शनिवार, 20 नवंबर 2010

पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात मनसेचा मोर्चा

पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात मनसेचा मोर्चा
पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या घरावर पडलेला दरोडा अन् नाशिकरोड येथे पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिन्यांच्या झालेल्या चोरीच्या घटनेने गुन्हेगारांची मुजोरी व पोलीस यंत्रणेची हतबलता समोर आल्याची तक्रार करतानाच ज्या शहरात खुद्द पोलीस सुरक्षित नाही, तेथे सामान्य नागरिकांचे काय, असे प्रश्न उपस्थित करत मनसेने शनिवारी पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शहराला भयमुक्त करण्याची मागणी केली. सातत्याने सुरू असणारे चेन स्नॅचिंगचे प्रकार आणि अलिकडेच घरात शिरून महिलांवर झालेले प्राणघातक हल्ले या पाश्र्वभूमीवर मोर्चात महिलांची उपस्थितीही लक्षणिय होती. आ. वसंत गीते, आ. उत्तम ढिकले, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
चोऱ्या-घरफोडय़ा, वाहने जाळण्याच्या घटना, पोलीस असल्याचे भासवून वृद्धांना लुबाडणाऱ्या इराणी टोळीने घातलेला धुमाकूळ, बँकेत पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेऊन पैसे लांबविण्याचे प्रकार अशा असंख्य गुन्ह्यांच्या मालिकेने शहरासह जिल्ह्यातील एकूणच कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असताना पोलिसांनी ते रोखण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेकडे यापूर्वी व्यंगचित्रांच्या माध्यमातून लक्ष वेधणाऱ्या मनसेने मोर्चात त्याच स्वरूपाचे फलक झळकावत पुन्हा सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ‘पोलिसांचा धाक सामान्यांना, चोरांचा धाक पोलिसांना’,  ‘सरकार बसलं दिल्लीत, चोऱ्या होतात गल्लीत, शासन सुस्त, चोर मस्त’ अशा आशयाच्या फलकांसोबत मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बी. डी. भालेकर मैदानावरुन निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख भागांमधून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलीस आयुक्तांनी शहरवासियांचा भ्रमनिरास केला असून वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही दरोडय़ांचे सत्र सुरू असल्याने शहरात पुरेशी यंत्रणा अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्याचे आ. गीते यांनी नमूद केले. या संदर्भात मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
नाशिक भयमुक्त करण्यासाठी सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक पोलीस ठाण्याला अधिकाधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर झाला असून जिल्ह्यासाठी नव्याने पोलीस भरती करावी, यापूर्वी पोलिसांनी तडीपार केलेल्या पण शासनाकडून अपिलात सुटून आलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करावी अशा मागण्या मनसेने केल्या. तसेच रात्रीच्यावेळी शहरात गस्त घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक, नव्याने निर्माण झालेल्या इंदिरानगर, उपनगर व आडगांव पोलीस ठाण्यात नवीन कर्मचारी वर्ग आणि पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.   

सिडको करणार उद्यान खुले मनसेने केला पाठपुरावा

सिडको करणार उद्यान खुले मनसेने केला पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 21, 2010 AT 12:18
पनवेल - नवीन पनवेल येथील सेक्‍टर-11 मध्ये सिडकोने तयार केलेले अल्ट्रा मॉडर्न उद्यान तयार होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र हे उद्यान सिडकोने अजूनही खुले न केल्याने येथील परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिडकोच्या वतीने उद्यान खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोचे उद्यान अधिकारी टी. आर. कांबळे यांनी दिली आहे.  याबाबत पनवेल येथील मनसेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात आला. काही महिन्यांपासून तयार असलेले उद्यान केवळ उद्‌घाटनाअभावी बंद ठेवण्यात आले. मात्र या प्रकरणी मनसेने सिडकोकडे विचारणा केली. तसेच सात दिवसांच्या आत उद्यान खुले न केल्यास मनसेच्या पद्धतीने उद्यान खुले करण्यात येईल, असा इशारा नवीन पनवेल मनसेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर येरुणकर यांनी दिला होता. त्यानंतर उद्यान खुले करण्याचा निर्णय सिडकोने जाहीर केला आहे.

मंगलवार, 16 नवंबर 2010

महाआघाडी विरोधी पक्षनेते पदासाठी कोर्टात जाणार
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 17, 2010 AT 12:15 AM (IST)
 
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील रणधुमाळी संपली असली तरी अजूनही आघाडीच्या नगरसेवकांनी आपला विरोधी पक्षनेते पदावरचा हक्‍क सोडलेला नाही. मनसेला विरोधी नेते पद देण्यास विरोध करणाऱ्या आघाडीच्या नेत्यांनी महाआघाडी स्थापन करून त्याची कायदेशीर नोंदणी करून घेतली आहे. आता या महाआघाडीला विरोधी नेते पद द्यावे, असा दावा करण्यासाठी महाआघाडीने कोर्टात धाव घेण्याची तयारी चालविली आहे. 

पालिकेतील सत्ताधारी पक्षानंतर सर्वात मोठा असलेला पक्ष म्हणून नियमानुसार मनसेला विरोधी पक्षनेते पद देण्यात आले असले तरी सुरुवातीपासूनच आघाडीच्या नगरसेवकांचा या निर्णयाला विरोध आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी अपक्षांच्या मदतीने महाआघाडी स्थापन केली असून या महाआघाडीत 32 सदस्य आहेत; तसेच या महाआघाडीची कोकण आयुक्‍तांकडे नोंदणी करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे, अहमदनगर आणि बुलढाणा या महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद महाआघाडीला देण्यात आले आहे. यामुळे याच धर्तीवर या महाआघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळावे, असा दावा आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. त्याचबरोबर मनसेकडे एक अपक्ष आला असतानाही मनसेने आपली युती कोकण आयुक्‍तांकडे नोंदणी केली नाही किंवा शिवसेना भाजपाकडेदेखील अपक्ष गेले असतानाही त्यांनी आपली युतीची नोंदणी केलेली नाही. यामुळे आघाडीने महाआघाडीची सर्वप्रथम नोंदणी केल्यामुळेसुद्धा विरोधी पक्ष नेतेपद मिळेल, असा आघाडीचा दावा आहे.
त्याचबरोबर महापौरांनी महापौर निवडीनंतर सभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रगीत थांबवून मनसेचा विरोधी पक्षनेता जाहीर केला असल्यामुळे आघाडीकडून याला हरकत घेण्यात आली आहे. एकदा सभा संपल्यानंतर कोणतीही घोषणा करता येत नसताना विरोधी पक्षनेत्याची घोषणा करणे चुकीचे असल्याचेही आघाडीच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. याबाबत आघाडीच्या नेत्यांचे वकिलांशी बोलणी सुरू असून पुढील दोन दिवसांत या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश कोट यांनी सांगितले; मात्र फेब्रुवारी 24 नोव्हेंबर 2009 च्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सत्ताधारी पक्षानंतर आपलाच पक्ष हा सर्वाधिक संख्याबळ असणारा पक्ष असल्यामुळेच विरोधीनेते पदाचे आपणच दावेदार होतो आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणेच आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळाले असल्याचा दावा मनसे शहरप्रमुख राजेश कदम यांनी केला आहे.

रविवार, 14 नवंबर 2010

कॅटरिंग कॉलेजना अखेर मराठी ठसका!

