सोमवार, 16 मई 2016

देश न्यायालय चालवतंय की सरकार- राज ठाकरे

मुंबई - ‘नीट‘ परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले की हा देश न्यायालय चालवतंय की सरकार. सर्वोच्च न्यायालयाचा या निर्णयाशी काय संबध?, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘नीट‘च्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आज (सोमवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकांच्या प्रतिनिधींना घेऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी ‘नीट‘च्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना पण मी हेच सांगितले की काहीही करा, पण विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या. आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची भेटीची वेळ ठरेल आणि तोडगा निघेल. मी त्यांना पालकांना देखील पंतप्रधानांच्या भेटीला नेण्याची विनंती केली आहे. काल दुपारी मी पंतप्रधानांशी बोललो, त्यांना सर्व परिस्थिती समजवून सांगितली. मी मुख्यमंत्र्यांना भेटतोय हे त्यांना सांगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी तात्काळ चर्चेची तयारी दाखवली आहे. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या. मुलांच्या हिताचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे.