सोमवार, 3 नवंबर 2014

मनसे सरचिटणीसपदाचा वसंत गितेंचा राजीनामा

नाशिक - लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही सपाटून मार खालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा नाशिकमध्ये मनसे रुजवणारे माजी आमदार वसंत गिते यांनी दिला आहे. तसेच जिल्हाध्यक्षपदाचीही राजीनामा सचिन ठाकरे यांनी दिला आहे. 

या दोघांनीही वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणास्तव पदाला न्याय देणे शक्‍य होत नसल्याचे कारण देत पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्याची विनंती पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या बुधवारपासून (ता. 5) नियोजित नाशिक दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडल्याने मनसेमध्ये खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी गिते हे पक्षातून बाहेर पडतील अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज यांनी रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केल्याने या अटकळीवर पडदा पडला होता. तसेच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून गिते यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र गिते यांना यशाने हुलकावणी दिली. शिवाय राज्यातही पक्षाला केवळ एका आमदारांवर समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत गिते पक्षातून बाहेर पडण्याचा विचार तरी करत नाही ना? अशा शंकेची पाल नाशिककरांच्या मनात चुकचुकू लागली आहे. गिते आणि ठाकरे यांचा पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे अथवा नाही याबद्दलचे स्पष्टीकरण पक्षाकडून करण्यात आलेले नाही. मुलगी उर्वशीला अपघात झाल्याने राज्याचा राज यांचा दौरा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे राज हे नियोजित दौऱ्यानुसार बुधवारी (ता. 5) नाशिकमध्ये मुक्कामी येतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
गितेंचे "टाईमिंग‘ चुकलेसध्यस्थितीत "पॉलिटिकल ऍक्‍टिव्हिटी‘ नसताना गिते यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याने त्यांचे "टाईमिंग‘ चुकल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. पण तरीही स्थानिक पक्षातंर्गत गटातटाच्या राजकारणात संघटनात्मकदृष्ट्या वरचष्मा राहावा म्हणून कदाचित गिते यांनी हे पाऊल उचलले असावे, असा तर्क राजकीय अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेतील 37 पैकी गिते यांना मानणाऱ्या 18 नगरसेवकांनी राजीनामा देण्याच्या हालचाली सुरु केल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. महापालिका कामकाजाच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार महापौर अशोक मुर्तडक यांच्याविरुद्ध अविश्‍वास येऊ शकत नाही आणि स्वतंत्र गट स्थापन होण्यासाठी पुरेशी नगरसेवक संख्या कितीपत जुळणार याबद्दल शंका आहे. म्हणूनच राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी निकालानंतर नाशिकमध्ये मी ठाण मांडून बसणार असेही राज यांनी नाशिककरांना अश्‍वस्त केले होते. नाशिककरांनी त्यावर विश्‍वास न ठेवता मनसेचे इंजिन तीनही विधानसभा मतदारसंघात नापसंत केले.

राज यांच्या मुलीला अपघात; उद्धव ठाकरे भेटीस

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी हिला अपघात झाल्याने राज यांचा राज्यव्यापी दौरा लांबणीवर पडला आहे. उर्वशीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही पत्नीसह हिंदुजा रुग्णालयात गेले होते.  

विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबरपासून आपला राज्यव्यापी दौरा आयोजित केला होता. काल (ता.1 ) त्यांनी नगर जिल्ह्यातील जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेट दिली. या संदर्भातील चौकशी करण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे मुंबईत परतले होते. मात्र, रविवारी रात्री उशिरा राज यांची कन्या उर्वशीच्या गाडीला एस. व्ही. रोडवर अपघात झाला. उर्वशीला माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या पायाचे हाड तुटले असून, चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

या घटनेमुळे राज यांचा पुढील दोन-तीन दिवसांचा दौरा लांबणीवर टाकला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर राज यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. आज (मंगळवार) ते कल्याण-डोंबिवली येथे जाणार होते.

रविवार, 2 नवंबर 2014

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई - नगर जिल्ह्यातील जवखेडा (ता. पाथर्डी) येथील दलित हत्याकांडाप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

जवखेडा गावामध्ये संजय जाधव, सुनील जाधव आणि जयश्री जाधव या तिघांची हत्या करण्यात आली होती. यांच्या नातेवाईकांची राज ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली होती. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत जवखेडा हत्याकाडांची वेगाने चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांना बळ आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही केले. 

या भेटीत राज ठाकरे यांनी ऊसाला पहिला हप्ता 2500 रुपये, तर अंतिम दर तीन हजार रुपये द्या, अशी मागणी केली. महाराष्ट्राला पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्याची मागणी करत पर्यटनाबाबत आम्ही प्रेझेंटेशन सादर करू, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. नाशिक महानगरपालिकेत आयुक्त नसल्याने अनेक कामे रखडली असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.