यातील टोल बंदच करा, अशी आमची मागणी कधीच नव्हती. राज्यातील अनेक रस्त्यांची कामे "बीओटी‘ तत्त्वावर झाली. त्यांच्या पैशाच्या वसुलीसाठी टोल नाके सुरू करण्यात आले. करारानुसार वसुली झाली असेल, ते नाके बंद करावेत, ही आमची भूमिका होती.‘‘

रस्त्यांवरून जाणारी वाहने किती, त्यातून ठेकेदाराला किती पैसे मिळतात, याचा हिशेब होत नाही. या संदर्भात सरकारकडे निश्‍चित अशी आकडेवारी नाही. म्हणून कॅशलेस व्यवहाराची पद्धत सुरू करण्याची मागणी आम्ही केली, असे सांगून राज म्हणाले, ‘कॅशलेस व्यवहार झाला, तर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची, त्यापोटी वसूल झालेल्या कराची निश्‍चित आकडेवारी हातात मिळेल. त्यातून करवसुलीस किती दिवस परवानगी द्यायची, हे नक्की करता येईल, ही आमची भूमिका आजही कायम आहे. त्यासाठी जगातील कोणत्याही देशाची कार्यपद्धती राज्य सरकारने स्वीकारावी. ‘‘

फोनवरून दिल्या शुभेच्छा!
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यासू व चांगल्या स्वभावाचे आहेत. त्यांच्या नवीन सरकारला फोनवरून शुभेच्छा दिल्याच आहेत, असे सांगून राज म्हणाले, ‘वीस मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहूनच शुभेच्छा देता येतात का? त्याचे राजकीय भांडवल करू नका. मी सरकारचे फोन करून अभिनंदन केले आहे.‘

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें