मंगलवार, 11 अगस्त 2015

सरकारकडून चांगल्या रनऐवजी चिकी रन- राज

ठाणे - पूर्वीच्या सरकारमध्येही भ्रष्टाचार होता; तर आताही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सरकारकडून चांगल्या रनऐवजी चिकी रन काढल्या जात आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लगावला.

राज्याचे वाटोळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा. मी सत्तेसाठी नाही; तर आपली सत्ता रस्त्यावर आहे, असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले. या परिस्थितीत तुम्ही जनतेसोबत राहा, असे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. मनसेच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये ठाण्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला; मात्र त्या मेळाव्याला राज्यस्तरीय मेळाव्याचे स्वरूप आले. या मेळाव्यातच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्याही जाहीर करण्यात आल्या.

राज्यात आलेल्या उद्योगांमध्ये मराठी मुला-मुलींनाच रोजगार मिळाला पाहिजे, अशी मागणी करीत ठाकरेंनी पुन्हा मराठी कार्ड कायम असल्याचे स्पष्ट केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशालीसारखे राहिले पाहिजे. ज्या ठिकाणी मराठी माणसे आहेत, तेथे त्यांना कार्यकर्त्यांचा आधार वाटला पाहिजे. महाराष्ट्राचे वाटोळे करणाऱ्यांना आपण सत्तेवरून खाली खेचू. त्यात कितीही खटले झाले तरी काळजी करू नका. सत्ता आल्यावर खटले मागे घेऊ, असा कार्यकर्त्यांना सल्ला देत राज ठाकरे यांनी आपली सत्ता रस्त्यावर असल्याचे स्पष्ट केले.

केंद्र व राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. सरकार बदलले तरी बातम्या त्याच आहेत. महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांची आत्महत्या, टोल आदी प्रश्‍नच कायम आहेत. काही बदल झाल्याचे वाटतच नाही. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाचा भार कमी करण्याऐवजी शिक्षणमंत्री वजनकाट्याने दप्तराचे वजन मोजतात. एवढ्या लवकर सरकारचा भंडाफोड होईल असे वाटले नव्हते, अशी टीका ठाकरे यांनी केली. याकूबच्या फाशीच्या वेळी मीडियाकडून चवीने चर्चा केली गेली. याकूबच्या मुलाखती घेतल्या गेल्या; तर छोटा शकील वर्तमानपत्रांना मुलाखती देत आहे. टायगर मेमनने आईला फोन केला, अशी माहिती पोलिसांकडूनच दिली जात आहे.

ओवेसी बंधू भडकावणारी वक्तव्ये करीत आहेत; मात्र त्यांच्यावर एकही केस दाखल नाही. त्यामुळे सरकारी आशीर्वादाने हिंदूंची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारचा दंगली व बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यातून सरकारच्या बाजूने मतदान होऊन सत्ता कायम राहील, असा डाव आखला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. कोकणामध्ये अतिरेकी शिरल्याच्या बातम्या आहेत. अतिरेकी खरे आहेत की निवडणूक झाल्यावर गायब होतील, असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बोगस आधार कार्ड वाटली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यावरील निकालासाठी तब्बल 22 वर्षे लागली; मात्र गणपती व दहीहंडीबाबतचा निर्णय झटपट होतो. 20 फुटांची दहीहंडी करून घरातच फोडायची का, असा सवाल ठाकरे यांनी केला. देशभरात न्यायाधीशांची नियुक्ती झाल्यावर त्यांना मोबाईल, इंटरनेट आणि वर्तमानपत्रांपासून दूर ठेवा. त्यानंतर कायद्याने निर्णय येतील, असे ठाकरे यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर मौनी पंतप्रधान म्हणून टीका केली जात होती; मात्र आता मन की बात ही मौन की बात झाली आहे. देश भयभित झाला असताना पंतप्रधान मोदी यांनी बोलले पाहिजे. मोदी ही देशाची शेवटची आशा आहे. अशा परिस्थितीत ते गुजरातचा जप करीत बसल्यास कसे होणार, असा सवालही त्यांनी केला.
भाजपला घाबरविण्यासाठी शिवसेना-मनसे यांच्यातील युतीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. कोणाशीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट करीत राज ठाकरे यांनी शिवसेनेबरोबरील युतीच्या चर्चेचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारप्रमाणे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करण्याचा भाजप सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा बळी दिला जात आहे. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडूनही खतपाणी घातले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात जाहीर चर्चा व्हायला हवी; मात्र कोणीही चर्चेसाठी पुढे येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर महापुरुषांना जातीची लेबल लावली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सलमानच्या शिक्षेवेळी सलीम खान यांच्याबरोबरील वैयक्तिक संबंधांमुळे आपण त्यांची भेट घेतली, पण आपण सलमानची शिक्षा चुकीची आहे असे म्हटले नव्हते. सलमान खान हा बेअक्कल आहे; तर महेश भट, नसिरुद्दीन शहा आणि राम जेठमलानींसारख्या व्यक्ती याकूबची बाजू घेत होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तहसीलदारांकडून गैरव्यवहार करीत परप्रांतीयांना दाखले दिले जात असल्याचा आरोप करीत रिक्षा परवान्यासाठी एकाच व्यक्तीला तीन दाखले मिळाले असल्याची कागदपत्रे त्यांनी दाखविली.

बदल्यांसाठी 100 कोटी
राज्य सरकारच्या एका विभागात बदल्यांसाठी 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही चांगली व्यक्ती आहे, पण त्यांना काम करू दिले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांचे हात-पाय बांधले आहेत; तर त्यांचा राज्यातील काही नेत्यांकडूनही छळ सुरू आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

मराठी माणसांचा जीव मुठीत
ठाण्यात इमारती पडत असून, महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. या इमारतीतील मराठी माणूस जीव मुठीत घेऊन राहत आहे; तर सगळे जण पैसे कमावण्यासाठी गुंतले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरेंचे बोल...
- उद्धव ठाकरे यांच्याशी मनोमीलनाच्या बातम्या निराधार
- भाजपला घाबरवण्यासाठी शिवसेनेने या बातम्या पेरल्या
- या सरकारला दंगली, बॉंबस्फोट हवे आहेत. त्यातून मते पदरात पडावीत यासाठी हे राजकारण सुरू आहे
- बदल्यांसाठी एका खात्यात 100 कोटी घेतले गेले
- सरकार बदलले तरी परिस्थितीत फरक नाही
- फडणवीस चांगले; पण मोदी-शहा त्यांना काम करू देत नाहीत
- ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद दुर्दैवी; पुरंदरेंच्या नावावर राजकारण खेळताना लाज नाही वाटत
- राष्ट्रवादी नावाचा पक्ष आल्यावर हे प्रकर्षाने सुरू झाले. पवारांनी जातीयवादाला खतपणी घातले
- 55 वर्षांनी कळले, महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे
- तहसीलदारांनी पैसे खाऊन परप्रांतीयांना सर्टिफिकेट दिली. यातील 30 ते 40 टक्के लोक बांगलादेशातून आले. यांनाच मतदानाचा अधिकार मिळणार
- याकूबसाठी मध्यरात्री सुप्रीम कोर्ट कसले उघडता? मीडियीनेही त्याच्या फाशीचा खेळ केला
- सलमान खान बेअक्कल
- ओवेसी बंधू हरामजादे. ही बुरशी. महाराष्ट्रात काही वेडंवाकडं घडवण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे
- न्यायाधीशांचे मोबाईल, नेट, वर्तमानपत्रे, टीव्ही काढून घ्या. त्यांची प्रसिद्धी बंद करा. मग पटापटा निर्णय येतील
- नरेंद्र मोदींची मन की बात नव्हे; तर मौन की बात
- मोदी ही शेवटची आशा. तेच जर असे वागायला लागले तर काय होणार
- इमारती कोसळताहेत, पण पालिकांचे लक्षच नाही
- कितीही नव्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या तरी, तेथे मराठी माणसांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत
- कार्यकर्त्यांनो, अन्याय तेथे लाथ घाला