शनिवार, 4 दिसंबर 2010

राज ठाकरेंमुळे नव्हे, तर विकासामुळे पलायन थांबले

राज ठाकरेंमुळे नव्हे, तर विकासामुळे पलायन थांबले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 05, 2010 AT 12:30 AM (IST)
 
बिहार जनतेने विकासाला कौल दिला- सुशीलकुमार मोदीनागपूर- रोजगारासाठी बिहारमधून होणारे स्थलांतरण मागील पाच वर्षांत झपाट्याने कमी झाले आहे. त्यामागे राज ठाकरे यांचा बिहारी जनतेचा विरोध हे कारण नसून, एनडीए सरकारने केलेला विकास कारणीभूत आहे. बिहारमधील महिला आणि नागरिकांनी सरकारने केलेल्या विकासकामांना कौल दिला, असे प्रतिपादन बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आज येथे केले.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा मुलगा निखिल याच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभाकरिता सुशीलकुमार मोदी नागपुरात आले होते. हॉटेल प्राईड येथे पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार म्हणाले, कॉंग्रेसची बिहारवर तब्बल 40 वर्ष सत्ता होती, तर लालूप्रसाद यादव यांनी 15 वर्ष सत्ता उपभोगली. या काळात बिहार राज्य अतिशय माघारले; परंतु नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मागील पाच वर्षांत विकासाची प्रचंड कामे केली. बिहार गुन्हेगारीकरिता प्रसिद्ध होता. मात्र, एनडीए सरकारने मागील कार्यकाळात तब्बल 50 हजार गुन्हेगारांना शिक्षा दिली. त्यात 120 जणांना फाशी आणि दहा हजार गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली. बिहारमध्ये मुली सायकल चालविताना दिसत नव्हत्या; परंतु सरकारने नवव्या वर्गातील मुला-मुलींना सायकल खरेदीसाठी दोन हजार रुपये दिले. राज्यात 27 लाख विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे राज्यात एकप्रकारे सामाजिक क्रांती झाली. त्याच मुलींनी नंतर आपल्या पालकांना एनडीएच्या बाजूने मतदान करण्यास प्रेरित केले. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याकरिता मागील कार्यकाळात विशेष योजना आखण्यात आल्या होत्या. आता तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता कपडे खरेदीसाठी 250 रुपये देण्याची योजना आखण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

बिहार प्रकाशमान करणारबिहारमध्ये विजेची प्रचंड मागणी असताना उत्पादन नगण्य आहे. आगामी पाच वर्षांत संपूर्ण बिहारमध्ये वीजपुरवठा करण्याचे ध्येय आखण्यात आले आहे. त्याकरिता बिहार सरकार तब्बल तीन हजार मे. वॅ. क्षमतेचे विद्युत प्रकल्प उभारणार आहे, तर खासगी कंपन्यांकडून 30 हजार मे. वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठ्याचा करार होत नसल्याने हे प्रकल्प अडचणीत आले आहे. तेव्हा कोळसा पुरवठ्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे, असे उपमुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले.

करिश्‍मा नको; विकास हवाकॉंग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी बिहारमध्ये फ्लॉप ठरले. तसेच कॉंग्रेसचाही सपशेल पराभव झाला. त्यामुळे लोकांना "करिश्‍मा नको; विकास हवा', हेच त्यातून दिसून येते. घराणेशाहीतून राजकारण शिकता येत नाही. त्याकरिता प्रत्यक्ष काम करणे आवश्‍यक आहे, असे सुशीलकुमार मोदी म्हणाले. मीदेखील लोकसभेत होतो. कधीही राहुल गांधी यांना लोकांच्या प्रश्‍नावर बोलताना पाहिले नाही. दलितांच्या झोपडीत रात्र काढून जनता प्रभावित होत नाही. त्याकरिता त्यांना विकासकामे हवी आहेत, अशी टीकाही मोदी यांनी केली.