बुधवार, 16 जनवरी 2013

मोर्चाचा प्रयत्न केल्यास मनसे ताकद दाखवेल- राज

मोर्चाचा प्रयत्न केल्यास मनसे ताकद दाखवेल- राज

- सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, January 16, 2013 AT 12:45 AM (IST)

मुंबई - अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एसीपी वसंत ढोबळे यांच्यावर बदलीची कारवाई का केली असा प्रश्‍न करतानाच फेरीवाल्यांनी त्यांच्या विरोधातील कारवाईसाठी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यास मनसे आपली ताकद दाखवेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत फेरीवाला धोरण राबविताना मराठी फेरीवाल्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करतानाच अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कृष्णकुंज येथे आज पत्रकार परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करणे कठीण झाल्याची टीका राज यांनी केली. अनधिकृत फेरीवाल्यांना हटविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. फेरीवाल्यांच्या मतांवर राजकारण करणाऱ्या कॉंग्रेसचे आमदार कृपाशंकरसिंह यांच्यामुळेच फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. परप्रांतीय फेरीवाले मराठी फेरीवाल्यांवर दादागिरी करतात. अनधिकृत गोष्टी विरोधात पक्षभेद विसरुन सर्व राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे. फेरीवाले धोरण राबविताना शहरातील लोकांना त्यामध्ये सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन करतानाच उद्या दोन लाख फेरीवाल्यांना तुम्ही बसविणार कोठे असा प्रश्‍न राज यांनी उपस्थित केला.

भाजप दुतोंडी
हुतात्मा हेमराज यांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेस सरकारवर टीका केली आहे. पण याच भाजपच्या काळात पाकिस्तानमध्ये जाणारी समझोता एक्‍सप्रेस सुरु करण्यात आली होती. तुम्हाला कोणी सांगितले होते की, अशी गाडी सुरु करायला असा प्रश्‍न राज यांनी भाजपच्या नेतृत्वाला विचारला आहे. आधी अशा बसगाड्या सुरु करायच्या आणि नंतर पाकिस्तानच्या नावाने आकांडतांडव करायचे अशी नीती भाजपची असल्याची टीका राज यांनी केली.



सोमवार, 14 जनवरी 2013

गैरव्यवहाराविरोधात बार उडविणार- राज ठाकरे

गैरव्यवहाराविरोधात बार उडविणार- राज ठाकरे
  <    

- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 15, 2013 AT 02:45 AM (IST)
मुंबई- "सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या माध्यमातून माझ्या हातात दारुगोळा दिला आहे. त्याचा बार 10 फेब्रुवारीपासून उडवू'', अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. राज्याचा दौरा फेब्रुवारीत सुरू केल्यावर 10 जिल्ह्यांत सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कांदिवलीत प्रवीण दरेकर यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांचा आरंभ आज राज ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी राज यांनी दौऱ्याची घोषणा केली. ""आघाडी सरकारच्या राजवटीत भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. गैरव्यवहारांची रांगच लागली आहे. हे गैरव्यवहार नागरिकांपुढे मांडण्यासाठी दौरा करणार आहे. हा दौरा मत मागण्यासाठी नसून मत मांडण्यासाठी असेल'', असे ते म्हणाले. ""मी बरेच दिवस बोललो नाही, पण आता बोलणार आहे. त्याची सुरुवात पुढील महिन्यात होईल. तुमचे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहावेत'', असे आवाहनही यावेळी राज यांनी केले.