सोमवार, 4 जुलाई 2016

मनसेतील फूट टाळण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच्या पत्राचा आधार

मनसेतील फूट टाळण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच्या पत्राचा आधार 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात फाटाफूट होण्याच्या भीतीने धास्तावलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तब्बल १० वर्षांपूर्वी शिवसेना सोडताना पदाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा शुक्रवारी आधार घेतला. या पत्रातील 'मी पक्षशिस्त आणि विश्वासार्हता या दोन गोष्टींशी कधीच तडजोड करणार नाही', या वाक्याची त्यांनी पदाधिकाऱ्यांना पुन्हा आठवण करून दिली. 

पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तीन दिवसांच्या शिबिराचा समारोप राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

सुमारे १० वर्षांपूर्वी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून वेगळी चूल मांडताना पदाधिकाऱ्यांना लिहिलेल्या जाहीर पत्राचा राज ठाकरे यांनी यावेळी सविस्तर उल्लेख केला. या व्यतिरिक्त त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही खडे बोलही सुनावले. 'कामांच्या माध्यमातून तुम्ही जनतेशी सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांची कामे कोणतीही अपेक्षा न बाळगता केल्यास ते तुम्हाला लक्षात ठेवतात. त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये जाऊन अधिक जोमाने कामे करा असा', सल्लाही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. 

काय होते 'त्या' पत्रात? 

पदाधिकाऱ्यांना लिहिलेल्या या पत्रात, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय मानसिक क्लेश देणारा, पण कसा आवश्यक होता. इतर राजकीय पक्षात जाण्यापेक्षा मनसेची स्थापना करण्याचा निर्णय का घेतला. नवा पक्ष स्थापन करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, ते राज ठाकरे यांनी मांडले होते. यासर्व बाबींचा उल्लेख त्यांनी शुक्रवारच्या भाषणात केला.