मंगलवार, 1 अप्रैल 2014

मनसे खेळतेय 'डेंजर झोन'मध्ये!

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा; मात्र भाजपविरोधात मनसेचा उमेदवार ही राज ठाकरे यांची खेळी मतदारांच्या आकलनाच्या पलीकडची आहे. राज यांच्यापुढेही हा गोंधळ असावा. तार्किकदृष्ट्या योग्य न वाटणारे निर्णय जनतेच्या मनात उतरविण्यात राज यशस्वी होतील का? त्यांचे म्हणणे वरकरणी तर्कदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने ते कोणाच्या तरी हातातील बाहुले झाल्याचे मतदारांचा समज झाल्यास त्याचा दोष मतदारांवर कसा टाकता येईल? राज यांच्या मनसुब्यांमुळे मनसे "डेंजर झोन'मध्ये आहे.

एक कार दिल्लीला चालली आहे. या कारमध्ये पाच मंडळी बसलेली आहेत. सहाव्या भिडूला गाडीत यायचे आहे. पण, कारमध्ये जागाच नसल्याचे सांगून कारमधील एक जण या भिडूला आतमध्ये येऊ देत नाही. त्याला धडा शिकवायचा विचार भिडूने केला आहे. पण, कार तर दिल्लीला पोचली पाहिजे, असेही त्याला वाटते आहे. या भिडूला आतमध्ये न घेणाऱ्याला बाहेर ढकलता येणे शक्‍य नसल्याने त्याने गाडीच पंक्‍चर करायची ठरवली आहे. पंक्‍चर केलेली गाडी हलत नाही. पण, ती दिल्लीला पोचण्यासाठी हा भिडू पाठीमागून गाडीला धक्का मारत आहे. कशी आहे सिच्युएशन? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात उभे केलेले उमेदवार पाहिल्यावर या कारचे चित्र समोर उभे राहते. राज यांना महायुतीत येण्यास उद्धव यांनी विरोध केला, असे त्यांनी पुण्यातील सभेत सांगितले. याचाच दुसरा अर्थ असा, की मी युती करायला तयार होतो, असे त्यांना सांगायचे असावे. ""उद्धव यांनी त्यास विरोध केल्याने आता माझी औकात दाखवितो,'' असे आव्हान राज यांनी दिले आहे. हे "औकात' दाखविणे म्हणजे काय? तर सारी ताकद पणाला लावून शिवसेनेचे उमेदवार पाडतो, असेच राज यांना सांगायचे आहे. शिवसेनेची ताकद घटली, तर भाजपला मनसेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मोदी यांना पाठिंबा देऊन राज एक पाऊल पुढे आले आहेत. शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्यासाठी उद्धव यांनी मला भाग पाडले आहे, असे ते सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पडले, तर त्याला मी जबाबदारी नाही, उद्धव यांचा कोतेपणा त्यास जबाबदार असल्याचे त्यांचे सांगणे आहे.

हे सारे मतदारांना समजावून सांगणे अवघड आहे. त्यांची अडचण ही पुण्यातील सभेत लक्षात आली. पुण्यात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा आहे. त्याविरोधात मनसेने उमेदवार दिला आहे. आता थेट मोदींच्या पक्षाचा उमेदवार असताना परत मोदींना पाठिंबा द्यायचा म्हणून मनसेच्या उमेदवाराला मतदान कशाच्या आधारावर करायचे, हा गोंधळ मतदारांपुढे आहे. राज यांच्यापुढेही हा गोंधळ असावा. त्यामुळे त्यांनी पुण्यातील पहिल्या सभेत भाजपवर आणि भाजपच्या उमेदवारावर टीका करायचे टाळले. कदाचित, यानंतर होणाऱ्या पुण्यातील दोन सभांत ते भाजपला लक्ष्य करतीलही. भाजपचा उमेदवार पाडा आणि मोदींना पाठिंब्यासाठी मनसेच्या उमेदवाराला मत द्या, असे विसंगत वाटणारे आवाहन मतदारांच्या पचनी पडेल?

लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत मनसेची पाटी कोरी होती. मात्र, या निवडणुकीत मुंबईतील शिवसेना-भाजपचे सर्व उमेदवार पाडल्यानंतर मनसेची पाटी कोरी राहिली नाही. "मी कोणाला पाडण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी उमेदवार उभे केलेले नाहीत,' असे राज ठाकरे सांगत असले, तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका हा अंतिमतः शिवसेनेलाच बसणार आहे. शिवसेनेचे काही उमेदवार पराभवाच्या छायेत उभे करण्याचे काम मनसेने चोखपणे बजावले आहे. या साऱ्या बाबींचा फायदा अंतिमतः कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ज्या जागा धोक्‍याच्या वाटत होत्या, त्या जागांवर मनसेने उमेदवार उभे केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुस्कारा टाकला आहे. "लोकसभा निवडणूक लढविणे, हे राज ठाकरे यांच्यासाठी अपरिहार्य होते,' हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विधानही बरेच काही सांगून जाते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या दोन्ही सेनांना योग्य वेळी छानपैकी सांभाळले आहे. त्यांना सांभाळल्यामुळे कॉंग्रेसला थेट असा विरोधक तयार झाला नाही. (झालाच तर, कॉंग्रेसमधीलच मंडळी एकमेकांचे विरोधक म्हणून काम करतात.)

तार्किकदृष्ट्या योग्य न वाटणारे निर्णय जनतेच्या मनात उतरविण्यात राज यशस्वी होतील का? त्यांचे म्हणणे वरकरणी तर्कदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने ते कोणाच्या तरी हातातील बाहुले झाल्याचे मतदारांचा समज झाल्यास त्याचा दोष मतदारांवर कसा टाकता येईल? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज यांचा मनापासून विरोध आहे, असे मानले तरी त्यांची कृती प्रत्यक्षात उलटाच परिणाम घडवून आणणारी आहे. मराठी पाट्यांचे आंदोलन असो की टोलचा विषय असो, हे विषय असेच मध्येच मनसेकडून सुटल्यासारखे दिसतात. त्याचा "लॉजिकल एंड' नजरेस येत नाही. त्यांच्या भाषणासारखाच. त्यांच्या भाषणातही असेच मुद्दे एकावर एक आदळत असतात. विशिष्ट मुद्द्यावर ते आणखी काही बोलतील, असे वाटत असतानाच दुसराच मुद्दा ते भाषणात सुरू करतात.

मोदींना सहकार्याचा हात आणि दुसरीकडे त्याविरोधात उलटा परिणाम घडवून आणणारी कृती मतदारांच्या लक्षात येते. असे किती वेळा होणार? राज यांच्या मनसुब्यांमुळेच मनसे "डेंजर झोन'मध्ये आहे. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेसशी हात जवळ केलेले अरविंद केजरीवालही सध्या "डेंजर झोन'मध्ये आहेत. त्यांचेही वागणे तर्कदृष्ट्या जनतेला पटले नाही. कॉंग्रेसला विरोध करायचा आणि त्यांच्याच सहकार्याने सरकार स्थापन करायचे आणि त्यांनाच शिव्या देत सरकारमधून बाहेर पडायचे. हा "शो' म्हणून ठीक आहे. राजकारण म्हणून या "शो'चे प्रयोग सतत होऊ शकत नाहीत. या "शो'मुळे विश्‍वासार्हतेला धक्का बसतो. मनसेसाठीचा "डेंजर झोन' म्हणजे एकदम एक्‍झिट नव्हे; पण एक्‍झिटकडे जाणारा दरवाजा आहे. येथून "लाइफलाइन' मिळाली तर पुढे टिकता येते. लोकसभेची ही निवडणूक मनसेला लाइफलाइन देणारी ठरेल का? काही जागांवर यश मिळाले, तर मनसेला लाइफलाइन मिळेल. गेल्या वेळेप्रमाणे अनेक मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकावरच मनसेला मतदारांनी रोखले, तर हा "डेंजर झोन' अधिक गडद होईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें