गुरुवार, 21 जनवरी 2010

...तर एकही टॅक्‍सी रस्त्यावर फिरू देणार नाही - राज

सकाळ वृत्तसेवा
Friday, January 22, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - उत्तर प्रदेश व बिहारींसाठी मुंबई ही आश्रमशाळा नाही, त्यामुळे मुंबईत टॅक्‍सी परवाने मराठी युवकांना मिळाले नाहीत, तर एकही टॅक्‍सी मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारला दिला. सरकारने माझ्या या भूमिकेला धमकीच समजावे, असे राज यांनी पुन्हा-पुन्हा ठामपणे सांगितले.

मराठी भाषा येणाऱ्या टॅक्‍सीचालकांनाच परवाना देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय चोवीस तासात फिरविणाऱ्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध राज यांनी पत्रकार परिषदेत टीकेची तोफ डागली. त्यांच्या अंगातच लाचारी भिनलेली आहे, त्यांच्याकडे भाषा व प्रदेशाबद्दल आत्मसन्मान नाही. निर्णय घेण्याची क्षमताही नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांनी दक्षिणेतील राज्यांकडून काही तरी शिकावे व तेथील राज्यकर्त्यांकडे पार्ट टाईम नोकरी करावी, असा टोलाही राज यांनी लगावला.

मराठी युवकांसाठी राज्याच्या कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय मुख्यमंत्री एकटेच कसे काय फिरवू शकतात, असा सवाल करून राज म्हणाले, ""दिल्लीवरून दट्ट्या बसला म्हणूनच त्यांनी निर्णय बदलला. त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या टिकवायच्या आहेत. कारण त्यांच्यात स्वाभिमानच राहिलेला नाही. कर्नाटकात सिंचनाखालील जमीन विकत घ्यायची असेल, तर ती फक्त कानडी माणसाला विकत घेण्याचा हक्क आहे. कारण कर्नाटकात तसा कायदा आहे; पण आमचे सरकार लाचार आहे.''

उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेल्यांना स्थानिक भाषा कळत नाही. शहर कळत नाही, कुठे जायचे हे समजत नाही, तरीही त्यांना टॅक्‍सीचे परवाने दिले जाणार असतील, तर मराठी भूमिपुत्रांनी जायचे कुठे, असा सवाल राज यांनी केला. 4500 मराठी टॅक्‍सीचालकांना परवाने मिळाले, तर त्यांच्या कुटुंबीयांचे संसार उभे राहतील; पण मुख्यमंत्र्यांना फक्त खुर्चीवर आणून बसविले आहे, त्यांचे कर्तृत्व काहीच नाही, अशी टीका त्यांनी केली.

नव्याने देण्यात येणारे टॅक्‍सी परवाने हे फक्त मराठी युवकांनाच मिळाले पाहिजेत. तसेच ज्यांना आधी परवाने दिले आहेत, त्यांचेही परवाने तपासले पाहिजेत. त्यांना ठाणे, पुणे, नाशिक तरी माहीत आहे काय, असा सवालही राज यांनी केला.

विदर्भवाद्यांवरही शरसंधान
बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभाग महाराष्ट्रात येण्यासाठी टाहो फोडत आहे, पण काही टुकार व नाकाम लोकांनी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे धंदे सुरू केले आहेत. जे नेते राजकारणात पडद्याआड गेले आहेत त्यांना आता वेगळ्या विदर्भाच्या नावाने आज पुढे यायचे आहे. म्हणूनच काही नेत्यांचे हे धंदे सुरू आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांना फटकारले.

मंगलवार, 19 जनवरी 2010

मी झोपेतून दचकून उठतो - राज ठाकरे

मी झोपेतून दचकून उठतो - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 20, 2010 AT 12:53 AM (IST)


ठाणे - ''राज्यातील नागरिकांच्या अपेक्षा व सभेला गेल्यानंतर वाजणाऱ्या शिट्यांची मला मनापासून भीती वाटते. मी अनेक वेळा झोपेतून दचकून उठतो. बराच वेळ झोप लागत नाही. लोकांच्या अपेक्षा पाहून त्या पूर्ण करण्याची माझी लायकी आहे का, असा प्रश्‍न पडतो. परमेश्‍वराकडे माझे हेच मागणे आहे, की लोकांच्या अपेक्षेनुसार सर्व काही घडो,'' असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी रात्री येथे मोठ्या कळकळीने म्हणाले.

नवनिर्माण करिअर ऍण्ड रिसर्च अकादमीच्या वतीने नवनिर्माण गौरव पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर झालेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. "गडकरी रंगायतन'मध्ये सव्वा तासाहून अधिक वेळ चाललेल्या या मुलाखतीतून राज ठाकरे यांच्या मनाचे विविध पैलू उलगडत गेले. कलेपासून राजकारणापर्यंतच्या विषयांवर कवी अशोक नायगावकर, पत्रकार राजू परुळेकर आणि संदीप आचार्य यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. ठाकरे यांच्या हस्ते डॉ. संदीप केळकर, मंजिरी देव, सुरेंद्र दिघे, प्रदीप इंदूलकर, श्रीकांत बोजेवार आणि संदीप आवारी यांचा गौरव करण्यात आला.

मुलाखतीची सुरुवात तुम्ही भाषण कसे करता, कडक कसे बोलता, या प्रश्‍नाने झाल्यावर राज ठाकरे यांनी आपण खूप वाचत असल्याचा गैरसमज पसरला आहे, असे सांगून सर्वांना चकित केले. मात्र, "जीएं'च्या पुस्तकाचे चार खंड राज ठाकरे यांनी वाचले असल्याचे राजू परुळेकर यांनी ठामपणे सांगितले. त्यानंतर बोलण्याच्या ओघात राज यांनी सध्या "स्टोरी ऑफ सिंगापूर' हे पुस्तक वाचत असल्याचे सांगितले. त्यात मुंबई, ठाणे, पुण्याबद्दल वाचत असल्याचे वाटते, असेही ते म्हणाले. निवडक पुस्तकांबरोबरच दररोज वर्तमानपत्रांचेही वाचन होते, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीचे कल जाहीर होत असताना आपण चित्रपट पाहत होतो. शेवटी काय होईल, ते सायंकाळी कळणार आहे, असे वाटत होते, असेही ते मिश्‍कीलपणे म्हणाले. "व्हीसीआर' आल्यापासून आपण दररोज "कोणताही' चित्रपट पाहतो, असे त्यांनी सांगताच गडकरी रंगायतन हास्यात बुडाले.

गांधीजींनी ऐन भरात असलेले आंदोलन मागे घेतले होते. त्याचप्रमाणे आपणही आंदोलने मागे घेता, या प्रश्‍नकर्त्याच्या टिप्पणीवर राज ठाकरे म्हणाले, ""आंदोलनाने टोक गाठले असेल, तर ते लगेच खाली आणतो. 13 आमदार निवडून आल्यावर शिवतीर्थावर मेळावा घ्यायला पाहिजे होता. विजयामुळे पक्षातील केडर वेगळ्या पातळीला जाऊ शकतो. त्यातून उद्दामपणा व उन्माद येऊ न देण्याची काळजी घ्यावी लागते. एखादी गोष्ट ठरवून पुढे नेली पाहिजे. त्याच वेळी उडालेला धुरळाही शांत करायला हवा. विशेष म्हणजे, आंदोलनाच्या काळात लोक माझे किती काळ थोबाड बघणार, हेसुद्धा ठरवायला हवे.''

महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या व्यक्तींनी तेथील प्रांताप्रमाणे राहावे. त्यांनी तेथील संस्कृती जपावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले. आपल्याकडे आलेल्या लोकांनी येथील संस्कृतीप्रमाणे वागले पाहिजे. येथील मराठी भाषा त्यांना समजलीच पाहिजे. रिक्षा परवान्यासाठी मातृभाषेची अट आहे. मग परप्रांतीयांना परवाने कसे मिळतात, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. कायद्याचे बोलल्यावरही माझ्यावर केस दाखल केल्या जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राज्यात इंच इंच विकू, असा एककलमी कार्यक्रम राबविला जात आहे. या राज्यकर्त्यांना बाजूला केल्याशिवाय काहीही होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मी व माझ्या सहकाऱ्यांमध्ये तुलना करू नका. माझ्या पक्षाला साडेतीन वर्षे झाली असून, अनेक सहकारी उत्तम वक्ते आहेत. भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी व प्रमोद महाजन वगळता आणखी वक्‍त्यांचा संदर्भ देता येईल का, असा सवाल त्यांनी केला.

लोक भेटायला आल्यावर संकोच वाटतो. विशेषत: त्यांच्यासोबत फोटो काढणे जमत नाही. त्यामुळे मी अलिप्त राहतो. मात्र, मी दररोज अनेक लोकांशी बोलत असतो'' असेही राज ठाकरे म्हणाले.

येत्या महाराष्ट्र दिनी शिवतीर्थावर महाराष्ट्राचा खाद्यमहोत्सव आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर तेथे पुस्तक महोत्सवही भरविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
------------------------------------
सतत आंदोलने नकोत - राज
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, सुभाष पाशी यांच्या भ्रष्टाचाराबाबत आंदोलने का करीत नाही, असे विचारले असता राज म्हणाले, ""आंदोलनाने काहीही होत नाही. तुम्ही कायदाच माझ्या हातात द्या. आंदोलनाची कोणालाही भीती उरलेली नाही. माझ्यावर कितीही केस दाखल झाल्या तरी फरक पडत नाही. मात्र, कार्यकर्त्यांवरील केसेसचा त्यांना त्रास होतो.

मला माझ्या पद्धतीने जाऊ द्या. थोडी सबुरी ठेवा. प्रत्येकाच्या मनात राग असून त्यातून आंदोलने घडतात. सतत आंदोलने झाली तर सर्वांनाच कंटाळा येईल.''
----------------------------------
'त्यांच्या घरातच झोपड्या बांधा'
2014 मध्ये मनसेची राज्यात नक्की सत्ता येईल. तीच तीच पेस्ट-टूथब्रश आता लोकांनी बदलायला हवी, असे राज ठाकरे म्हणाले. झोपड्या तोडल्यानंतर हरकत घेणाऱ्या मानवाधिकार व "अग्नी'सारख्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात झोपड्या बांधायला हव्यात, असे त्यांनी सुनावले.
------------------------------------
'मुलांना स्वातंत्र्य द्या'
मुलांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व्यक्त करताना राज ठाकरे यांनी मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. मुलांना जेवढ्या गोष्टी करायच्या आहेत, त्या करू द्याव्यात. परीक्षा आल्यावर टीव्ही-इंटरनेट बंद केले जाते. मुलगा म्हणजे "सुसाईड बॉम्बर' आहे का, असा सवाल त्यांनी केला.

सोमवार, 18 जनवरी 2010

महापालिका निवडणुकांत तिकिटांसाठी मनसे तीन परीक्षा घेणार - राज

महापालिका निवडणुकांत तिकिटांसाठी मनसे तीन परीक्षा घेणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 19, 2010 AT 12:15 AM (IST)


ठाणे - 2011 मध्ये होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसेचे तिकीट मिळविण्यासाठी उमेदवारांना तीन परीक्षा द्याव्या लागतील. या परीक्षेत पास झाल्याशिवाय तिकीट मिळणार नाही, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

"नवनिर्माण करिअर ऍण्ड रिसर्च अकॅडमी'तर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कवी अशोक नायगावकर, पत्रकार राजू परुळेकर व पत्रकार संदीप आचार्य यांनी ही मुलाखत घेतली.

ठाकरे म्हणाले, ""महापालिकेतील अनेक नगरसेवकांना पालिकेतील कामकाज कळत नाही. प्रत्येक पालिकेत दोन-पाच मोजके लोक बोलतात; बाकीचे थंड बसतात. त्यांना काहीच समजत नाही. अशा व्यक्तींवर आपण शहराची व्यवस्था सोपवितो. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी पालिका निवडणुकांचा सिलॅबस तयार केला आहे. मनसेच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळविण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल; मात्र पास झाल्यानंतरही मी निवडेन तोच उमेदवार असेल.

मुलांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ""आत्महत्येशिवाय इलाज वाटत नाही, असे वाटत असेल, तर शिक्षणमंत्र्यांच्या मुस्कटात मारावी. राज्याला शैक्षणिक धोरण नाही. सर्वाधिक शिक्षणसंस्था महाराष्ट्रात असून, आत्महत्याही महाराष्ट्रात होत आहेत. "शिक्षणाच्या आयचा घो' या चित्रपटावरून गदारोळ होत असताना चित्रपटात काय म्हटले आहे, तेही पाहायला हवे.

राज ठाकरे आले, आयोजकांना झोडून गेले

राज ठाकरे आले, आयोजकांना झोडून गेले
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 18, 2010 AT 05:37 PM (IST)

पुणे - अपुरी जागा, विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ आणि नंतर स्वतः राज ठाकरे यांनीच खरपूस भाषेत आयोजकांचा घेतलेला समाचार यामुळे चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्काराच्या कार्यक्रमाला जमलेल्या श्रोत्यांचा सोमवारी हिरमुड झाला.

ओम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अकादमीने कोथरूडमधील एमआयटी संस्थेच्या ज्ञानेश्‍वर सभागृहात चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन केले होते. मात्र, पुरस्कारार्थी पत्रकार, त्यांचे स्नेही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि एमआयटीमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे सभागृह अपुरे पडले. राज ठाकरे यांच्या समर्थकांची घोषणाबाजी आणि त्याला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे कार्यक्रमाच्या सुरवातीपासूनच गोंधळाला सुरवात झाली.

सभागृहातील परिस्थिती पाहून कार्यक्रमात बोलण्याचा मला "मूड' नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगून टाकले. कार्यक्रमाची जागा चुकल्याचेही त्यांनी आयोजकांच्या निदर्शनास आणून दिले. पत्रकारमंडळी खूप कष्ट करून, वेळप्रसंगी उपाशी राहून आपल्यापर्यंत बातम्या पोचवित असतात. त्यांच्याशी खूप काही बोलायचे होते. मात्र आत्ता इथे काही बोलले, तर त्याचे गांभीर्य राहणार नाही. पुरस्कारार्थी पत्रकारांना नंतर भेटून मी त्यांच्याशी बोलेन, असे सांगून त्यांनी भाषण आटोपते घेतले. वंदे मातरम सुरू असताना विद्यार्थी एकमेकांशी गप्पा मारत असल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.