मंगलवार, 15 सितंबर 2015

नाशिकच्या विकासासाठी झटतो आहे - राज ठाकरे

नाशिक - "नाशिकमध्ये माझी इंचभरही जमीन नाही. महापालिकेत मनसेची सत्ता आहे म्हणूनच कायम नाशिकला येतो असेही नाही. तर शहरे सुंदर ठेवणे माझी आवड आहे. याच भावनेतून मी नाशिकच्या विकासासाठी झटतो आहे,‘‘ असे उद्‌गार महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) काढले. राज यांनी यावेळी शहरात होणाऱ्या विकासकामांसाठी नगरसेवकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे आवाहन करत पक्षास निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले. कालिदास कलामंदिरमध्ये महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या "स्मार्ट नाशिक ऍप्स‘चे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले.

"इतर महापालिकांमध्ये किती कामे होतात, कशी व कधी मंजूर होतात हे कुणाला कळतही नाही,‘ असा टोला लगावत नाशिक महापालिकेने विकसित केलेले हे ऍप्स पारदर्शक असल्याचे गौरवोदगार ठाकरे यांनी काढले. ऍप्लिकेशनमध्ये धन्यवाद देण्याचीही सोय करण्याची अपेक्षा व्यक्त करताना शहराच्या विकासावर त्यांनी भाष्य केले. ""शहरात चांगली कामे झाली आहे हे आता नागरिकांना दिसत आहे. इतर राज्यात कुठेही पुरविल्या जाणाया सुविधांच्या तुलनेत नाशिकमध्ये चांगली सोय झाल्याची कबुली साधुंनीही दिली आहे. मी नाशिक मध्ये काय केले हे मला पाच वर्षांनी विचारा,‘‘ असे ठाकरे म्हणाले. गोदापार्क, जीववैविध्य उद्यान, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क या कामांचा उल्लेख करताना भविष्यातील योजना त्यांनी मांडल्या. "सुरक्षेच्या नावाखाली रस्त्यात बांबू घालून ठेवण्यात आले आहेत,‘ असे सांगत शेवटच्या पर्वणीनंतर ते बांबू तातडीने हलवून शहराचे सौंदर्य पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, डॉ. प्रदीप पवार, उपाध्यक्ष ऍड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते.

नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, अपक्ष गटनेते संजय चव्हाण, सभागृह नेते सलीम शेख, शहर अभियंता सुनील खुने, अधीक्षक अभियंता यु.बी. पवार, अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, अनिल चव्हाण, बी.यु. मोरे, गौतम पगारे या अधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावून ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला. आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा खास उल्लेख करून "महाराष्ट्राची सत्ता एकदा मला द्या आणि त्याचबरोबर गेडाम यांच्यासारखे दहा अधिकारी हाताखाली घेऊन महाराष्ट्र कसा ठीक होत नाही ते बघतो,‘ असे उद्‌गार त्यांनी काढताच सभागृहाने टाळ्यांतून दाद दिली.