शुक्रवार, 18 अप्रैल 2014

उद्धवसोबत चर्चा होऊ शकते - राज ठाकरे

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे कौटुंबिक मतभेद नसून राजकीय आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते, असे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच मी स्वतंत्र पक्ष काढला, माझ्या पक्षामुळे मराठी मतांत फूट पडत असल्याचे बाळासाहेब कधीही म्हणाले नाहीत, माझे राजकीय विरोधकच तसा सूर आळवतात. वास्तविक पाहता कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप यांनाही मराठी मते मिळत असताना मतांच्या विभागणीवर मलाच का दोष देण्यात येतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. काही तात्त्विक मुद्यांवर उत्तर भारतीयांच्या विरोधात मी आहे. इथल्या भूमिपुत्रांच्या पोटावर लाथ मारून त्यांच्या हक्‍कांच्या नोकऱ्या कुणी बळकावत असेल तर मी गप्प का बसू. आसाम, तसेच पश्‍चिम बंगालमध्ये उत्तर भारतीयांच्या विरोधात वातावरण असताना फक्‍त मला एकट्यालाच दोषी का धरले जाते, असा सवाल करून राज म्हणाले, की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे फक्‍त उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड राज्यांचा गुजरातप्रमाणे विकास करावा म्हणजे आमच्या डोक्‍याचा ताप जाईल, यासाठीच मोदींना पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसे असल्याने भाजप नेते तुमचा पाठिंबा घेण्यास तयार नाहीत, या मुद्यावर बोलताना "पाठिंब्यासाठी फोन करून तेच माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे कधीही गेलो नाही,' असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही

कितीही केसेस होऊ देत, ठोकशाही होणारच
टोलविरोधी आंदोलनाच्या मुद्यावर बोलताना "माझ्यावर कितीही केसेस झाल्या तरी घाबरणार नाही, सरकार ऐकत नसेल तर ठोकशाही होणारच,' अशी भूमिका राज यांनी मांडली. टोलसंदर्भात अनेक निवेदने दिली, चर्चा केल्या; परंतु काहीही हालचाल होत नसल्याने काही प्रमाणात हिंसक आंदोलने होणारच, असे सांगत टोल धोरणाला आपला विरोध नसून त्यातून जमा होणाऱ्या पैशाच्या हिशेबावर आपला आक्षेप असल्याचे राज यांनी नमूद केले. आठ वर्षांत कोणत्याही पक्षाच्या तुलनेत 13 आमदार, विविध महापालिकांमध्ये नगरसेवक असे यश मिळविले असून, अन्य पक्षांच्या तुलनेत मनसेची कामगिरी चांगली असल्याचे दिसून येते. याच बळावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसे निवडून येणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त केला. राजकारणात मी कधीही डील केले नाही, राजकारण माझ्यासाठी "मिशन' आहे, अशा शब्दांत राज यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

गुरुवार, 17 अप्रैल 2014

Raj Thakre Speech Kothrud Pune

देशाला आकार आणणारा पंतप्रधान व्हायला हवा या भावनेतून मी तब्बल तीन वर्षांपुर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता मोदींच्या सलाइनवर महाराष्ट्रभर फिरणारे तेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचे नाव पंतप्रधानासाठी पुढे करत होते, या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेला ठाण्यात टोला लगाविला.
येथील सेंट्रल मैदानावर राज यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, माझा पाठींबा मोदींना आहे आणि स्वत मोदींचे त्यावर काही म्हणणे नाही. त्यामुळे माझ्या पाठिंब्याविषयी बोलणाऱ्या राजनाथ सिंगाचा या सगळ्याशी संबंध काय, असा सवाल करताना मोदींना पाठींबा देण्यापुर्वी एनडीएमध्ये विलीन व्हायला माझा पक्ष काय उत्तरप्रदेश, बिहारचा वाटला काय, असेही ते यावेळी म्हणाले. देशात मोदींचे सरकार आले तर माझ्या खासदारांना मंत्रीपद नको आणि दिले तरी मी ते घेणार नाही. फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांची या सरकारकडून पूर्तता व्हावी इतकीच अपेक्षा आहे, असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले.  राज यांनी या जाहीर सभेत मोदी सलाइनचा एकमेव उल्लेख वगळता  शिवसेनेवर कोणतीही ठोस टीका केली नाही. राज यांची सभा ठाण्यात होत असल्याने महापालिकेत वर्षांनुवर्षे सत्तापदावर असणाऱ्या शिवसेनेच्या कारभाराविषयी राज बोलतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पालकमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीकेचे प्रहार करत असताना शिवसेनेविषयी थेट टीका करणे त्यांनी टाळल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर झालेल्या शाहीहल्ल्याचा राज यांनी जाहीर निषेध केला. बाबासाहेबांचे शिवचरित्र ब्राह्मणी ठरविणारे आणि त्यांच्या अंगावर शाई फेकणाऱ्यांना लाज वाटायला हवी. पेशव्यांनी केलेल्या चुकांचा इतिहास मांडत बसण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी केलेल्या अचूक गोष्टींचा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी बाबासाहेबांनी हयात घालवली. त्यांच्यावर जातीचे शिक्के मारताना यांना लाज वाटायला हवी, असे सांगत राज यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यभर जातीचे विष पेरून ठेवल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली