शनिवार, 24 सितंबर 2016

मराठा समाजाचा मोर्चा पुण्यातील गर्दीचा उच्चांक मोडणार?

पुणे - इंदिरा गांधी, सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण यांच्या लाखांचा आकडा ओलांडणाऱ्या सभा, गणेशोत्सव, आषाढी वारीनिमित्त जमणारे काही लाख भाविक यांचा अनुभव पुणेकरांनी आतापर्यंत घेतला आहे. मात्र, मराठा समाजाच्या मोर्चाच्या संयोजकांनी केलेल्या नियोजनानुसार पुण्यात उद्या (रविवारी) मोर्चा निघाला, तर तो आतापर्यंतचे सर्व आकडे पार करणारा उच्चांकी असण्याची शक्‍यता आहे. पोलिसांपासून ते संयोजकांपर्यंत अनेकांनी केलेल्या अंदाजाचा लंबक दहा ते वीस लाखांपर्यंत जात असल्याने प्रत्यक्ष काय होईल, याबाबत उत्सुकता आहे.

राज्यात ठिकठिकाणी निघणारे मराठा क्रांती मूक मोर्चे त्या-त्या भागांत गर्दीचे उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. या मोर्चाच्या आयोजकांनी केलेल्या दाव्याइतके लोक रविवारी सहभागी झाल्यास, हा विराट मोर्चा पुण्यातही गर्दीचा विक्रम नोंदवील. पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे. ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष मोर्चात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. त्याचे नियोजनही सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांतील मराठा समाजही रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे पुण्यात रविवारी होणाऱ्या मोर्चाबद्दल सर्वत्र मोठी उत्सुकता आहे.
पुण्यात गणेशोत्सवात मोठी गर्दी होते. त्याचबरोबर दरवर्षी देहू-आळंदीहून पंढरपूरला मार्गस्थ होणारा पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी थांबतो. या सोहळ्यात दरवर्षी एक ते सव्वा लाख वारकरी असतात. तसेच स्थानिक भाविकही त्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. पालखी सोहळा पुण्यात येतो, त्या वेळी जशी डेक्कन जिमखाना आणि लक्ष्मी रस्ता परिसरात गर्दी होते, तशीच गर्दी उद्याही अनुभवास येणार आहे.
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 26 फेब्रुवारी 1998 रोजी वानवडीतील
केदारीनगर येथे जाहीर सभा घेतली होती. शहर आणि जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने मतदार सभेला आले होते. कॉंग्रेसचे नेते शरद पवार त्यांच्यासमवेत होते.
सभेला पाच लाख लोक उपस्थित असल्याचा उल्लेख त्या वेळच्या बातम्यांमध्ये आहे. जाहीर सभांच्या गर्दीचा उच्चांक मोडून नवा विक्रम त्या वेळी नोंदविला गेला. सोनिया गांधी यांच्यासमवेत असलेल्या राहुल गांधींना त्या वेळी शिंदेशाही पगडी घालून सन्मानित करण्यात आले होते.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांची फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर अपक्ष उमेदवार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारासाठी मोठी सभा झाली. त्या सभेला दीड लाखापेक्षा अधिक जनसमुदाय उपस्थित होता.

बांगला देशाची निर्मिती 1971 मध्ये झाली. त्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यातील सभेला झालेली प्रचंड गर्दी त्या वेळी चर्चेचा विषय ठरला
होता. त्यानंतर, त्यांनी 1976 मध्ये सारसबागेत घेतलेल्या सभेलाही प्रचंड गर्दी झाली होती. विमानतळापासून सारसबागेपर्यंत त्यांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.

ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची 24 जानेवारी 1975 मध्ये झालेल्या जाहीर सभेला स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे दीड लाख लोक उपस्थित होते. इंदिरा गांधी यांच्या 1977 मध्ये पराभव करणाऱ्या राजनारायण यांच्या जाहीर सभेला त्या वेळी मोठी गर्दी झाली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 19 फेब्रुवारी 1997 रोजी सारसबाग येथे सभा झाली. त्या सभेलाही मोठा जनसमुदाय उपस्थित होता. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे एप्रिल 1989 मध्ये निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनाला हजारो शोकाकुल चाहते उपस्थित होते. गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठी अंत्ययात्रा असा उल्लेख त्या वेळच्या बातम्यांमध्ये करण्यात आला होता.

शुक्रवार, 23 सितंबर 2016

पाकिस्तानी कलाकारांनो भारत सोडा! - मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फतवा; चित्रीकरण थांबविण्याचा इशारा
मुंबई - उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाकिस्तानी कलाकारांना भारत तातडीने सोडण्याचा फतवा शुक्रवारी काढला. देश सोडून हे कलाकार न गेल्यास चित्रीकरण थांबविण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

शाहरुखअभिनित "रईस‘ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री माहिरा खान आणि "ऐ दिल है मुश्‍कील‘ चित्रपटातील अभिनेता फवाद खान यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांमुळे भारतीय कलाकारांची संधी हिरावून घेतली जात आहे, असा आरोप मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला. या कलाकारांना तातडीने देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. हे कलाकार परत न गेल्यास आमचे कार्यकर्ते त्यांना हाकलून देतील, तसेच त्यांना येथे काम करू देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
करण जोहर यांचा "ऐ दिल है मुश्‍कील‘ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. यात फवाद खान हा सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. माहिरा ही शाहरुख खान याच्या "रईस‘ चित्रपटात मुख्य अभिनेत्री आहे.
मुंबई पोलिसांनी मात्र, या कलाकारांनी चिंता करण्याची गरज नसून, त्यांना संरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल आहे. मनसेच्या चित्रपट विभागाने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास 48 तासांची मुदत दिली आहे. पाकिस्तानी कलाकारांना पत्रेही पाठविण्यात आली असून, यात म्हटले आहे, की तुमचा देश दहशतवादाला प्रोत्साहन देत असताना तुम्ही येथील व्यवसाय बंद करा. याबाबत चित्रपट निर्मात्यांनाही पत्रेही पाठविण्यात येणार आहेत. देशात मोठ्या संख्येने कलाकार असून, ते काम मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. तुम्ही कोणत्या आधारावर पाकिस्तानी कलाकारांना संधी देत आहात, असा प्रश्‍न निर्मात्यांना विचारण्यात येणार आहे.

भारतासारख्या सुमारे सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात लाखो जण चित्रपटातील संधीसाठी संघर्ष करीत असताना मोठे बॅनर्स पाकिस्तानी कलाकारांना संधी देत आहेत.
- शालिनी ठाकरे, सरचिटणीस, मनसे