शुक्रवार, 31 दिसंबर 2010

वाढदिवसाचे होर्डिंग लावू नयेत - राज ठाकरे

वाढदिवसाचे होर्डिंग लावू नयेत - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 01, 2011 AT 12:30 AM (IST)


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2011 या नवीन वर्षासाठी नवा संकल्प सोडला आहे. मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्याने स्वतःच्या वाढदिवसाचे होर्डिंग, बॅनर कुठेही लावू नयेत; अन्यथा त्याच्याविरुद्ध पक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल. आपल्याही वाढदिवसाचे एकही होर्डिंग कुणी लावू नये, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिले.

नवीन वर्षाचा नवा संकल्प मांडताना राज यांनी होर्डिंगबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या वरपासून खालपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आपल्या सहीचे पत्र दोन-तीन दिवसांत मिळेलच. शहराचे विद्रुपीकरण वाढत चालत आहे. रस्त्यात जागाजोगी होर्डिंगबाजी दिसून येते. शहराला होर्डिंगपासून वाचविण्यासाठी हा आपला नवा संकल्प आहे, याची प्रत्येकाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. वाढदिवसाची होर्डिंग चुकूनही लागता कामा नयेत, असे स्पष्ट करतानाच राज म्हणाले, की माहीत नव्हते, विसरलो, अशा फुटकळ सबबी आपण ऐकून घेणार नाही. एखाद्या समाजोपयोगी घटनेचे वा उपक्रमांचे होर्डिंग फक्त एकच दिवस लावता येईल; मात्र तो दिवस झाल्यानंतर तातडीने ज्यांनी हे होर्डिंग वा बॅनर लावला आहे, त्याने तो उतरविला पाहिजे. शहर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे काम आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वच्छतेचे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजोपयोगी व एखाद्या उपक्रमाचे होर्डिंग लावताना विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या महापुरुांचे पुतळे अथवा फोटोंआड कुठलेही होर्डिंग येणार नाही याची दक्षता घ्या, शहरात कुठेही बकालपणा करू नका, अशा सूचना देताना राज म्हणाले, की शाळा, रुग्णालये, ट्रॅफिक सिग्नल अशा ठिकाणी मनसेचे एकही होर्डिंग वा बॅनर लागता कामा नये. एवढे सांगूनही जर कोणी असा पराक्रम केला, तर त्याच्यावर पक्षातंर्गत कठोर कारवाई केली जाईल.

सोमवार, 27 दिसंबर 2010

दादोजींच्या पुतळ्यावरून राजकारण - राज

दादोजींच्या पुतळ्यावरून राजकारण - राज
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 27, 2010 AT 03:39 PM (IST)
 
मुंबई - लाल महाल परिसरातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविणे हे इतर महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेले राजकारण आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आज पहाटे दोनच्या सुमारास लाल महाल परिसरात समुह शिल्पात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा महापालिकेने काढला. याबाबत राज ठाकरे म्हणाले, ''सत्ताधाऱ्यांनी नाकर्तेपणा झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्याचे राजकारण करण्यात येत आहे. लाल महालामध्ये दादोजींसोबत शहाजीराजेंचाही पुतळा बसवायला हवा होता. या प्रकरणी गरज पडल्यास मनसे आंदोलन करेल.''

रविवार, 26 दिसंबर 2010

भारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज

भारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 27, 2010 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजप कार्यालयातील भेटीमुळे युतीमध्ये निर्माण झालेला तणाव निवळला असला, तरीही शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी थेट राज यांना दिलेल्या निमंत्रणानुसार ते त्यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे संतप्त झाले असून भारतकुमार व राज यांच्या पडद्यामागील मैत्रीचा निषेध म्हणून ते शनिवारी राऊत यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याचे समजते.

राज यांनी गेल्या आठवड्यात भाजप कार्यालयाला दिलेल्या भेटीमुळे युतीत तणाव निर्माण झाला होता. भाजचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला; मित्रपक्ष भाजपच्या हरकतींवरून नाराज झालेल्या उद्धव यांनी आपली नाराजी जाहीरपणे बालून दाखविली; पण भारतकुमार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाचे निमंत्रण थेट राज यांना दिल्याचा मुद्दा पुढे आणत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज भाजप कार्यालयात आलेले तुम्हाला चालत नाहीत; पण तुमच्या खासदारांनी त्यांना भेटून निमंत्रण दिलेले कसे चालते, असा सवालही भाजपच्या गोटातून उपस्थित करण्यात आला. राजकारणात शिवसेना व मनसे समोरासमोर उभी ठाकली असतानाच आपल्या खासदारांचे हे "मैत्री'पूर्ण वर्तन उद्धव यांना रुचले नाही. आपण समोरासमोर टीका करायची व पुन्हा शिवसेनेचे काही नेते आपल्या जुन्या मैत्रीचे हवाले देणार, या दुटप्पीपणामुळे उद्धव नाराज झाल्याचे समजते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध राज यांनी टीका केली होती. "एलआयसी'मध्ये शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मनसेने युनियन स्थापन करायची, हे दाखले ताजे असतानाच शिवसेनेचे खासदार जुन्या मैत्रीचे हवाले देतात, हा प्रकार त्यांना रुचला नाही. सध्या राजकारणाच्या प्रत्येक वाटेवर शिवसेना व मनसेमध्ये जाहीर संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या महायुद्धात भारतीय विद्यार्थी सेना व मनविसे समोरासमोर उभी ठाकली असतानाच, शिवसेनेच्या खासदाराच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास मनसे अध्यक्षांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नेमका कुठला संदेश जाणार, याकडेही शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले आहे.

राज या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. म्हणूनच उद्धव "बीकेसी' येथे झालेल्या विवाह सोहळ्यास गेले नाहीत. त्यांच्या भूमिकेचे शिवसेनेतून स्वागत होत असून पडद्यामागून मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी मैत्री ठेवणाऱ्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना यामुळे चांगलीच चपराक मिळेल, अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.