शनिवार, 5 अप्रैल 2014

पैशाच्या जोरावर गृहीत धरणाऱ्यांना जागा दाखवा'

नाशिक - स्वतः मंत्री, पुतण्या खासदार, मुलगा आमदार... सगळे यांना घरामध्ये पाहिजे. महात्मा जोतिबा फुले यांची हीच का समता, असा छगन भुजबळ यांना थेट प्रश्‍न उपस्थित करीत, यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. निवडणुकांमध्ये पैशाच्या जोरावर निवडून येता येते, हे गृहीत धरणाऱ्यांची मस्ती जिरवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

सिडकोत पवननगरला आज मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात श्री. ठाकरे बोलत होते. माजी खासदार राजाभाऊ गोडसे, सरचिटणीस वसंत गिते, अतुल चांडक, ऍड. उत्तमराव ढिकले, आमदार नितीन भोसले, महापौर ऍड. यतीन वाघ, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे, शहराध्यक्ष समीर शेटे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यात टोलनाक्‍यांच्या संरक्षणासाठी पोलिस आहेत. पण नागरिकांच्या संरक्षणाला नाही. टोल म्हणजे मंत्र्यांचा पॉकेटमनी. हाच पैसा निवडणुकांत ओततील. भुजबळही पैसे ओततील. ओतलाच तर निवडणुका आहेत, तुम्हीही यांना लुटा. पुतण्या खासदार, मुलगा आमदार, स्वतः मंत्री सगळेच यांना घरात लागते, हीच महात्मा जोतिबा फुलेंची समता का, अशी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना, महात्मा फुले यांचे नाव घेता, पण त्यांच्या नखाची तरी सर आहे का, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी उभे आयुष्य खर्ची घातले. शेणफेक सहन करीत, स्त्रीशिक्षणाचा हट्ट धरला. इकडे तुमच्या शिक्षणसंस्था लोकांच्या डोनेशनवर उभ्या राहत आहेत, अशी टीका केली.

श्री. ठाकरे यांनी 2010 मध्येच गुजरातचा दौरा केल्याचे सांगून, तेव्हाच आपण नरेंद्र मोदी यांच्यासारखा माणूस देशाचा पंतप्रधान असला पाहिजे, असे म्हटल्याची आठवण करून देत, नरेंद्र मोदींच्या विकासकामांची स्तुती केली. राज्यात मनसेचे भूमिपुत्रांच्या प्रश्‍नावर आंदोलन पेटले होते. तेव्हा एक खासदार बोलला नाही, अशी टीका केली. हिमाचल प्रदेशात भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या देण्याच्या हमीशिवाय प्रकल्पांना मान्यता देत नाहीत. अनेक राज्यांत स्थानिक प्रतिनिधी त्यांच्या अस्मितेविषयी जागरूकता दाखवितात. फक्त महाराष्ट्रात मात्र नेमका संकुचित विचार म्हणून आम्हाला चिरडले जाते. कुणी यावे इथे मतदारसंघ बांधावेत, असे म्हणून दोन मतदारसंघांतून आबू आझमी निवडून येतो. त्यांचे लोक आपल्या मतदारसंघात पाठवितात, असे सांगत स्थानिक मराठीच्या मुद्द्याला स्पर्श केला.

राज्याची संपूर्ण सत्ता द्या राज्याची संपूर्ण ताकद एकदा देऊन बघा, असे नेहमीचे आवाहन करीत ते म्हणाले, की राज्य कसे हाकले जाते, हे दाखवून देतो. लोकसभेत कसे लोक पाठवायचे याचा मतदारांनी विचार केला पाहिजे. कायदेमंडळ आहे. तेथे रस्ते, गटारीची कामे करण्यासाठी लोक पाठविणार का? डॉ. प्रदीप पवार
डॉक्‍टर आहेत. संवेदनशील आहेत, असे सांगून तिरुपती येथील मंदिराचे उदाहरण देत, मंदिरांचा जिल्हा असलेल्या नाशिकमधील अव्यवस्थेवर टीका केली.

19 ला टराटरा फाडतोच
मराठीच्या अस्मितेचा मुद्दा, विकासाला वेळ लागतो, हा नाशिक महापालिकेतील साक्षात्कार, महाराष्ट्रात बदल घडविण्यासाठी राज्याच्या पूर्ण सत्तेचे आवाहन आणि सरतेशेवटी सत्ताधाऱ्यांविषयीच्या नाराजीवर कोरडे ओढीत हमखास टाळ्या मिळविणाऱ्या वाक्‍यासह पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका या मुद्द्याभोवती राज ठाकरे यांचे भाषण होते. शिवसेनेबद्दल मात्र चकार शब्दही काढला नाही. मात्र त्याच वेळी 19 एप्रिलच्या जाहीर सभेत टराटरा फाडतोच असे जाहीर आव्हानही दिले.

