सोमवार, 16 मार्च 2015

‘आरे’ला ‘कारे’ करणारच!- राज

राजकारण्यांच्या दुधाच्या डेअऱ्या चालाव्यात म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीनं 'आरे'ची वाट लावली होती आणि आताच्या सरकारनं आरे कॉलनी बिल्डरांना विकायला काढली आहे. मेट्रो-३ चे कारशेड ही केवळ सुरुवात आहे, पण कुठला वाटा कुणी घ्यायचा हे यांचं ठरलंय. म्हणूनच, जोवर जनतेला विश्वासात घेतलं जात नाही, तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात नाही, तोवर आम्ही 'आरे'ला 'कारे' करणारच, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजपला खडसावलं.


कुलाबा ते सांताक्रूझ मार्गावरील मेट्रो-३ प्रकल्पाचं कारशेड गोरेगावच्या आरे कॉलनीत उभारण्याच्या प्रस्तावावरून भाजप-शिवसेना युतीत चांगलीच जुंपली आहे. प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या २५४ वृक्षांचा बळी देण्यास शिवसेनेनं विरोध केलाय, तर भाजपनं विकासाचा सूर लावलाय. त्यावरून गेल्या महिन्यापासून त्यांच्यात बरेच खटके उडालेत. अशातच, मनसेच्या इंजिनानंही आज थेट कारशेडमध्ये धडक मारली. राज ठाकरे यांनी आरे कॉलनीत जाऊन कारशेडची जागा, तिथली झाडं, पुनर्रोपण करावी लागणारी २ हजार झाडं, आरे कॉलनीतील जैवविविधता याबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या कारशेडला विरोध जाहीर केल्यानं भाजपची अडचणीत भर पडली आहे.

मी पाच-सहा वर्षांपूर्वी जे बोललो होतो, तेच आरे कॉलनीच्या विकास आराखड्यातून दिसतंय. लोकांसाठी काहीतरी करतोय, हे दिसावं म्हणून मेट्रो यार्ड, प्राणीसंग्रहालय, बोटॅनिकल गार्डन या गोष्टी त्यात आहेत. पण त्यासोबतच गृहनिर्माण प्रकल्प, व्यावसायिक वापरासाठी ९० हेक्टर जागा दिली जाणार आहे. हे हाउसिंग प्रोजेक्ट आरे कॉलनीत आले कुठून? याचाच अर्थ, या सरकारनं ही जागा बिल्डर, उद्योगपतींनी विकायला काढली आहे. निवडणुकीत मिळालेल्या आर्थिक पाठिंब्याची परतफेड करण्याचाच हा प्रकार आहे, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आपण प्रगती, विकासाच्या विरोधात नाही, पण सरकारचा उद्देश स्वच्छ नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच 'री' हे सरकार ओढतंय, असंही त्यांनी सुनावलं. मेट्रो-३च्या निधीसाठी जपान सरकारला जे पत्र पाठवलंय, त्यात आरे कॉलनीत वन्यप्राणी नसल्याचं म्हटलंय. हा खोटेपणा कशासाठी?, असा संतप्त सवालही राज यांनी केला. मेट्रोच्या कारशेडसाठी तीन पर्याय होते. हाजी अलीजवळ रेसकोर्सच्या खाली, कलिना कॅम्पसमध्ये आणि तिसरा पर्याय होता आरे कॉलनीचा. मग सगळ्यात शेवटचा पर्याय का निवडला?, गोराईजवळची १५०० एकर जमीन डेव्हलपमेंट झोनमध्ये का आणली?, बीपीटीच्या मोकळ्या जागेवर कारशेड का उभारत नाही?, असे प्रश्नही त्यांनी केले.

Subscribe to Youtube Channel

झोपडपट्ट्या होऊ नयेत म्हणून आरे कॉलनीचा विकास करत असल्याचं मुंबईचे आयुक्त म्हणतात. अरे, पण झोपडपट्ट्या होऊ नयेत, अतिक्रमणं वाढू नयेत, ही जबाबदारी महापालिकेचीच आहे ना? पण यांच्याच संगनमताने अनधिकृत बांधकामं झाली आहेत, असं राज यांनी सुनावलं. गुजरातमध्ये जशी अमूल कंपनी वाचवली, तरी जॉइंट व्हेंचर करून आरेही वाचवता आली असती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

मेट्रो-३ साठी सर्व तांत्रिक बाबी तपासल्या आहेत का, सोइल टेस्टिंग केलंय का, ते कुणी केलंय, आजूबाजूच्या इमारतींना काही धोका नाही ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तज्ज्ञांनी द्यावीत. मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, माझ्या तज्ज्ञांशी समोरासमोर बोला, जनतेला विश्वासात घ्या, तोपर्यंत झाडे पाडण्यास मनसेचा विरोधच राहील, असं राज यांनी ठणकावून सांगितलं. आपल्या आंदोलनाची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत