बुधवार, 24 फ़रवरी 2016

नरेंद्र मोदींच्या थापांना बळी पडलो - राज ठाकरे

मालवण - "एकवेळ पूर्वीचे कॉंग्रेसचे सरकार परवडले; मात्र सध्या सत्तेत असलेले सरकार भयानक आहे. या सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जनतेला फक्त भूलभुलैया दाखविला. त्यांनी जनतेची फसवणूक केलीच; पण मीसुद्धा त्यांच्या थापांना बळी पडलो,‘‘ असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केले. 

ठाकरे सध्या मालवण दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी (ता.25) आंगणेवाडी यात्रेला जाणार आहेत. आज त्यांनी तारकर्लीतील पर्यटनाचा आनंद घेतला. पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या. सध्याच्या सरकारबाबत विचारले असता, पूर्वीचे सरकार परवडले, असा उपरोधिक टोला मारला. ते म्हणाले, ""सध्याचे सरकार अपरिपक्व आहे. त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. मोदी यांनी तर जनतेला भूलभुलैया दाखविला. मी गुजरातमध्ये गेलो होतो तेव्हा मलाही त्यांनी तिथल्या काही कल्पना दाखविल्या. माझाही त्यावर विश्‍वास बसला होता; मात्र गेल्या दीड वर्षाचा कारभार पाहता त्यांच्या थापा उघड झाल्या आहेत.‘‘ 

ते म्हणाले, की सध्या कोकणात जे आमदार, खासदार आहेत, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. आमच्या लोकांकडे सत्ता आली असती, तर आम्ही हे करून दाखविले असते; मात्र जनतेने आता यातून धडा घेण्याची आवश्‍यकता आहे. सी-वर्ल्डसारखा प्रकल्प कोकणचे भवितव्य बदलू शकला असता; मात्र राजकारणामुळे आज हा प्रकल्प अडकला, याचे खरे दुःख आहे. 

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा