शुक्रवार, 23 अप्रैल 2010

"आयपीएल'वरील बंदी हा उपाय नाही - राज

"आयपीएल'वरील बंदी हा उपाय नाही - राज
सकाळ वृत्तसेवा
Friday, April 23, 2010 AT 12:00 AM (IST)


मुंबई - "ललित मोदी यांच्या राजीनाम्याने प्रश्‍न सुटणार नाही. तर, "आयपीएल'मधील चुकीच्या गोष्टी मुळापासून नष्ट करायला हव्या. स्वच्छता करायचीच आहे, तर योग्य प्रकारे केली जावी. कोणालाही दया- माया दाखविण्याची गरज नाही,' असे ठाम मत नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) येथे व्यक्त केले. "आयपीएल' मुद्यावर सुरू असलेल्या अहमहमिकेवर त्यांनी प्रथमच मतप्रदर्शन केले.

आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शशी थरूर, ललित मोदी यांच्यावरही टीका केली. तसेच, "आयपीएल'वरील करमणूक कर कोणत्या आधारावर रद्द करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला. "आयपीएल'वर बंदी घालून त्याचे सामने थांबविण्याच्या शिवसेनेच्या मागणीचा त्यांनी समाचार घेतला. "आयपीएल'वर बंदी घालणे हा या समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही, असे मत ठाकरे यांनी नोंदविले.

ते म्हणाले, आजपर्यंत अनेक निवडणुकांवर आर्थिक भ्रष्टाचाराचे, राजकारणाचे आरोप झाले. म्हणून निवडणुका रद्द करा, अशी मागणी कधीही झाली नाही. तर, बॉलिवूडमधील वादही बऱ्याचदा रंगले. परंतु, चित्रपटसृष्टीवर बंदी घातली गेली नाही. "आयपीएल'वर बंदी घालण्यापूर्वी त्यातील चांगल्या बाजू विचारात घेतल्या गेल्या पाहिजे. "आयपीएल' हा एक क्रीडाप्रकार आहे. यामुळे अनेक गुणी व लपलेल्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. अनेक नवी खेळाडूंना वाव मिळाला आहे. शिवाय, आज महाराष्ट्रात अनेक ज्वलंत प्रश्‍न आहे. वीज, पाणी या समस्या आहेत. त्यामुळे केवळ "आयपीएल'वर लक्ष केंद्रित करण्याऐवजी या प्रश्‍नांकडेही गांभीर्याने बघितले गेले पाहिजे.

एका वृत्तपत्रांमध्ये ललित मोदी यांचा उल्लेख "घाशीराम कोतवाल', असा आला आहे. त्याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. मोदींना वृत्तपत्राने अतिशय समर्पक उपमा दिल्याचे ते म्हणाले. तर, शशी थरूर हे मला कधी कळलेच नाही, असा उपहास त्यांनी बोलून दाखविला. शशी थरूर हे "अफेअर्स मिनिस्टर' असल्याची टिपन्नीही त्यांनी केली.