गुरुवार, 4 अगस्त 2016

सरकारला माणसांच्या जीवाचे मोल नाही- राज

नाशिक- मुबलक असले की त्याची किंमत कमी होते. महाराष्ट्रातल्या सरकारलाही माणसांची किमत वाटत नाही. त्यामुळेच सावित्री नदीवरील महाडचा पूल कोसळला. त्यावर सरकारची प्रतिक्रीया देखील अशीच संवेदनहीन आहे. यावर ठोस काही तरी झाले पाहिजे. घटना घडीली नेते, लोकप्रतिनिधी बोलतात व दोन चार दिवसाने विसरतात हे किती दिवस चालणार? असा उद्वीग्न प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

नाशिकला आलेल्या महापूरानंतर त्यांनी बुधवारी पुरग्रस्तांची भेट घेतली. नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. विविध नागीरकांचीीह विचारपूस करुन महापालिका पदाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. महाड येथील पूलाच्या दुर्घटनेबाबत त्यांनी सरकारी अनास्था विद्वीग्न करते असे सांगितले. "ज्यांनी पूल बांधले ते त्यांच्या देशात निघून गेलेत. पूलाचे आयुष्य संपल्याचे पत्र ते तेथून पाठवतात. अन्‌ आपण त्याकडे अनास्थेने पाहतो. "लोकांच्या जीवाचे काही मोल आहे की नाही?. त्याचे मोल सरकारला वाटते की नाही?. लोकांनीही थोडे बदलावे. सत्तेत बसलेल्यांकडे, राजकारण्यांकडे उत्तर मागावे. प्रश्‍न सुटेपर्यंत पाठपुरावा करत रहावा.‘ असे त्यांनी सांगितले.

---------------------------------------------------------------------------
विधी मंडळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून झालेला गोंधळ हा सरकार व विरोधकांची मिलिजुली आहे. सरकारला नागरिकांच्या मुलभूत प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागू नये म्हणून विदर्भाचा मुद्या भोवतीचं चर्चा फिरवून अधिवेशनाचे पाच-सहा दिवस घालविण्याची सरकारची चाल होती व त्याला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची सुध्दा साथ असल्याचा घणाघाती आरोप करीत राज ठाकरे यांनी विदर्भाच्या मुद्यावरून सुरु झालेल्या वादात उडी घेतली. अखंड महाराष्ट्र हिच मनसेची ठाम भुमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री विदर्भाचाच असल्याने त्यांना विकासाचा अनुशेष भरून काढण्याची संधी आहे. त्यांना थांबविले कोणी? असा सवाल त्यांनी केला.

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून गोंधळ सुरु आहे. त्यावर मनसेच्या वतीने प्रथमचं ठाकरे यांनी भुमिका स्पष्ट केली. विदर्भ हा मुद्दाच नसल्याचे सांगताना, राज्यात शिक्षण, आरोग्य यासारखे अनेक प्रश्‍न आहेत. त्यापासून लक्ष हटविण्यासाठी हा वेळकाढूपणा सुरु आहे.

राज ठाकरेंनी दिला पूरग्रस्तांना दिलासा

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेला गोदापार्क महापुरामुळे पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला असून, पार्कच्या पुनःनिर्माणासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. राज यांनी अंधारात केलेल्या पाहणीतही उद्‌ध्वस्त झालेल्या गोदापार्कचे वास्तव समोर आले. गोदापार्कसह गोदाकाठावरील पुराचा तडाखा बसलेल्या ठिकाणांना भेट देऊन राज यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. 

गोदावरी नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर गोदापार्क निर्माण करण्याचे राज ठाकरे यांचे स्वप्न आहे. 2002 मध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना चोपडा पुलापासून अडीच किलोमीटरपर्यंतचा गोदापार्क उभारण्यात आला होता. 2008 मध्ये आलेल्या पुरामुळे युतीच्या काळात बांधलेल्या पार्कची दुरवस्था झाली. 2012 मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर आसारामबापू पुलापासून नव्याने गोदापार्क उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार नियोजन करण्यात आले. महापालिकेच्या निधीऐवजी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्वाच्या निधीतून (सीएसआर) गोदापार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रिलायन्स फाउंडेशनने त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. गोदापार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. गेल्या महिन्यात उद्‌घाटन करण्याची तयारी करण्यात आली. राज यांच्या तारखा निश्‍चित न झाल्याने उद्‌घाटन बारगळले. मुसळधार पावसाने आलेल्या पुराने गोदापार्क कवेत घेत उद्‌ध्वस्त करून टाकल्याने राज यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. गोदापार्कमधील फरशी, आकर्षक पथदीप, हिरवळीचे मोठे नुकसान झाले आहे. 

पूरग्रस्त भागाला भेट 
नाशिकमध्ये पुराने हाहाकार माजविल्याचे कळाल्यानंतर राज काल (ता. 2) नाशिकला निघाले होते; परंतु पोलिस नियंत्रण कक्षातून येण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे राज यांचे आज सायंकाळी आगमन झाले. अहिल्याबाई होळकर पूल, रामकुंड, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्‍वर पूल येथे प्रत्यक्ष, तर काझीगढीच्या धोकादायक भागाचे त्यांनी दुरून दर्शन घेतले. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख आदी उपस्थित होते.