सोमवार, 2 नवंबर 2015

कल्याणमध्ये फसला मनसेचा 'नाशिक पॅटर्न'

नाशिक : ‘गेल्या पावणे चार वर्षापासून सत्ता असलेल्या मनसेने नाशिकमध्ये काय केले,‘ याचे प्रेझेंटेशन सादर करीत राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता देण्याचे आवाहन करीत जाहीर सभेतून टाळ्या मिळविल्या असल्या तरी त्या टाळ्यांचे रुपांतर मतांमध्ये करण्यात अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत अठ्ठावीस डब्यांचे इंजिन यंदाच्या निवडणुकीत सहा डब्यांवर आल्याने मनसेचा नाशिक पॅटर्न अयशस्वी झाला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत विकासाचे ढोल वाजविताना राज यांना नवा पॅटर्न आणावा लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप एकमेकांवर कुरघोडी करीत असताना मनसेने प्रचारात ‘विकास‘ हा मुद्दा लावून धरला होता. विकासाचे मुद्दे स्पष्ट करताना ‘नाशिकमध्ये काय केले,‘ याचे प्रेझेंटेशन राज ठाकरे यांनी केले होते. गोदापार्क, बोटोनिकल गार्डन, ट्रॅफीक सिग्नल पार्क या हक्काच्या मुद्यांबरोबरचं सिंहस्थाच्या निमित्ताने पायाभुत सुविधांचा झालेला विकास, महापालिकेने विकसित केलेले ऍम्प्लिफिकेशन, भव्य रस्त्यांच्या कामांचेही श्रेय घेत राज ठाकरे यांनी कल्याणमधील नागरिकांच्या टाळ्या मिळविल्या होत्या. ‘कल्याणमध्येही मला सत्ता द्या.. मग बघा कसा विकास करतो‘ असा शब्द त्यांनी दिला होता. परंतु, ठाकरे यांच्या ‘नाशिक पॅटर्न‘ला कल्याणकरांनी दाद दिली नाही. येथे मनसेचे अवघे सहा नगरसेवक निवडून आल्याने सत्ता तर दूरच, विरोधी पक्ष म्हणूनही फारसे स्थान मिळविता आलेले नाही. पुढील वर्षभरात मुंबई आणि नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे ढोल वाजण्यास सुरवात होणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षाला मिळालेल्या अल्प प्रतिसादातून नाशिकमध्ये काय होईल, या विचाराने पक्षाच्या नेत्यांना आताच धडकी भरली आहे.

थापा मारून एकवेळ सत्ता आणता येते; पण हा प्रयोग वारंवार यशस्वी होत नाही, हे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीतून लोकांनी मनसेला दाखवून दिले आहे. ‘नाशिक पॅटर्न‘मधून थापा मारण्याचा प्रयोग फसला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये काय होईल, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. - अजय बोरस्ते, शिवसेना

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें