शनिवार, 22 अक्तूबर 2016

हा मनसेच्या आंदोलनाचा विजय- राज ठाकरे

मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना यापुढे बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने हा मनसेने केलेल्या आंदोलनाचा विजय असल्याचे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. अखेर आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत या चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. या बैठकीला राज ठाकरे, करण जोहर उपस्थित होते.

या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की या बैठकीत आमच्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ‘ऐ दिल है मुश्किल‘ चित्रपट सुरु होण्यापूर्वी उरी हल्ल्यात हुतात्मा जवानांना आदरांजली वाहणारा फलक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.. प्रोड्युसर्स गिल्ड यांनी पत्र लिहून आश्वासन दिले आहे, पाकिस्तानी कलाकार, गायक यांना चित्रपटात घेणार नाही. पाकिस्तानी कलाकारांना घेऊऩ काम करणाऱ्या प्रत्येक निर्मात्याने प्रायश्चित म्हणून लष्कराच्या वेलफेअर फंडाला पाच कोटी रुपये द्यावेत. या सर्व मागण्या मान्य झाल्याने आमच्या आंदोलनाचा विजय झाला आहे. मनसेने यापूर्वीही पाक कलाकारांना विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांचाच या संदर्भात मला फोन आला होता. पाक कलाकारांसाठी आपल्याकडे रेड कार्पेट का टाकले जाते. मला वाटत नाही, की हा चित्रपट पाहण्यासाठी भारतीय नागरिक जातील.