कॅटरिंग कॉलेजना अखेर मराठी ठसका!
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:15 AM (IST)
 
शर्मिला कलगुटकर
मुंबई - नागपूरचा वडाभात, कोल्हापूरचा तांबडा रस्सा, खानदेशातील शेवभाजी अन्‌ अवघ्या महाराष्ट्राच्या पुरणपोळीकडे पाठ फिरवून मेक्‍सिकन, थाई, पंजाबी फूडला शाही मान देणाऱ्या कॅटरिंग महाविद्यालयांना झणझणीत मराठी ठसका बसला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून तत्कालीन तंत्र व उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी या महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्राच्या रसपूर्ण खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पाककृती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठी पाट्यांनंतर आता ताटवाट्यांतील पदार्थांनाही न्याय मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या संपन्न खाद्यसंस्कृतीच्या नुसत्या आठवणीनेही रसना तृप्त होते. खमंग काकडी, दही खावडी, ज्वारीची भाकरी, गरमागरम पिठले, झणझणीत खर्डा, पांढऱ्या वांग्यांचे भरित, तीळकुटाची चटणी, भरलेल्या मिरच्या, साजूक तुपाची रवदार धार असलेले वरण, मुगाची खिचडी... अशा जिभेस रग अन्‌ पोटास तड लागेपर्यंत चापण्याच्या असंख्य पाककृती आहेत. दुर्दैवाने राज्यातील एकाही कॅटरिंग कॉलेजमध्ये त्या शिकवल्या जात नाहीत. चीझ, पनीर, बटरमध्ये लोळणाऱ्या पंजाबी फूडने थेट हॉटेलांच्या स्वयंपाकघरात वर्णी लागली. हे पाहून "दिवा महाराष्ट्र'चे डॉ. सुहास अवचट यांनी ही सारी परिस्थिती कथन करणारे विस्तृत पत्र तत्कालीन मंत्रिमहोदयांना लिहिले होते. मराठीच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही महाराष्ट्रातल्या या जिव्हाळ्याच्या पदार्थांची यादीही पेश केली होती. इतकेच नव्हे, तर "अन्नपूर्णा' या संस्थेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेलमध्ये देण्यात येणाऱ्या पदार्थांमध्येही गावागावांतली खासियत असावी यासाठी पाठपुरावा केला होता. या साऱ्याची खमंग फोडणी बसली असून या महाविद्यालयांना अभ्यासक्रमात महाराष्ट्रीय पाककृतींचा समावेश करणे सक्तीचे झाले आहे. त्याबद्दलचा विस्तृत पत्रव्यवहारही या महाविद्यालयांशी करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर शासनदरबारी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्येही चायनीज, थाई फूडचा वरचष्मा असतो. या पाककृती पेश करणाऱ्या बल्लवाचार्यांनाच अनेकदा त्या कशा बनवायच्या हे ठाऊक नसते. मुगाच्या डाळीचे वरण अन्‌ मसुरीच्या डाळीला द्याव्या लागणाऱ्या लसणाच्या फोडणीमध्ये वैविध्य असते, इतके मूलभूत ज्ञानही या विद्यार्थ्यांना अनेकदा नसल्याची खंत अनेक मराठमोळे हॉटेल व्यावसायिकच व्यक्त करतात. या अभ्यासक्रमामध्ये दहीतुपात
मुरवलेल्या पदार्थांइतक्‍याच अन्य प्रांतांतील रेसिपीही घोळवून घेतलेल्या असतात, पण घडीच्या पोळीचे पदर मात्र सुटता सुटत नाहीत. केरळमध्ये सांबार, भात, इडली, डोशांचे उदंड पीक असताना वरण दृष्टीलाही पडत नाही; तर गोव्यातील शाकाहारी खानावळीतल्या ताटालाही सागुतीचा गंध असतो. आपल्याकडे मात्र कोथिंबीर वडी, उपीट, साबुदाण्याची गरमागरम खिचडी देणाऱ्या हॉटेलांसाठी शोधयात्रा काढावी लागते; तर गिरगावातला अनंताश्रम बंद झाल्यामुळे खवय्ये अनंतकाळ हळहळतात... इतिहासाच्या पानावर मराठी खाद्यसंस्कृती विराजमान होण्यापूर्वी ती हॉटेलातल्या पानांवर पुन्हा डावीकडून लागू लागली हेही नसे थोडके!