बुधवार, 3 फ़रवरी 2010

मनसे'च्या धसक्‍यामुळे अनेकांना फुटला मराठीचा कंठ - राज

मनसे'च्या धसक्‍यामुळे अनेकांना फुटला मराठीचा कंठ - राज
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 04, 2010 AT 12:46 AM (IST)

डोंबिवली - मनसेला मिळत असलेल्या यशामुळे आता काही जणांना मराठीचा कंठ फुटला, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. तसेच, मराठी माणूस असलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखालील "ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मुळे पंजाब प्रश्‍न सुटला, असे आम्ही म्हणायचे का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

मनसेच्या डोंबिवली शाखेतर्फे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. मनसेच्या सहा आमदारांबरोबरच पक्षाचे अनेक पदाधिकारी सभेला उपस्थित होते. या वेळी भाजपचे माजी आमदार हरिश्‍चंद्र पाटील, भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक नगरसेवक मनसेत दाखल झाला. सरसंघचालक, संघाचे प्रवक्ते राम माधव, राहुल गांधी, मुकेश अंबानी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

सगळी शहरे आणि राज्ये देशाचीच असून, मुंबई अफगाणिस्तानची किंवा चीनची असल्याचे आम्ही म्हटले नाही, असे सांगत ते म्हणाले, ""स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली आहे. त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील. सरसंघचालक मराठी असल्याबद्दल आम्हाला आदर वाटतो. "रोमपुत्र' राहुल गांधी बडबडून गेले, असे म्हणत एवढी आंदोलने झाली तेव्हा ते कुठे होते?'' उत्तर भारतीय-बिहारींनी मुंबई वाचविली असे ते म्हणतात, मग कामटे, करकरे, ओंबाळे हे यूपी-बिहारचे होते का, असा सवाल त्यांनी केला. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांवर राहुल कधी बोलणार, असा सवालही त्यांनी केला.

दहशतवादी पाकिस्तानमधून येतात, त्या वेळी दिल्लीचे इंटेलिजन्स फेल असताना खापर मात्र महाराष्ट्रावर फोडले जाते. संसदेवरील हल्ल्याबाबत राहुलचे म्हणणे काय आहे, असा सवाल त्यांनी केला. नेहरू घराण्याकडून उत्तर प्रदेशात निवडणुका लढविल्या जातात. काही अपवाद वगळता केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार होते, तरीही उत्तर प्रदेशातून लोक बाहेर का पडतात. तुम्हाला विकास का करता आला नाही, असा सवाल त्यांनी केला.

रिलायन्सचा डोलारा महाराष्ट्रामध्ये उभा राहिला; मात्र कंपनीकडून सर्वात खर्चिक प्रकल्प गुजरातमध्ये उभारला गेला. शेवटी स्वतःच्या माणसाबद्दल प्रेम असते, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. राम माधव यांनी कर्नाटकमध्ये जाऊन बोलावे. तेथून ते जिवंत परत येतील का हा प्रश्‍न आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असताना आधी सर्वप्रथम कर्नाटकचे कायदे बदलावेत. तेथे जलसंधारणाची जमीन कानडी भाषकालाच दिली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅक्‍सीचे परवाने 4500 मराठी मुलांना मिळाले असते, तर मराठी कुटुंबे उभी राहिली असती. टॅक्‍सी परवान्यासाठी जन्माने मराठी ही अट हवी; अन्यथा उत्तर प्रदेशात मराठीचे क्‍लास सुरू होतील. उद्या फ्रेंच व जपानीही टॅक्‍सी परवाने घेतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. परवान्यांच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून दट्ट्या आल्यावर ते सॉरी म्हणतात. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे आभार मानतो. त्यांनी मुख्यमंत्र्यांना तासले. आज त्यांनी जाब विचारला असला, तरी उद्या काय होईल हे माहिती नाही, असे राज ठाकरे म्हणाले. आगामी काळात रेल्वेमध्ये 14 हजार जागांची भरती होणार आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहायला हवे. मराठी माणसावर अन्याय झाल्यास मनसेच्या पदाधिकाऱ्याला भेटावे, असे आवाहन त्यांनी केले.

सचिन क्रिकेटर!
सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर आहे. त्याला राजकीय प्रश्‍न का विचारले जातात. कोणी सोनिया गांधींना फुटबॉलचा स्कोअर विचारतो का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. हिंदी-इंग्रजी वाहिन्यांकडून वाद पेटविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें