शनिवार, 27 जून 2015

बसवलेला नव्हे बसलेला मुख्यमंत्री हवा - राज

मालवण - सीआरझेडची भीती केवळ महाराष्ट्रातच आहे. अन्य राज्ये सीआरझेडचा विचार करत नाहीत. त्यामुळे बसविलेला मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही तर यासाठी स्वत: बसलेला मुख्यमंत्री असायला हवा, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे लगावला.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सायंकाळी भरड भागात तालुका मनसेतर्फे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. या वेळी परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख शैलेश भोगले, अमित इंभ्रामपूरकर, नारायण कुबल, गणेश वाईरकर यांच्यासह मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, ‘कोकणचा पर्यटन विकास करण्यासाठी प्रथम येथे अँकर प्रोजेक्‍ट यायला हवेत. जोपर्यत सेव्हन स्टार, फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेल्स होत नाहीत; तोपर्यत येथील पर्यटनाचा विकास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार नाही. येथे येणाऱ्या देशी, विदेशी पर्यटकांची राहण्याची व्यवस्था नसेल तर पर्यटक येथे येणार कसे आणि येथील पर्यटन विकास होणार कसा?‘‘
मुख्यमंत्र्यांनी वायंगणी माळरानावर सी-वर्ल्ड प्रकल्प होणार, असे सांगितले आहे. यावर ते म्हणाले, ‘त्यांनी हा प्रकल्प कधी होणार हे सांगितले नाही. प्रत्यक्षात या प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्‍वासात घेतले गेलेले नाही. कोणत्याही गोष्टीत पारदर्शकता नसेल तर स्थानिक लोकांचा विरोध हा होणारच. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत आपण स्थानिकांच्याच बाजूने राहू. मुख्यमंत्र्यांना येथील पर्यटन विकासाचे कोणतेही सोयरसुतक नाही त्यांचे लक्ष केवळ विदर्भाकडे आहे.‘‘
या भागात पर्यटन विकासात सीआरझेडचा प्रश्‍न भेडसावत आहे, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘सीआरझेडची भीती ही केवळ महाराष्ट्रातच आहे; अन्य राज्ये सीआरझेडला विचारत नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकामे केली आहेत. त्या राज्याचे राज्यकर्ते हे आपल्या माणसांचा विचार करतात. मात्र हे आपल्या राज्यात दिसून येत नाही. बसविलेला मुख्यमंत्री असेल तर तो यावर निर्णय घेऊ शकत नाही तर यासाठी स्वत: बसलेला मुख्यमंत्री हवा.‘‘
पारंपारिक, पर्ससीननेट यांच्यातील वादासंदर्भात ते म्हणाले, ‘हा वाद गेली काही वर्षे सुरू आहे. सरकार बदलेले मात्र, हा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. महाराष्ट्र हे माझे क्षेत्र आहे. मात्र, जोपर्यत राज्य माझ्या हातात येत नाही तोपर्यत मी काही करू शकत नाही. माझ्या ताब्यात राज्य असते तर परराज्यातील पर्ससीननेटधारकांची सागरी हद्दीत घुसण्याची हिंमत झाली नसती.‘

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें