मंगलवार, 15 दिसंबर 2009

स्वतंत्र विदर्भासाठी गरज भासल्यास सार्वमत घ्या - राज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 01:39 PM (IST)

नागपूर - विकासासाठी राज्याचे विभाजन मान्य नसल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा फेटाळला. विदर्भ वेगळा करायचाच असेल तर त्यासाठी सार्वमत घ्या, अशी मागणी त्यांनी आज टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नक्षलवादावरही त्यांनी मत मांडले.

केंद्र सरकारने तेलंगणा राज्यनिर्मितीस हिरवा कंदील दाखविल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोर धरला. या मागणीचे इतर पक्षांनी समर्थन केले तर शिवसेनेने विरोध दर्शविला. मनसेची भूमिका मात्र गुलदस्त्यात होती. मनसे आमदार "भूमिका साहेब स्पष्ट करतील' असे सांगत होते. त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी आज स्वतंत्र विदर्भाला स्पष्ट विरोध दर्शविला. महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना त्याच्या विभाजनाची मागणी योग्य नसल्याचे मत त्यांनी प्रारंभीच मांडले. वेगळ्या राज्याच्या मुद्द्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदविलेले निष्कर्ष पत्रकारांकडून उपस्थित झाल्याचे पाहून त्यांनी "त्यावेळेची स्थिती वेगळी होती. आता बाबासाहेबांना या विषयात उपस्थित करू नका', असे सांगितले. "हा विषय वेगळ्या वळणावर नेऊ नका, तुम्ही माझ्याकडून काहीही वदवून घेऊ शकणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात ज्या पक्षाला भरभरून मते मिळाली, ज्यांचे आमदार, खासदार सर्वाधिक काळ विदर्भातून निवडून आले, त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना या मुद्द्यासाठी धारेवर धरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ठराविक "कोंडाळे'च हे तुणतुणे वाजवत असल्याचे ते म्हणाले. सर्वाधिक काळ सत्तेत असणाऱ्यांनी ज्या पद्धतीने बारामतीचा विकास घडविला तो विकास उर्वरित महाराष्ट्रात का झाला नाही, असा प्रश्‍न करून "मतदारांनी डॉक्‍टर बदलविण्याची गरज आहे', असे मत त्यांनी नोंदविले. व्यसनापोटी शेतकरी आत्महत्या करतात, हे मला मान्य नसल्याचे राज म्हणाले. वर्षानुवर्षे होणारा अन्याय, त्यामुळे वैदर्भीयांच्या मनात असलेली खदखद, राग समजून घ्यायचा आहे. येथील ज्वलंत प्रश्‍न समजून त्यावर काय उपाय करता येईल, याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर "विदर्भ विकासाचा अजेंडा' तयार करेन, असे ते म्हणाले.

नक्षलवाद्यांमध्ये कोण आहे, त्यांची पाठराखण कोण करीत आहेत, ते समजून घेण्याची आवश्‍यकताही त्यांनी विदित केली. संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला केवळ 14 खासदार उपस्थित राहत असतील तर त्यांची संवेदनशीलता लक्षात घ्यावी, असेही राज म्हणाले.

नेते आणि बिल्डरांमधील साटेलोटे उपस्थित करून राज यांना बोलते करण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. मात्र, त्यावर त्यांनी थेट बोलण्याचे टाळले. विदर्भातच काय, कृष्णा खोरे बांधकामातही भ्रष्टाचार झाल्याचे ते म्हणाले. हे प्रश्‍न वारंवार येत असल्याचे पाहून त्यांनी "तुम्हाला माझ्याकडून अविनाश भोसलें'चे नाव वदवून घ्यायचे आहे काय, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

चौफेर फलंदाजी
राज यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत आज पत्रकारांना टोलवले. एका प्रश्‍नावर त्यांनी "वाद घालता की प्रश्‍न करता', असा सवाल केला. तर, येथील पत्रकारांना बोलू द्या, उद्या तुमच्याशी मुंबईत बोलेन, अशी गुगली मुंबईच्या पत्रकारांना टाकली. पत्रकार संघाचे मंचावरील प्रतिनिधी प्रश्‍न करीत असल्याचे पाहून "मला चक्क घेरलं तुम्ही', असे म्हणत त्यांनी हशा पिकवला. छायाचित्रकारांना "पुरे आता' म्हणत थांबविले. छोट्या राज्यात कसा मोठा भ्रष्टाचार होतो, त्याचे उदाहरण मधू कोडाच्या रूपातून पाहा, असे सांगून लगेच "हा विनोद होता' अशी पुष्टीही जोडली. बाळासाहेबांचे उत्तर मी कसे देणार, असा प्रतिप्रश्‍न एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल त्यांनी केला. "तुम्हाला धमकी आहे. त्यासाठी बिहारमधून पाच जण आलेत. याबाबत काय,' या प्रश्‍नावर त्यांनी "आता धमकीच्या निमित्तानेही "ते' महाराष्ट्रात येत आहेत' असे म्हणत खसखस पिकवली. हे लिहू नका, असे सांगतानाच त्यांनी "मीडियाला सल्ला दिला म्हणून चौकट छापू नका', अशीही कोटी केली.
विदर्भाचा विकास झाला नसल्याचे मान्य आहे. मात्र, त्याच्या विकासासाठी राज्याचे विभाजन पर्याय ठरू शकत नाही. मेंदूला रक्तस्त्राव होत नाही म्हणून, डॉक्‍टर बदलणे समजण्यासारखे आहे. मात्र, मुंडकेच छाटणे हा उपचार कसा ठरू शकतो?
- राज ठाकरे.

राज ठाकरेंचे विदर्भात उत्साहात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 02:25 AM (IST)


नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सकाळी नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी विमानतळावर प्रचंड गर्दी केली. दिवसभर ते सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या प्रश्‍नावर ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे आज सकाळी आठ वाजता, शहरात येणार होते. त्यांच्या विमानास तब्बल तासभर उशीर झाला. तोवर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विमानतळावर जमले होते. घोषणाबाजी करीत होते. राज ठाकरेंचे आगमन होताच, ढोलताशांच्या गजरात, फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी समोर सरकले. तोवर सीआयएसएफच्या जवानांनी त्यांना कडे केले. " येणाऱ्या प्रत्येकांना मला भेटू द्या' असा आग्रह राज ठाकरे धरत होते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना फुले, पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिस त्यांना ढकलत होते. हा प्रकार बघून प्रशांत पवार पोलिसांवर आक्षरशः धावून गेले. त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांच्या डोळ्याला इजा झाली.

सोमवार, 14 दिसंबर 2009

तर "वर्ल्ड कप 2011' प्रदर्शित होऊ देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 12:15 AM (IST)

संतोष भिंगार्डे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी कोणती बाजू किंवा आंदोलने "वर्ल्ड कप 2011'मध्ये दाखविली आहेत, हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्हाला हा चित्रपट पाहायचा आहे. त्यामध्ये आमच्याविरोधात काही आढळले, तर आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

रवी कपूरने दिग्दर्शित केलेला "वर्ल्ड कप 2011' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्यावर रवी पुजारीने गोळीबार का केला, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे रवी पुजारीने अभिनेता व दिग्दर्शक रवी कपूरला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक वाद उफाळून येण्याची दाट शक्‍यता आहे. या चित्रपटात मनसेची आंदोलने दाखविण्यात आली आहेत.

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलने प्रथमच रुपेरी पडद्यावर' अशा प्रकारची बातमी "सकाळ'ने याआधीच प्रसिद्ध केली आहे; मात्र ही आंदोलने कशा पद्धतीने किंवा कशासाठी दाखविण्यात आली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यावरून आता मोठा संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. याबाबत मनसेच्या सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, ""हा चित्रपट आमच्याविरोधात आहे, असे आम्ही ऐकले आहे. टीव्हीवरील प्रोमोज, तसेच चित्रपटसृष्टीतील काही जाणकारांनी आम्हाला ही माहिती दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट आम्हाला आता पाहायचा आहे. चित्रपटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काही भलतेसलते आरोप केलेले असतील किंवा आमच्या आंदोलनांबाबत काही वेगळेच भाष्य केलेले असेल, तर आम्ही त्याची गंभीर दखल घेणार आहोत. हा चित्रपट महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही.''

दिग्दर्शक रवी कपूर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ""आम्ही त्यांना चित्रपट दाखविण्यास तयार आहोत. ते आमचे राजा आहेत आणि प्रजा कधीही राजाला दुखवीत नसते. त्यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली आहे.''

रविवार, 13 दिसंबर 2009

विदर्भाच्या लढाईसाठी राज ठाकरे उद्या नागपूरच्या रणांगणात!

नागपूर, १३ डिसेंबर
स्वतंत्र तेलंगणाच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भात घोषणा दिल्या जात आहेत. विदर्भातील प्रश्नांना केवळ वाचाच फुटावी म्हणून नव्हे, तर ते सुटावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या मंगळवारी नागपूरच्या रणांगणात उतरणार आहेत. राज ठाकरे यांच्या नागपुरातील आगमनामुळे थंड पडलेल्या विधानसभा अधिवेशनात जान येणार असून राज यांच्या स्वागताची जय्यत तयारी विदर्भातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावरील मनसेची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत.
राज्यात शिवसेना-भाजप युती गेले दोन दशकांहून अधिक काळ असून हिंदूत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेले हे दोन पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर मात्र दोन टोकांवर आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असून सेनेतून फुटून स्वत:चा पक्ष काढलेल्या राज ठाकरे हे त्यांच्या काकांप्रमाणेच अखंड महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहणार की, तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र विदर्भाची पाठराखण करणार, याचा उलगडा होणार आहे. विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या, कापूस माफियांचा प्रश्न, नक्षलवादी कारवाया, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सोयाबीन, धान या विदर्भाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरून ते सरकारवर तुटून पडतील, असे संकेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले असून १२ व्या विधानसभा अधिवेशनात शपथविधीच्या वेळी मुंबईत मनसेच्या आमदारांनी सपाचे आमदार अबू आझमी यांना दिलेल्या झटक्यापासून मनसेची व राज ठाकरे यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. अबू आझमी यांना कानफटात मारल्यामुळे तसेच, गोंधळ घातल्यामुळे मनसेच्या चार आमदारांना चार वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना विधानसभेच्या आवारातही प्रवेश करण्यास बंदी घातली असून राज ठाकरे यांच्यासमवेत रमेश वांजळे, वसंत गिते, राम कदम आणि शिशिर शिंदे हे चारही आमदार उपस्थित राहणार आहेत. यातील शिशिर शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ न घेतल्यामुळे वैधानिक पेचप्रसंग निर्माण झाला असून त्यांना शपथ द्यावयाची झाल्यास विधानसभेत शपथविधी पुरता प्रवेश देण्याचा ठरावा मांडावा लागणार आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत मनसेचे नऊ आमदार किल्ला लढवत आहेत. विदर्भात अधिवेशन घेण्यामागे येथील प्रश्न सुटणे, ही प्रमुख भूमिका असूनही विदर्भाच्या तोंडाला कायमच सरकारकडून पाने पुसली जात असल्याचा आरोप मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
नक्षलवाद्यांचा प्रश्न हा केवळ गडचिरोली व चंद्रपूर पुरता मर्यादित राहिलेला नसून तो केव्हाही नागपूपर्यंत येऊन ठेपेल, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपूरमध्येच मुक्काम ठोकतात. त्यांनी गडचिरोलीमध्ये जाणे आवश्यक आहे, तर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी एक दिवस तरी गडचिरोलीत मुक्काम करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान बाळा नांदगावकर यांनी केले आहे. गेल्या चार महिन्यात नक्षलवाद्यांकडून ५२ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली असून या शहिदांच्या विधवांना निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न राज ठाकरे उचलून धरणार असून गोसीखुर्द, बेंबळ तसेच, उध्र्व वर्धा प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि शेतक ऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून राज ठाकरे हे सरकारला जाब विचारणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. गेल्या पाच वर्षात सात हजार शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासन व पंतप्रधान पॅकेजमधील मदतीनंतरही शेतकरी आत्महत्या का करत आहेत तसेच, या पॅकेजमधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली जाणार आहे.
विमानतळापासून राज यांची भव्य रॅली निघणार असून विधानभवनाच्या प्रांगणातील मनसेच्या कार्यालयाला भेट देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हिवाळी अधिवेशनातील मोठा मोर्चा
हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नागपूर भेटीमुळे कुतूहल निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षात राज यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले असले तरी नागपूरमधील लोक राज यांनी शिवसेनेत असताना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून १९९३ साली काढलेल्या मोर्चाचीच आठवण आजही काढतात. १९९३ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज यांनी बेरोजगार व विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा काढला होता. नागपूरच्या गेल्या २५ वर्षाच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठा मोर्चा आदिवासी गोवारींचा होता. त्यात सुमारे ३० हजार गोवारी सहभागी झाले होते. त्यानंतरचा मोठा मोर्चा राज ठाकरे यांचा होता. तेव्हापासून आजपर्यंत राज ठाकरेंच्या मोर्चापेक्षा मोठा मोर्चा निघालेला नाही.
(
संदीप आचार्य)