गुरुवार, 19 जनवरी 2012

महापालिकेत लागणार 'राज'कीय कस!

महापालिकेत लागणार 'राज'कीय कस!
संजीव साबडे - सकाळ वृत्तसेवा
Friday, January 20, 2012 AT 03:45 AM (IST)

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) आताशी सहा वर्षे होत आहेत. त्यांच्याबरोबर किती शिवसैनिक जातील, अशी शंका व्यक्‍त होत होती; पण बहुसंख्य तरुण आणि शिवसैनिकांनी "राज'मार्ग अवलंबला आणि मनसे वाढत गेली. तरीही निवडणुकीचे राजकारण वेगळे असते. त्यात यश मिळेल का, हा प्रश्‍न उपस्थित झाला. पण मनसेचे विधानसभेत सध्या 12 आमदार आहेत, तर मुंबईत सात नगरसेवक, कल्याण-डोंबिवलीमध्ये 27, पुण्यात आठ, ठाण्यात तीन, तर नाशिक महापालिकेत 12 नगरसेवक आहेत. मनसेने पाच वर्षांतच मुंबई, नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली व ठाण्यात चांगली बाजी मारली. खेड आणि वणी या दोन नगरपालिकांवरही त्यांनी कब्जा मिळवला.

यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर मनसेने लक्ष केंद्रित केलेले नाही. आपण ग्रामीण भागात पूर्णपणे पोचलेलो नाही, हे राज ठाकरे यांना माहीत आहे. आधी शहरांमधील तरुणांना आकर्षित करा, तेथील महापालिकांमध्ये यश मिळवा आणि मग ग्रामीण भागात शिरकाव करा, अशी त्यांनी रणनीती आहे. सर्व दहा महापालिकांमध्ये मनसेचे उमेदवार रिंगणात असले तरी त्यांच्या दृष्टीने मुंबई, नाशिक, पुणे आणि ठाणे या महापालिकाच अतिशय महत्त्वाच्या आहेत. बाकी सहा महापालिकांमध्ये जे काही हाती लागेल, त्यात समाधान मानायचे, असेच मनसेने ठरवलेले दिसते. शिवसेनेनेही स्थापनेनंतर ही रणनीती आखली होती आणि नंतरच ग्रामीण भागात शिवसेना गेली होती.

याआधी झालेल्या महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत मनसेने आमची मते फोडली आणि कॉंग्रेसचा फायदा करून दिला, त्यामुळे मनसेला मते देणे म्हणजे कॉंग्रेसला विजयी करणे आहे, असा आरोप शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या आरोपात अजिबात तथ्य नव्हते, असे नव्हे. पण मनसेने गेल्या सहा वर्षांत स्वत:ची " व्होट बॅंक' तयार केली, हेही खरे. तसेच ज्या ठिकाणी युतीने भाजपला जागा सोडली, तिथे शिवसैनिक भाजपऐवजी मनसेला मतदान करतात आणि मनसेचा जिथे उमेदवार नाही, तिथे त्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेला मदत करतात, असे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे यंदा शिवसैनिकच भाजपऐवजी काही ठिकाणी मनसेला मत देतील, अशी चर्चा सुरू आहे. तरीही मनसेमुळे आणखी काही काळ शिवसेनेला फटका बसतच राहील. दहा महापालिकांच्या निवडणुकांमध्येही कदाचित तसे घडू शकेल. कारण मराठी मतदार असलेल्या प्रभागांवरच शिवसेना व मनसे यांचे लक्ष असेल.

मात्र शिवसेना ही जुनी संघटना आहे आणि शाखाप्रमुखापासून उपशाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक याची उमेदवारीसाठी यंदा झुंबड उडाली आहे. सर्वांना उमेदवारी देणे शक्‍य नाही. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळत नाही, ते शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आपल्यालाच मदत करतील, असा मनसेचा आतापर्यंतच्या अनुभवातून असलेला होरा आहे.

या वेळी मुंबई, नाशिक, पुणे, ठाण्यामध्ये लक्ष केंद्रित करणाऱ्या मनसेला सर्वाधिक जागा मुंबईत त्यापाठोपाठ नाशिक, पुणे व ठाण्यात मिळतील, असे मनसेला वाटते. त्यांनी या चारही ठिकाणी चार ते पाच भागांत प्रभागांची आखणी केली आहे. कोणत्या प्रभागांत आपले उमेदवार निवडून येतील, कुठे जोर लावल्यास फायदा होईल, कुठे शक्‍यताच नाही, हे नक्‍की करून, त्याप्रमाणे उमेदवार निश्‍चित करण्याचे आणि ताकद लावण्याचे ठरवले आहे.

मुंबईत 40, तर ठाण्यात 10 ते 15 जागा मिळतील, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटते. नाशिकमध्ये त्यांचे तीन आमदार आहेत; पण त्यांनी मतदारसंघांकडे फारसे लक्ष दिलेले नाही, अशी मनसे नेत्यांचीच तक्रार आहे. तरीही राज ठाकरे तिथे जाहीर सभा घेणार आहेतच. पुण्यासाठीही त्यांनी जादा वेळ द्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मनसेकडे राज ठाकरे हेच हुकमी पत्ता आहेत.

मनसेने इच्छुक उमेदवारांच्या घेतलेल्या परीक्षेत किती पास आणि किती नापास झाले, हे केवळ मनसे नेत्यांनाच माहीत आहे. पण परीक्षा पास होणाऱ्यांमध्ये निवडणूक जिंकण्याची क्षमताही असावी लागते. त्यामुळे परीक्षेला न बसलेल्या उमेदवारांनाही मनसेने उमेदवारी दिल्यास आश्‍चर्य वाटू नये. त्यामुळे इच्छुक तणावाखालीच आहेत.

मनसेची उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागायची, असे अनेकांनी ठरविल्याचे दिसते. परीक्षा देणारे अनेक जण सध्या राष्ट्रवादीच्या तंबूत दिसू लागले आहेत. मनसेमध्ये किती बंडखोरी होईल आणि त्याचा फटका कोणाला बसेल, हे सांगणे अवघड आहे. तसेच निवडणुकीनंतर महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे युतीला पाठिंबा देणार की आघाडीला, हेही पाहायला हवे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत व अंबरनाथ नगरपालिकेत मनसेने युतीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे मनसेला या वेळी आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल.
(उद्याच्या अंकात - इतर पक्ष)

सहा वर्षांची मनसे 2006 - राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेची स्थापना, बाळा नांदगावकर व शिशिर शिंदे यांची साथ
2007 - मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे महापालिकांत मनसे उतरली, मनसेने शिवसेनेची मते फोडल्याने कॉंग्रेसचा फायदा झाल्याचा आरोप
2009 - लोकसभा निवडणुकीत मुंबईत मनसेला साडेसात लाख मते, नाशिकमध्ये 2.16 लाख, भिवंडीत पावणेदोन लाख, ठाण्यात 1.34 लाख, पुण्यात 76 हजार मते. विधानसभेवर 13 आमदार (एकाचे निधन)
2011 - खेड व वणी नगरपालिकांवर सत्ता

मंगलवार, 17 जनवरी 2012

राज ठाकरे यांची मनसे फटाकेबाजी

राज ठाकरे यांची मनसे फटाकेबाजी
सुनील जावडेकर - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 17, 2012 AT 01:04 PM (IST)
ठाणे - ठाण्यात पक्षसंघटनेत सुरू असलेल्या वादाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता.17) ठाणे भेटीत आवाज देत आपल्या महापालिका निवडणुकीच्या जंगी तयारीची एक झलक दाखवली. पक्षसंघटनेत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार केवळ आपल्याकडेच असल्याचे स्पष्टपणे बजावत कोणाचीही त्यात ढवळाढवळ चालणार नाही, असेही त्यांनी यातून रोखठोकपणे सांगून टाकले. परिणामी, केवळ पदे मिळवून निष्क्रिय असलेल्या ठाण्यातील काही पदाधिकाऱ्यांनाही राज ठाकरे यांनी चाप लावला आहे. याबाबतचे वृत्त मंगळवारी "सकाळ'ने प्रकाशित केले होते.

ठाण्यातील मनसेत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र जरी पदाधिकारी दाखवत असले तरी वास्तव काही वेगळेच सांगत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ठाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाणेकरांची भरभरून मते मिळवणाऱ्या मनसेचा शहरातील दोन वर्षांनंतरचा आलेख मात्र फारसा समाधानकारक नाही. पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीही ठाण्यातील मनसेच्या कामगिरीवर आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुळातच केवळ राज यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन निवडून येण्यातच धन्यता मानणारा एक वर्ग मनसेत आहे. सुशिक्षितांचा मोठा तरुण वर्ग असूनही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा फारसा उपयोग संघटनावाढीसाठी करून घेता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजन राजे यांच्यासारखा नेता संघटनेपासून दूर गेल्यावर सुशिक्षितांचे सामूहिक नेतृत्व मनसेत पद्धतशीरपणे विकसित होऊ शकले असते. मात्र, एकेका प्रभागात पाच-सहा कार्यकर्ते आधीच इच्छुक असताना आता आणखीन ही सुशिक्षितांची नवी भानगड कशाला, असा विचार करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनावाढीसाठी असे कार्यकर्ते घडवलेच नाहीत. उलट इच्छुकांचे प्रमाण आपोआप कमी व्हावे आणि त्याला गळती लागावी यासाठी आंदोलनातही एखाद्‌-दुसरा कार्यकर्ता अभावानेच झळकू लागला. तेव्हाच येथील काही पदाधिकाऱ्यांची संकुचित आणि खुजी वृत्ती चर्चेत आली होती.

प्रत्यक्षात मनसेकडे तरुण कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. मात्र, ते स्वतःच उद्‌धवस्त करण्यात आले. आताही ठाण्यातील तरुण मनसेकडे काही प्रमाणात आहेत. इतकेच नव्हे तर 18 ते 24 या वयोगटातील सुमारे अडीच लाखांच्या आसपास नवमतदार नोंदवले गेले आहेत आणि त्यांची मते निर्णायक ठरू शकतात इतपत निश्‍चितच परिणामकारक आहेत. मात्र, नगरसेवकाचे बाशिंग गुडघ्याला बांधलेल्या काही स्वयंघोषितांनी या निर्णायक मतदारांकडेच पाठ फिरवली आहे.

निर्वाणीचा इशारा
मनसेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी ठाण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी ठाणे मनसेत कार्यकारिणीत फेरबदल करावेच लागतील, असे सांगून निर्वाणीचा इशाराच दिला आहे. शिवाईनगरातील ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत फटकेबाजी करू, असे म्हटले होते. मात्र या फटाक्‍यांचा पहिलाच आवाज काही निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवरच काढण्यात आल्याने मनसेतील संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 17, 2012 AT 01:04 PM (IST)
ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) निवडणूक आयोगावर टीका करीत, निवडणूक आयोगाने दबावाखाली काम करू नये असे म्हटले आहे. तसेच मतदानादिवशीच मतमोजणी घेण्याची मागणी त्यांनी केली.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''निवडणूक आयोगाचे काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मदत करणारे आहे. त्यांनी कोणत्याही दबावात काम करू नये. आयोगाला मतदान यंत्राची अडचण दूर करणे शक्य असून, दुसरय़ा राज्यातून मतदान यंत्रे आणणे शक्य आहे.''

परीक्षेशिवाय तिकीट नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट करीत राज ठाकरे यांनी सांगितले, की दुसऱ्या पक्षातून मनसेत प्रवेश केलेल्यांना परीक्षा देणे आवश्यक आहे. ठाण्यामध्ये मनसेमध्ये कोणतेही मतभेद नसून, पक्षात संघटनात्मक बदल करणे आवश्यक आहे. पक्षातील उमेदवारांचाच आगोदर विचार केला जाईल.  ठाणेकरांना मनसेशिवाय पर्याय नाही. अतिक्रमण हटविता येत नसल्याने मुंबई आणि ठाण्यामध्ये स्कायवॉक बांधण्यात आले. मात्र, याचा काही उपयोग नाही. सत्ताधारी विरोधकांमुळे ठाण्याचा विकास खुंटला आहे