बुधवार, 4 अक्तूबर 2017

राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आज मनसेचा संताप मोर्चा; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अजूनही मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसे आणि प्रशासनात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही मोर्चाची संपूर्ण तयारी केली आहे. आता काही झाले तरी मोर्चा निघणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा निर्धार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. लोकशाहीत मोर्चाला परवानगी दिली जात नाही, हा कुठला नियम म्हणायचा. हा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली.




मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मनसेच्या या मोर्चाला परवानगी दिली जात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तांत्रिकरित्या तशी परवानगी देणे पोलिसांना आणि प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नसली तरी त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. मेट्रो चित्रपटगृहापासून पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच चर्चगेट स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मनसेकडूनही या भागात मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मरिनलाईन्स स्थानकापासून रेल्वे मुख्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावर मनसेचे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. तर चर्चगेट स्थानकाच्या परिसरात एक लहानसे व्यासपीठ उभारले जात असून या ठिकाणी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चर्चगेट स्थानकाचा परिसर बॅरिकेडस लावून बंदिस्त करण्यात आला आहे.



* मनसेच्या मोर्चाला रेल्वे प्रवासी संघटनांचा पाठिंबा
* मोर्चाला परवानगी नाकारणे हा तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- संदीप देशपांडे
* लोकशाहीत मोर्चाला परवानगी देणार नाही, हा कुठला नियम- संदीप देशपांडे
* ब्रिटीशही मोर्चांना परवानगी देत होते, मात्र हे सरकार परवानगी देत नाही,
* आमची तयारी पूर्ण; मोर्चा निघणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ- संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस
* मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन

रविवार, 1 अक्तूबर 2017

‘माझे असत्याचे प्रयोग’; राज ठाकरेंचं मोदींवर पुन्हा टीकास्त्र

महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रातूनही राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान धादांत खोटे बोलतात, अशी टीका राज ठाकरे यांनी शनिवारी केली होती. त्या टीकेला धरुन राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढत मोदींना पुन्हा लक्ष्य केले. राज यांनी त्यांच्या व्यंगचित्राला ‘एकाच मातीतील दोघे,’ असे शीर्षक दिले आहे.
राज ठाकरेंनी गांधी जयंतीनिमित्त रेखाटलेल्या छायाचित्रात महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी दिसत आहेत. यामध्ये गांधींच्या हातात ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. महात्मा गांधींच्या बाजूला उभ्या असलेल्या मोदींच्या हातातही राज ठाकरेंनी एक पुस्तक दिले आहे. राज ठाकरेंनी या पुस्तकाला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव दिले आहे. ‘पंतप्रधान मोदी धादांत खोटे बोलतात. इतक्या मोठ्या प्रमाणात खोटे बोलणारा पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही,’ अशी टीका राज यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या हातात राज यांनी ‘माझे असत्याचे प्रयोग’ हे पुस्तक दिले आहे. मोदी खोटे बोलतात. त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहिल्यास त्याचे नाव ‘माझे असत्याचे प्रयोग’ असेल, असे राज यांना सुचवायचे आहे.
पंतप्रधान मोदींवरील व्यंगचित्राला राज ठाकरेंनी ‘एकाच मातीतील दोघे’ असे शीर्षक दिले आहे. महात्मा गांधी आणि मोदी हे एकाच मातीतील, म्हणजेच गुजरातमधील आहेत. मात्र या दोघांमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. महात्मा गांधी कायम खरे बोलायचे. त्यामुळेच त्यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधींच्याच मातीमधील, म्हणजेच गुजरातमधील मोदींनी त्यांचे आत्मचरित्र लिहिल्यास त्याला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव द्यावे लागेल, असे राज यांनी व्यंगचित्रातून सुचवले आहे.