बुधवार, 9 मार्च 2016

पुणेकरांनी सत्ता दिल्यास वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य - राज ठाकरे

मुंबई - ‘पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपी सक्षम करायला हवीच; पण केवळ या एकाच मुद्‌द्‌यावर अवलंबून न राहता सायकल ट्रॅक, रस्ते, बीआरटी आदी घटकांचाही विचार करायला हवा. त्यासाठी पुणेकरांनी सत्ता दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतुकीला प्राधान्य देणारा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करेल,‘‘ असा निर्वाळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

मनसेच्या दशकपूर्तीनिमित्त  संवाद साधताना ठाकरे यांनी पुण्याच्या विकासाच्या त्यांच्या कल्पना, पक्षाचे पुण्यासाठीचे नियोजन, सद्यस्थिती यांचा आढावा घेतला; तसेच स्मार्ट सिटी, रिंग रोड, मेट्रो, जायकाचा प्रकल्प, महापालिकेतील कार्यपद्धती आदींबद्दलही त्यांनी चर्चा केली.
ठाकरे म्हणाले, ‘विरोधासाठी विरोध ही माझी भूमिका नाही; तर चुकीच्या गोष्टींना विरोध असेल. स्मार्ट सिटी करायला हवीच; पण महापालिकेसारखी यंत्रणा असताना, नव्या कंपनीची गरजच काय? त्या "एसपीव्ही‘बाबत काही आक्षेप आहेत. मनसेने ते सादर केले आहेत. महापालिकेच्या कारभारात राज्य सरकारने विनाकारण ढवळाढवळ करू नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.‘‘
‘जे शहराच्या उपयोगाला येणार, त्याला माझा विरोध कधीच राहणार नाही; पण छुपा अजेंडा असता कामा नये. तो असेल तर कडाडून विरोध करेन. रिंग रोड एवढ्यासाठी बांधायचा, कारण बाजूची जमीन मला विकत घ्यायची आहे. असे असेल तर माझा विरोध राहील. जमिनी दामदुपटीने विकायच्या. दुसऱ्या महायुद्धानंतर आयझोनोव्हर, अमेरिकेत ट्रुमन यांनी रस्ते सरळ केले. मंदीमुळे रस्त्यांची कामे काढली; पण त्यांच्या प्रॉपर्ट्या दिसत नाहीत. पीएमपीला 12 लाख प्रवासी असूनही तोटा कसा होतो, तेच कळत नाही. मुळात वाहतुकीच्या प्रश्‍नांसाठी राज्य सरकारने मदत करायला हवी. त्याचवेळी महापालिकेतील कारभार सुधारणे गरजेचे आहे. त्याच-त्याच ठेकेदारांना वर्षानुवर्षे कामे कशी दिली जातात?‘‘
‘पुण्यातील कचरा असो, आरोग्याचा प्रश्‍न. वाहतूक हीदेखील शहराची गंभीर समस्या झाली आहे. पुण्याची वाढ अक्राळविक्राळ होत आहे. त्यात सुविधांचे नियोजन नाही. त्यामुळे नागरिक भरडले जात आहेत. विकास आराखडाही या शहरातील राज्यकर्त्यांना करता आला नाही आणि नगरविकास योजनाही. पुणेकरांनी एकदा आम्हाला सत्ता द्यावी. पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही तयार केलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करून दाखवू आणि त्यात वाहतुकीला प्राधान्य असेल,‘‘ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘पुणेकरांच्या पैशावर आयुक्तांचे सारखे परदेश दौरे कशाला? इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध असताना कशाला जायचे? एक ई-मेल पाठविली तर सगळी माहिती मिळते. नाशिकमध्ये उद्योजकांच्या मदतीने आम्ही गोदा पार्कचे काम हाती घेतले आहे. रस्ते चांगले केले आहेत; पण विरोधक म्हणतात कुंभमेळ्यामुळे राज्य सरकारने केले; पण त्याची तयारी आम्ही दोन वर्षांपूर्वीच सुरू केली होती. ते लक्षात घ्यायला हवे, विनाकारण टीका होऊ नये,‘‘ अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

‘पुणे शहर म्हणजे दुचाकी वाहनांचे "डंपिंग ग्राउंड‘ झाले आहे. दुचाकी वाहन उद्योजकांची लॉबी त्यामागे काम करीत आहे. त्यामुळेच पीएमपीला सक्षम केले जात नाही आणि वाहतुकीच्या समस्येकडे दुर्लक्ष होते, असेही ठाकरे यांनी नमूद केले. पुणे किंवा नाशिकमधील नगरसेवकांनी शहराचे मालक असल्याचा आविर्भाव आणू नये; तर विश्‍वस्तांच्या जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी. नागरिकांना सुविधा देण्याचे महापालिकेचे काम आहे. ते त्यांनी प्रामाणिकपणाने पार पाडले पाहिजे,‘‘ अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

Surf internet without worry of clearing browser history
- राज ठाकरे म्हणाले
- आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग नव्हे; तर वॉर्ड पद्धतच हवी
- स्मार्ट सिटीला पाठिंबा; पण "एसपीव्ही‘बाबत काही आक्षेप
- विकासाच्या योजना राबविताना त्यात सुप्त हेतू असू नयेत
- 12 लाख प्रवासी असूनही पीएमपी तोट्यात कशी?
- इंटरनेटवर माहिती असताना आयुक्तांचे परदेश दौरे कशाला?
- पुण्यात डीपी (विकास आराखडा) नाही अन्‌ टीपीही (नगरविकास योजना)
- नगरसेवकांनी मालकाची नव्हे; तर विश्‍वस्तांची भूमिका बजवावी 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें