रविवार, 14 जनवरी 2018

महाराष्ट्राच्या परिस्थितीवर साहित्यिकांची ठोस भूमिका नाही - राज ठाकरे

सांगली - येथील पलूस येथे सध्या पद्मश्री कवी सुधांशू अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन सुरु आहे. आज दुपारनंतर हे साहित्य संमेलन गाजत आहे ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीने. परखड भाषण आणि थेट आरोपांनी राज ठाकरे यांनी या साहित्य संमेलनचा मंचही गाजवला. आज महाराष्ट्रात एकमेकांना जातीच्या दृष्टीकोनातूनच आपण बघत आहोत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे राज्याचे दुर्दैव असल्याचे म्हटले. आजचे साहित्यिक ठोस भूमिका घेत नाहीत. राज्यातील शहरं बळकावली जात आहेत तरी महाराष्ट्र बेसावधच असल्याचे वक्तव्यही राज यांनी यावेळी केले.
मुंबईत कमला मिलला लागलेल्या आगीत लोक मृत्युमुखी पडले. ज्यात 14 लोक गुजराती होते. कोरेगाव भीमा येथे इतक्या मोठ्या प्रमाणात दंगल झाली. पण पंतप्रधान मोदींनी मात्र केवळ कमला मिलबाबतच ट्विट केले. कोरेगाव भीमा दंगलीवर ते काहीच बोलले नाही. पंतप्रधान हा देशाचा असतो, एकटा गुजरातचा नाही. असे परखड बोल राज ठाकरे यांनी सरकारविरुध्द उच्चारले. आपल्या भाषणात राज ठाकरे पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रात काम आहे. पण तरी काम मिळत नाही आणि बाहेरच्या राज्यातील लोक येऊन काम मिळवतात, ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे. मुंबई ही गुजरातला हवी आहे, त्यामुळे हे सगळे चालू आहे. महाराष्ट्राची भूमिका घेणारे कवी, लेखक कुठे गेले? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. एवढ्या घटना घडत आहेत. पण एकही साहित्यिक पुढे येत नाहीत. माझे या साहित्यिकांना एकच सांगणे आहे की जे घडत आहे ते त्यांनी आपल्या साहित्यातून मांडावे. केवळ आपल्या महाराष्ट्रामध्येच असे राजकारण सुरु आहे. या दुषित राजकारणामुळे आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे माझी एक विनंती आहे की, या सगळ्या राजकीय भिंती पाडा. बुलेट ट्रेन ही पंतप्रधान यांना अंधारात सुचते.
साहित्य काही वाचायचे नाही, त्याचा बोध घ्यायचा नाही, तर कशाला साहित्य संमेलन घ्यायची? असा सवालही त्यांनी केला. नुसती साहित्य संमेलन घेऊन काही उपयोग नाही. या महाराष्ट्राला काही किंमत राहणार नाही. येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत, हे तुम्हाला आणि या सरकारला काहीच देणे घेणे नाही.' अशा आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीवर त्यांनी टिकास्त्र चालवले. 'आपल्या देशात निवडणुकांशिवाय दुसरा धंदा नाही, रोज एक निवडणूक असते.' असेही राज म्हणाले. साहित्यकारांनी महाराष्ट्रासाठी काम करावे, अशी माझी इच्छा असल्याचे वारंवार आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी आज नमुद केले.  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें