शनिवार, 8 मार्च 2014

राज ठाकरेंनी जाहीर केले लोकसभेचे उमेदवार ,नरेंद्र मोदी यांना पाठिंबा.

ठाणे - आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लढविणार असून, निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) स्पष्ट केले.

मनसेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यातील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसेचे सर्व आमदार व राज्यभरातून कार्यकर्ते याठिकाणी जमले होते. 'एम एन एस अधिकृत' या नावाने मनसेच्या अधिकृत ऍपचे उदघाटन राज यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी मनसेत प्रवेश केला. 

राज ठाकरे म्हणाले, ''लोकसभा निवडणूक लढविणार न लढविणार अशी आतापर्यंत अनेकांची चर्चा सुरू होती. पण, सर्वांना बोलून दिल्यानंतर योग्यवेळी मुसंडी मारायची असते. आज मी मनसे निवडणूक लढविणार हे स्पष्ट करतो. या निवडणुकीत माझी काय ताकद आहे, ती सर्वांना दाखवून देणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनसेच्या सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पुढील यादी जाहीर होईल. लवकरच पहिल्या सभेची तारिख जाहीर करणार आहे. यावेळी मी सर्वकाही स्पष्ट करणार आहे. आपण सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागा. मला खात्री आहे, की आपले खासदार निवडून येतील. निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील. देशाच्या भविष्यासाठी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे, मला वाटते.'' 

सर्वांच्या सहकार्यामुळे मी पक्ष यापुढेही नेत राहिन. गारपीटीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित सर्व पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. येत्या काही दिवसांत मी गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. आचारसंहितेचा विषय मधे न घेता सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरेंनी जाहीर केले लोकसभेचे उमेदवार
दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर,
दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर,
 उत्तर पश्चिम मुंबई - महेश मांजरेकर,
 कल्याण - राजीव पाटील,
शिरूर - अशोक खांडेभराड,
 नाशिक - डॉ. प्रदीप पवार,
 पुणे - दिपक पायगुडे

मंगलवार, 4 मार्च 2014

लोकसभा निवडणूक नऊ टप्प्यांत;16 मेला निकाल

नवी दिल्ली - बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज (बुधवार) मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी केली. देशभरात नऊ टप्प्यांत मतदान होणार असून, 16 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेबरोबरच सरकार आणि राजकीय पक्षांसाठी निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

व्ही. एस. संपत पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना म्हणाले, की लोकसभा निवडणुकांबरोबरच विभाजन झालेल्या तेलंगण व सीमांध्र, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांत मतदान होणार आहे. या तिन्ही विधानसभांचे निकालही 16 मे रोजीच लागणार आहेत. देशभरात सात एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान होणार आहे.

या आधीची, म्हणजे 2009ची लोकसभा निवडणूक 16 एप्रिल-13 मे या काळात व पाच टप्प्यांत झाली होती. विद्यमान लोकसभेचा कालावधी एक जूनला संपत असल्यामुळे 31 मेपर्यंत नवे सभागृह अस्तित्वात येणार आहे.

निवडणुकांची वैशिष्ट्ये -
  • लोकसभा निवडणुका नऊ टप्प्यांत होणार
  • सात एप्रिल ते 12 मे दरम्यान देशभरात मतदान होणार
  • पहिला टप्पा 7 एप्रिल, दुसरा 9 एप्रिल, तिसरा 10 एप्रिल, चौथा 12 एप्रिल, पाचवा 17 एप्रिल, सहावा 24 एप्रिल, सातवा 30 एप्रिल, आठवा 7 मे आणि नववा 12 मे 
  • 16 मे रोजी मतमोजणी होणार
  • 10, 17, 24 एप्रिलला तीन टप्प्यांत महाराष्ट्रात मतदान होणार
  • आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओरिसामध्ये विधानसभा निवडणुका होणार
  • निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली माहिती
  • लोकसभा निवडणुकांच्या तारखा ठरविताना परीक्षा, हवामानाचा विचार
  • विभाजनानंतर आंध्र प्रदेशात प्रथमच निवडणुका होणार
  • यंदाच्या निवडणुकीत देशातील 81.4 कोटी मतदार मतदान करणार
  • 31 मे पूर्वी 16 वी लोकसभा स्थापन होणार
  • गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 कोटी मतदार वाढले
  • मतदानासाठी 9 लाख मतदान केंद्रांची उभारणी
  • आजपासून आचारसंहिता लागू
  • गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदार केंद्रांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली
  • लोकसभा निवडणुकीत नकारात्मक मतदानाचा वापर होणार
  • मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 9 मार्चला राबविण्यात येणार विशेष मोहिम
  • उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार

सोमवार, 3 मार्च 2014

मनसेने लोकसभा लढवू नये;भाजपचा प्रस्ताव

गडकरी-राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा
मुंबई - नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, हा प्रस्ताव घेऊन आज भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये आज दुपारी सुमारे दीड तास चर्चा केली. ही भेट गुप्त ठेवण्याची खबरदारी घेण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न होता; पण बातमी फुटल्याने, हिंदुत्ववादी शक्‍तींना बळकट करण्यासाठी मनसेने मदत करावी, अशी विनंती करण्यासाठी ही भेट झाल्याचे सायंकाळी गडकरी यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी मात्र या भेटीबाबत मौन बाळगले असून येत्या एक-दोन दिवसांत ते या संदर्भात बोलतील अशी चर्चा आहे. मनसेने अद्याप उमेदवारांची नावे घोषित केली नसल्याने या निवडणुकीत ते केवळ काही जागा लढवणार की पूर्णत: विश्रांती घेणार, अशी विचारणा सुरू झाली आहे. केवळ काही महिन्यांच्या कालावधीने होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, मनसे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेईलच कसा, असाही विषय मांडला जातो आहे.

गडकरी बऱ्याच दिवसांच्या मध्यांतरानंतर आज मुंबईत आले. निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी आज भाजपचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष पियूष गोयल आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह गडकरी वरळी परिसरात गेले. काही वेळातच तेथे राज ठाकरे दाखल झाले. ही बातमी बाहेर फुटल्याने माध्यमांचे प्रतिनिधी तेथे हजर झाले. आशीष शेलार यांनी प्रारंभी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे ट्‌विट केले; पण त्यानंतर लगेचच भारत कॉंग्रेसमुक्‍त करण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यांनीच माध्यमांना कळवले.

राज ठाकरे काय करणार? मोदी यांच्यासंदर्भात काही वर्षांपूर्वी घेतलेल्या कौतुकाच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पंचाईत होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच केवळ काही दिवसांनी विधानसभा निवडणूक होणार असल्याने मनसेचे आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार नाहीत. गेल्या निवडणुकीत झालेल्या मतविभाजनामुळे भाजपला फटका बसला. त्यामुळे आता काळजी घेत मनसेला समजावण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी चर्चा आहे. मात्र राज यांनी मोदींच्या विरोधात केलेल्या विधानांमुळे ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाहीत, असे मानले जाते. गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

सेनेची संघटना कामाला
या गुप्त भेटीची माहिती फोर सीझन हॉटेलातील शिवसेनेच्या कामगार संघटनेने चोखपणे नेत्यांना कळवल्याची जोरदार शक्‍यता आज वर्तवण्यात येत होती. राज यांना भाजपने कोणत्याही प्रकारे मदत करू नये, अशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे या भेटीबाबत सेनेची प्रतिक्रिया फारशी अनुकूल नसेल, असे सांगण्यात येत आहे.

""होय, मी राज ठाकरे यांची भेट घेतली. हिंदुत्ववादी शक्‍तींचे हात बळकट करण्यासाठी मनसेनेही वेगळे धोरण स्वीकारावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे.''
नितीन गडकरी, भाजप नेते

मनसे महायुतीत आल्यास फायदा : आठवले
गडकरी यांनी राज यांची भेट घेताच महायुतीत सहभागी झालेले नवे भिडू रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, तसेच स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी बेरजेच्या राजकारणाचा फायदाच होईल, असे मत व्यक्‍त केले.