शनिवार, 19 नवंबर 2016

मोदी, दोन उंदीर पकडण्यासाठी घर जाळले! - राज

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळा पैश्याचा एवढा तिरस्कार होता, तर मग तुम्ही निवडून आलाच कसा. 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा खर्च भाजपने अद्याप दिलेला नाही. पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका बँकेतून पैसे काढून झाल्या का?, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडत या निर्णयाबाबत नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली.

राज ठाकरे म्हणाले -
- नोटबंदीचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतलेला नाही.
- रोज नवीन नियम येत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.
- निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचार केला नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.
- नोटबंदीने देश बदलत असेल तर स्वागत आहे.
- बँकेच्या बाहेर रांगेत उभे राहिलेले नागरिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पाणीही स्वीकारत नाहीत, हे कशामुळे पहायला हवे.
- नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय फसला तर, देश खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही.
- निर्णय मागे घेणार नाही, असे ते म्हणत आहे, मी पण म्हणतो मागे घेऊ नका. पण, निर्णय फसल्यास देश किती मागे जाईल हे सांगणे कठीण आहे.
- काळा पैसा कोणाकडे आहे, हे माहिती असूनही अद्याप छापे पडताना दिसत नाही. 
- रांगेत उभे राहून सर्वसामान्यच मरत आहेत. काळा पैसेवाला एकतरी अद्याप मेला आहे का?
- देशातील फक्त साडेचार टक्के लोक प्राप्तीकर भरतात. देश रोख व्यवहारावर चालतो. हा सर्व काळा पैसा नाही.
- पंजाबची निवडणूक लढविताना अरुण जेटलींनी फॉर्म भरताना रोख रक्कम 82 लाख रुपये दाखविली होती. तेव्हा नाही विचारले काळा पैसा किती आहे. आज ही परिस्थिती अरुण जेटलींवर आली असती तर त्यांनी अडीच-अडीच लाख कसे भरले असते. 
- दहा महिन्यांपासून या निर्णयाबाबत काम सुरु आहे. मग, आठ दिवसांपूर्वी नोटांच्या कागदाबाबतची टेंडर कशी काढण्यात आली.
- नोटबंदी करताना नागरिक एटीएममधून पैसे काढतात हे माहिती नव्हते का? एटीएमच्या बदलासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च आहे.
- बनावट नोटा या साडेचारशे कोटी रुपयांच्या नोटा असताना तुम्ही साडे सतरा लाख कोटी रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. दोन उंदीर पकडण्यासाठी अख्खे घर जाळण्याचा हा प्रकार आहे.
- दहा महिन्यांपूर्वी नोटा छापण्यास सुरवात केली, मग उर्जित पटेलांची सही कशी. उर्जित पटेल रिलायन्समध्ये नोकरीत होते. 
- जगभरात आर्थिक मंदी आल्यानंतर आपला देश फक्त कॅश इकॉनॉमीवर तरला होता.
- मोदींनी म्हटले आहे 50 दिवस द्या, चला आम्ही द्यायला तयार आहोत.
- मोदीजी सकाळी गोव्यात भाषणात हुंदका येतो आणि पुण्यात शरद पवार यांचे बोट धरून राजकारण शिकलो असे म्हणत आहेत.
- संघप्रमुख मोहन भागवत याविषयी काहीच बोलले नाहीत. संघातील, भाजपमधील लोक नाराज आहेत.
- जिल्हा बँकांवर घातलेल्या बंदीबाबत रिझर्व्ह बँक आणि पंतप्रधान एकमेकांवर निर्णय ढकलत आहेत.
- या देशात दंगली घडतील मी यापूर्वीच म्हटले होते, आता सर्वोच्च न्यायालयानेही हेच म्हटले आहे.
- देशाचा विचार न करता पैशाबाबत असा निर्णय घेता, हा निर्णय घेतल्यानंतर तुमचाच खासदार लग्नात 500 कोटी खर्च करतो. मुलीच्या साडीची किंमत 17 कोटी होती.
वृत्तपत्रातील जाहिराती कमी व्हायला लागल्या. टीव्हीवरही फक्त ‘पतंजली‘च्याच जाहिराती आहेत. या जाहिराती कुठून येतात, हे माहीत आहेच
- अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागणार आहे, त्यामुळे स्वतःच्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे.
- नोटाबंदीची हे प्रकरण सावरले गेले तर आनंदच आहे. या निर्णयातून काहीतरी चांगले घडो ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.