समीर नव्हे आमीर भुजबळ
तत्पूर्वी आमदार नितीन भोसले यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करताना, आचारसंहितेपूर्वी 15 दिवस आधीच्या विविध जाहिरातबाजीत भुजबळांनी 50 कोटी खर्च केल्याचा आरोप केला. राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या बीओटी तत्त्वावरील रस्त्याचे श्रेय काका-पुतणे घेत असल्याची टीका करीत उड्डाणपुलाच्या तांत्रिक नियोजनात त्रुटी असल्यामुळेच आतापर्यंत सहा बळी गेल्याचाही आरोप केला.

उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी, वीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत असल्याचे सांगताना, 2009 ते 2014 या काळात 11 कंपन्यांचे संचालक असूनही कुठलेही कर न भरताच भागविक्री केल्याचा समीर भुजबळांवर आरोप केला. तसेच नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी दगडाला शेंदूर लावला तरी तोही
खासदार होईल, असा विश्‍वास असल्यामुळेच पालकमंत्री छगन भुजबळांसारख्या मोठ्या नेत्याविरोधात लढण्याची हिंमत असल्याचा दावा केला. या वेळी ऍड. ढिकले, सौ. डेरे यांच्यासह स्थानिकांची भाषणे झाली. अशोक सातभाई यांनी सूत्रसंचालन केले.

-माझी इंचभर तरी जागा दाखवा अन्‌ फुकट घेऊन जा.
-त्यांनी महाराष्ट्र लुटला, तुम्ही निवडणुकीत यांना लुटा.
-जेथे महिलांची उपस्थिती तेथे विजय असतो निश्‍चित.
-विकास करायचा तर, वेळ लागतोच.

मंगलवार, 1 अप्रैल 2014

मनसे खेळतेय 'डेंजर झोन'मध्ये!

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा; मात्र भाजपविरोधात मनसेचा उमेदवार ही राज ठाकरे यांची खेळी मतदारांच्या आकलनाच्या पलीकडची आहे. राज यांच्यापुढेही हा गोंधळ असावा. तार्किकदृष्ट्या योग्य न वाटणारे निर्णय जनतेच्या मनात उतरविण्यात राज यशस्वी होतील का? त्यांचे म्हणणे वरकरणी तर्कदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने ते कोणाच्या तरी हातातील बाहुले झाल्याचे मतदारांचा समज झाल्यास त्याचा दोष मतदारांवर कसा टाकता येईल? राज यांच्या मनसुब्यांमुळे मनसे "डेंजर झोन'मध्ये आहे.

एक कार दिल्लीला चालली आहे. या कारमध्ये पाच मंडळी बसलेली आहेत. सहाव्या भिडूला गाडीत यायचे आहे. पण, कारमध्ये जागाच नसल्याचे सांगून कारमधील एक जण या भिडूला आतमध्ये येऊ देत नाही. त्याला धडा शिकवायचा विचार भिडूने केला आहे. पण, कार तर दिल्लीला पोचली पाहिजे, असेही त्याला वाटते आहे. या भिडूला आतमध्ये न घेणाऱ्याला बाहेर ढकलता येणे शक्‍य नसल्याने त्याने गाडीच पंक्‍चर करायची ठरवली आहे. पंक्‍चर केलेली गाडी हलत नाही. पण, ती दिल्लीला पोचण्यासाठी हा भिडू पाठीमागून गाडीला धक्का मारत आहे. कशी आहे सिच्युएशन? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात उभे केलेले उमेदवार पाहिल्यावर या कारचे चित्र समोर उभे राहते. राज यांना महायुतीत येण्यास उद्धव यांनी विरोध केला, असे त्यांनी पुण्यातील सभेत सांगितले. याचाच दुसरा अर्थ असा, की मी युती करायला तयार होतो, असे त्यांना सांगायचे असावे. ""उद्धव यांनी त्यास विरोध केल्याने आता माझी औकात दाखवितो,'' असे आव्हान राज यांनी दिले आहे. हे "औकात' दाखविणे म्हणजे काय? तर सारी ताकद पणाला लावून शिवसेनेचे उमेदवार पाडतो, असेच राज यांना सांगायचे आहे. शिवसेनेची ताकद घटली, तर भाजपला मनसेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मोदी यांना पाठिंबा देऊन राज एक पाऊल पुढे आले आहेत. शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्यासाठी उद्धव यांनी मला भाग पाडले आहे, असे ते सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पडले, तर त्याला मी जबाबदारी नाही, उद्धव यांचा कोतेपणा त्यास जबाबदार असल्याचे त्यांचे सांगणे आहे.

हे सारे मतदारांना समजावून सांगणे अवघड आहे. त्यांची अडचण ही पुण्यातील सभेत लक्षात आली. पुण्यात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा आहे. त्याविरोधात मनसेने उमेदवार दिला आहे. आता थेट मोदींच्या पक्षाचा उमेदवार असताना परत मोदींना पाठिंबा द्यायचा म्हणून मनसेच्या उमेदवाराला मतदान कशाच्या आधारावर करायचे, हा गोंधळ मतदारांपुढे आहे. राज यांच्यापुढेही हा गोंधळ असावा. त्यामुळे त्यांनी पुण्यातील पहिल्या सभेत भाजपवर आणि भाजपच्या उमेदवारावर टीका करायचे टाळले. कदाचित, यानंतर होणाऱ्या पुण्यातील दोन सभांत ते भाजपला लक्ष्य करतीलही. भाजपचा उमेदवार पाडा आणि मोदींना पाठिंब्यासाठी मनसेच्या उमेदवाराला मत द्या, असे विसंगत वाटणारे आवाहन मतदारांच्या पचनी पडेल?

लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत मनसेची पाटी कोरी होती. मात्र, या निवडणुकीत मुंबईतील शिवसेना-भाजपचे सर्व उमेदवार पाडल्यानंतर मनसेची पाटी कोरी राहिली नाही. "मी कोणाला पाडण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी उमेदवार उभे केलेले नाहीत,' असे राज ठाकरे सांगत असले, तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका हा अंतिमतः शिवसेनेलाच बसणार आहे. शिवसेनेचे काही उमेदवार पराभवाच्या छायेत उभे करण्याचे काम मनसेने चोखपणे बजावले आहे. या साऱ्या बाबींचा फायदा अंतिमतः कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ज्या जागा धोक्‍याच्या वाटत होत्या, त्या जागांवर मनसेने उमेदवार उभे केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुस्कारा टाकला आहे. "लोकसभा निवडणूक लढविणे, हे राज ठाकरे यांच्यासाठी अपरिहार्य होते,' हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विधानही बरेच काही सांगून जाते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या दोन्ही सेनांना योग्य वेळी छानपैकी सांभाळले आहे. त्यांना सांभाळल्यामुळे कॉंग्रेसला थेट असा विरोधक तयार झाला नाही. (झालाच तर, कॉंग्रेसमधीलच मंडळी एकमेकांचे विरोधक म्हणून काम करतात.)

तार्किकदृष्ट्या योग्य न वाटणारे निर्णय जनतेच्या मनात उतरविण्यात राज यशस्वी होतील का? त्यांचे म्हणणे वरकरणी तर्कदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने ते कोणाच्या तरी हातातील बाहुले झाल्याचे मतदारांचा समज झाल्यास त्याचा दोष मतदारांवर कसा टाकता येईल? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज यांचा मनापासून विरोध आहे, असे मानले तरी त्यांची कृती प्रत्यक्षात उलटाच परिणाम घडवून आणणारी आहे. मराठी पाट्यांचे आंदोलन असो की टोलचा विषय असो, हे विषय असेच मध्येच मनसेकडून सुटल्यासारखे दिसतात. त्याचा "लॉजिकल एंड' नजरेस येत नाही. त्यांच्या भाषणासारखाच. त्यांच्या भाषणातही असेच मुद्दे एकावर एक आदळत असतात. विशिष्ट मुद्द्यावर ते आणखी काही बोलतील, असे वाटत असतानाच दुसराच मुद्दा ते भाषणात सुरू करतात.

मोदींना सहकार्याचा हात आणि दुसरीकडे त्याविरोधात उलटा परिणाम घडवून आणणारी कृती मतदारांच्या लक्षात येते. असे किती वेळा होणार? राज यांच्या मनसुब्यांमुळेच मनसे "डेंजर झोन'मध्ये आहे. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेसशी हात जवळ केलेले अरविंद केजरीवालही सध्या "डेंजर झोन'मध्ये आहेत. त्यांचेही वागणे तर्कदृष्ट्या जनतेला पटले नाही. कॉंग्रेसला विरोध करायचा आणि त्यांच्याच सहकार्याने सरकार स्थापन करायचे आणि त्यांनाच शिव्या देत सरकारमधून बाहेर पडायचे. हा "शो' म्हणून ठीक आहे. राजकारण म्हणून या "शो'चे प्रयोग सतत होऊ शकत नाहीत. या "शो'मुळे विश्‍वासार्हतेला धक्का बसतो. मनसेसाठीचा "डेंजर झोन' म्हणजे एकदम एक्‍झिट नव्हे; पण एक्‍झिटकडे जाणारा दरवाजा आहे. येथून "लाइफलाइन' मिळाली तर पुढे टिकता येते. लोकसभेची ही निवडणूक मनसेला लाइफलाइन देणारी ठरेल का? काही जागांवर यश मिळाले, तर मनसेला लाइफलाइन मिळेल. गेल्या वेळेप्रमाणे अनेक मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकावरच मनसेला मतदारांनी रोखले, तर हा "डेंजर झोन' अधिक गडद होईल.

राज यांचा 'संकल्प'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपणच वारस आहोत, असा दावा करणारे ठाकरे बंधू कधी तरी एकत्र येतील आणि राज्यावर पुन्हा एकदा "शिवशाही'ची गुढी उभारतील, अशी स्वप्ने पाहणाऱ्यांची झोप कायमची उडवण्याचे काम राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याचाच मुहूर्त साधून केले आहे. पुण्यातील जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा प्रारंभ करताना, त्यांनी आपल्या स्वभावधर्मानुसार नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी तर मारलेच; पण त्याच वेळी महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख घटकांमधील परस्परसंबंधांबाबत मतदारांमध्ये अधिकाधिक दुराव्याचे, तसेच अविश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याचे कामही केले. त्यानंतर लगोलग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबर समझोता अशक्‍य असल्याचे स्पष्ट केल्याने आता ही भाऊबंदकी अशीच पुढे चालत राहणार, यावर शिक्‍कामोर्तबही होऊन गेले.

खरे तर या निवडणुकीत मनसेने भाजपला बहुतांशी सूट देऊन केवळ शिवसेनेविरोधातच उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हाच राज यांचे डावपेच स्पष्ट झाले होते. शिवाय, त्याच वेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर करत, आपण भाजपबरोबर जाऊ इच्छितो हेही सूचित केले होते; पण या "गुगली'नंतरही पुण्यातील सभेत मात्र त्यांचा बहुतांश वेळ आपण हे का केले, याबाबतचा खुलासा करण्यातच गेला. राज यांना महायुतीत सामील होण्याची मनापासून इच्छा होती, हे त्यांच्या शब्दाशब्दांतून आणि देहबोलीतूनही स्पष्ट होत होते. "मला खरोखरच बरोबर घ्यायचे होते, तर ती चर्चा मीडियातून कशी होऊ शकते, त्यासाठी एक फोन करावयाचा होता. मी विचार केला असता...' या विधानातूनच त्यांची अंतरीची इच्छा जाहीर झाली, शिवाय त्याचवेळी मतदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देशही स्पष्ट झाला.

पण या सभेतील राज यांचा "दुसरा' हा अधिक रोखठोक होता. "मनसे' महायुतीत येऊ नये, ही उद्धव यांचीच इच्छा असल्याचे भाजप नेत्यांनीच आपल्याला सांगितल्याचे त्यांनी एकवीरादेवीची शपथ घेऊन जाहीर केले! त्यामुळे भाजप नेते तर अडचणीत सापडलेच; शिवाय आपण भाजपबरोबर जाऊ इच्छितो, हेही जाहीर करून ते मोकळे झाले. शिवाय, आपली "औकात' नेमकी काय आहे, ते या निवडणुकीत दाखवून देण्याचा विडाही त्यांनी मुळा-मुठेच्या साक्षीने उचलला आहे. त्यामुळे एकदा का लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बोजवारा उडाला, की मोदी-गडकरी आदी कंपनी विधानसभेच्या वेळी शिवसेनेशी काडीमोड घेऊन मनसेबरोबर जाण्याचा आग्रह धरणार, हेही उघड आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीतच शिवसेनेला नामोहरम करण्याचा राज यांचा इरादाही उघड झाला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत देशापुढील अजेंडा काहीही असला तरी, या दोन भावांची लढाई मात्र एकमेकांशीच राहणार आहे. एका अर्थाने ही निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाचीच लढाई आहे, हेच खरे!

सोमवार, 31 मार्च 2014

शिवसेनेला औकात दाखवतोच - राज ठाकरे

पुणे - 'लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्या महायुतीमध्ये घ्यायचे होते, तर चर्चा पसरविण्यापेक्षा मला थेट फोन करायचा होता. पण, शिवसेनेला मला युतीमध्ये घ्यायचेच नव्हते. माझी औकात काय, असे विचारणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत माझी औकात दाखवूनच देतो,'' असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत शिवसेनेला सोमवारी थेट आव्हान दिले. पंतप्रधानपदासाठी भाजपचे नरेंद्र मोदी यांनाच "मनसे' पाठिंबा देणार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

लोकसभा निवडणुकीतील "मनसे'च्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ राज ठाकरे यांनी फोडला. येथील नदीपात्रात सायंकाळी झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. या प्रसंगी "मनसे'चे सर्व उमेदवार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज-गडकरी भेट, तर शिवसेना आणि दै."सामना'तून त्यावर झालेली टीका, यावर राज ठाकरे यांनी भर देतानाच उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर प्रखर टीका केली. एकीकडे मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष करतानाच दुसरीकडे मात्र नितीन गडकरी यांची पाठराखण केली. "त्यांच्या पोटात एक आणि ओठात असा हा माणूस नाही. तो एक चांगला माणूस आहे, आजही माझे त्यांच्याबद्दल हेच मत आहे,' असे स्पष्ट करून ठाकरे यांनी गडकरींशी मैत्री असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसविरुद्ध लढण्याऐवजी "मनसे'च्या अंगावर येण्याचे कारण काय, असा प्रश्‍नही ठाकरे यांनी उपस्थित केला. कोणाला मदत व्हावी म्हणून नाही, तर विजयी होण्यासाठी, दिल्लीत मराठी माणसाचा आवाज काढणारे कोणीतरी असावे, यासाठीही उमेदवार उभे केले आहेत, असा दावाही राज यांनी केला.

ठाकरे म्हणाले, 'लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा प्रस्ताव गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या "सामना'तूनही त्याबाबत भाष्य प्रसिद्ध झाले होते. शिवसेनेने हात पुढे केला असून, "मनसे'ने टाळी द्यायला हवी, असे त्यात म्हटले होते. पण खरोखरच मनसेला बरोबर घ्यायचे होते, तर एक फोन तरी करायचा होता. सगळी चर्चा वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनच. महायुतीमध्ये मनसेला घेण्यास शिवसेनेचा नकार होता. शिवसेनेला फक्त आम्ही किती उदार आहोत, हेच दाखवायचे होते. शिवसेनेचा विरोध होता, असे भाजपचे नेते सांगत होते. याबाबत खरे-खोटे करायचे असेल, तर केव्हाही समोर येण्यास मी तयार आहे.''

मुंबई महापालिका ताब्यात असूनही शिवसेनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारता येत नाही. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ जाते, ही शिवसैनिकांशी प्रतारणा नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, ""पाहिजे तेव्हा वापरायचे, पाहिजे तेव्हा भेटायचे असे उद्योग यांचे.''

भारती विद्यापीठाकडून डोनेशन परत घ्या कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. विश्‍वजित कदम यांच्यावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. या देशाला कॉंग्रेसने आजपर्यंत लुटले. त्यामुळे निवडणुका हाच त्यांना लुटण्याचा एक मार्ग आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""भारती विद्यापीठात प्रत्येक प्रवेशासाठी डोनेशन घेतले जाते. ज्यांनी ज्यांनी डोनेशन दिले त्यांनी आता भारती विद्यापीठात जाऊन डोनेशन परत मागावे. त्यांना ते लगेचच मिळेल. प्रवेशापोटी कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या भारती विद्यापीठाकडून आता निवडणुकीत मतदारांना पैसे मिळणार आहेत. ते जरूर घ्या, पण "मनसे'लाच मत द्या,''

पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोंदी यांनाच पाठिंबा देतील, असे राज ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेसह भाजपमध्येही खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजपने आयोगाकडेही तक्रार केली. त्यावर राज यांनी या पुढेही "मोदी अजेंडा' राहणार असल्याचे सूचित केले. ठाकरे म्हणाले, ""या देशाला सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. असे नेतृत्व मोदी देऊ शकतात. म्हणूनच त्यांना पाठिंबा देऊ केला आहे.'' काही गोष्टी त्यांच्या मला पटल्या नाहीत. त्यामुळे मध्यंतरी मी त्यांच्यावर बोललो. परंतु ती टीका नव्हती. तर तो मैत्रीचा सल्ला होता, असेही खुलासा ठाकरे यांनी केला.

'बाळासाहेबांना आणि शिवसेनेला सोडून का गेला म्हणून मला विचारता. परंतु मला पक्ष सोडण्याची वेळ या नालायकांच्या गोतवळ्यामुळेच आली. बरे झाले शिवसेना सोडली, आता असे वाटते.''
- राज ठाकरे