सोमवार, 22 मार्च 2010

मनसे साताऱ्यात पाय रोवणार

मनसे साताऱ्यात पाय रोवणार

Monday, March 22, 2010 AT 12:15 AM (IST)
 

सातारा - आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेणार असून, आपली ताकद अजमाविण्यासाठी आगामी सर्व निवडणुका लढविणार आहे. राज ठाकरे यांना अभिप्रेत असा जिल्हा घडविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय नाईक यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आम्हाला निवडणुकांत उतरण्याचा सल्ला दिला आहे, असा गौप्यस्फोट करतानाच त्यांनी त्या नेत्याचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला.
कॉंग्रेसच्या मदतीने मनसेचे रेल्वे इंजिन जिल्ह्यात वाटचाल करणार काय, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""कॉंग्रेसला मनसेची भीती वाटते म्हणून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांच्या नेत्यांना चिमटे काढण्याची सवय आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज ठाकरेंवर टीका केली, हे त्याचेच उदाहरण आहे.''

श्री. नाईक म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीतील यशानंतर "मनसे' घराघरांत पोचविण्यासाठी तालुकावार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर गेले दोन दिवस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला भेट देऊन तेथील प्रश्‍नांची माहिती घेत आहोत. दुष्काळी भागात पाणीप्रश्‍न, तर सधन तालुक्‍यांत धरणग्रस्तांचे प्रश्‍न या जिल्ह्यातील दोन प्रमुख समस्या आहेत. हे दोन्ही प्रश्‍न घेऊन यापुढील काळात "मनसे'च्या स्टाईलने आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांचे विचार घराघरांत पोचविणार
आहोत.''

ते म्हणाले, ""राज ठाकरे हे कुशल नेतृत्व असून, त्यांच्या नजरेतून काम करणारा पदाधिकारी कधीच चुकत नाही, तसेच ते चुकारांना कधीही थारा देत नाहीत. "मनसे'तील दहा जिल्हाध्यक्षांची झालेली हकालपट्टी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.'' या वेळी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले उपस्थित होते.

राज ठाकरे महाराष्ट्राचे सर्जननिवडणुका आल्या, की खटाव व माणचा पाणी प्रश्‍न ऐरणीवर येतो. या प्रश्‍नांचे भांडवल करून निवडणुका लढल्या जातात. निवडून आले, की पुन्हा पाच वर्षे कोणीही काहीही बोलत नाही. एका डॉक्‍टरकडून बरे वाटत नाही, त्यामुळे रोगी दुसऱ्या डॉक्‍टरकडे जातो. येथे महाराष्ट्राला राज ठाकरे सर्जन म्हणून मिळाले आहेत. ते या सर्व रोगांवर वेळीच उपचार करतील, असेही श्री. नाईक यांनी नमूद केले