सोमवार, 12 जून 2017

सरकारच्या निर्णयाचे स्वागत - राज ठाकरे


मुंबई - सधन शेतकऱ्यांना वगळून सरसकट कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करीत आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तरीही कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
आम्हाला "कर्जमाफी' हा शब्द मान्य नाही; मात्र शब्दच्छल करण्याची ही वेळ नाही. आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित आहे, असे ठाकरे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. राज्य सरकारने त्यांच्या निर्णयाचा तपशील जाहीर करावा. यापुढे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या निर्णयाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील. जिथे जिथे अन्याय होताना दिसेल तिथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतील, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.