गुरुवार, 4 नवंबर 2010

"कृष्णकुंज'वर जुळवाजुळव

"कृष्णकुंज'वर जुळवाजुळवकल्याण -डोंबिवलीत मनसे आपला पॅटर्न दाखवील, असा दावा करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज "कृष्णकुंज' निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीला मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, आमदार नितीन सरदेसाई, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शिशिर शिंदे, सरचिटणीस शिरीष पारकर आदी उपस्थित होते. बैठकीत विविध पर्यायांवर आकडेवारीनुसार चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत सत्तेसाठी कोणती गणिते जुळू शकतील, अन्यथा प्रभावी विरोधी पक्ष होण्याच्या पर्यायाचा या बैठकीवर चर्चा करण्यात आली. आमदार नांदगावकर, सरदेसाई व दरेकर यांना राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी विशेष जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. त्यानंतरच राज ठाकरे आपला निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा असल्याचे बोलले जाते.

राज आज डोंबिवलीतपहिल्याच फटक्‍यात 27 नगरसेवकांचे घवघवीत यश संपादन करून प्रस्थापितांना धक्का देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (ता.5) सकाळी डोंबिवलीतील फडके रोडवर येणार आहेत. मतदारांचे आभार मानण्यासाठी ते कल्याण येथील दुर्गाडीमार्गे ते डोंबिवलीत दाखल होणार आहेत. फडके रोडवर नेहमीच तरुणाईचा जल्लोष असतो. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या तरुणाईचे आभार मानण्याकरिता व दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते उद्या सकाळी येणार आहेत.

बुधवार, 3 नवंबर 2010

इतर पक्षांसाठी मनसे 'अनटचेबल' - राज

इतर पक्षांसाठी मनसे 'अनटचेबल' - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 03, 2010 AT 01:06 PM (IST)
 

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असली, तरी अद्याप मला आघाडीसाठी कोणत्याच पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे इतर पक्षांसाठी मनसे सध्यातरी 'अनटचेबल' आहे. तरीही सत्ता स्थापनेचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली निवडणूकीत जिंकलेले मनसेच्या २७ नगरसेवकांनी आज (बुधवार) राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''कल्याण-डोंबिवलीत आणखी मतदान झाले असते तर मनसेला सत्ता मिळविण्यात अडचण आली नसती. या ठिकाणी आणखी जागा जिंकण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने आता दोन दिवसांत येथील निर्णय घेण्यात येईल. आदर्श सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पदावरून जावे की रहावे हे कोणी एका वृत्तपत्राने किंवा वृत्तवाहिनीने ठरवू नये. अशोक चव्हाण जर या प्रकरणात दोषी असतील तर त्यांची हकालपट्टी करण्यात यावी.''

मंगलवार, 2 नवंबर 2010

आघाडी आणि युतीला "राज' नको

आघाडी आणि युतीला "राज' नको
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 03, 2010 AT 12:48 AM (IST)
 
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत 27 जागा जिंकणारी मनसे "किंगमेकर' ठरली असली तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधी बाकावर बसण्याचे जाहीर करीत चुकीची सत्ता नको, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, शिवसेना-मनसेत उभा वाद असल्याने त्यांच्यातही सत्तेसाठी सूत जुळणार नाही, अशी राजकीय परिस्थिती आघाडीच्या वक्तव्याने निर्माण झाली आहे. परिणामी, युती आणि मनसे दोन्ही पक्षांसमोर पेच निर्माण झाला असून महापालिकेत सत्ता कोणाची येणार, याचीच चर्चा रगंली आहे.

महापालिका निवडणुकीत मनसेने युतीतील भाजपचा धुव्वा उडविला आहे. भाजपच्या मते, त्यांना खरी हानी पोहोचली आहे ती शिवसेनेच्या अपक्ष बंडखोरांमुळे. अवघ्या नऊ जागांवर भाजपला विजय मिळविता आला आहे. "ठाकरे विरुद्ध ठाकरे' असा प्रचाराचा सामना रंगल्याने उद्धव आणि राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कल्याण-डोंबिवलीतील जनतेने मात्र दोन्ही ठाकरेंना स्वीकारले असून भाऊबंदकीतील वाद संपुष्टात यावा, अशी त्यांची भावना असल्याचे दोघांना मिळालेला कौल पाहता स्पष्ट होते. दोघांनी एकत्रित येऊन मराठी माणसाचे "कल्याण' करावे, असे मतपेटीतून त्यांनी सूचित केले आहे.

शिवसेना-मनसे सत्तेसाठी एकत्रित येणार नाही. दोघांच्या एकत्रित येण्यामुळे दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला जाण्याची दाट शक्‍यता आहे. मनसे किंगमेकर झाल्याचे कळताच दिल्लीहून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कॉंग्रेस विरोधी बाकावर बसेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असून सत्तास्थापनेत तटस्थ भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आघाडीतील दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी जनतेने दिलेला कौल मान्य करीत त्यांना मनसेराज नको असल्याचे स्पष्ट केले आहे. मनसेच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेसाठी लागणारा आकडा सहज गाठता येतो; परंतु अपक्षांची मदत घेऊनही हा आकडा गाठणे आघाडीला आणि युतीला शक्‍य नाही.

अपक्षांच्या कलाबाबत संभ्रम
दरवेळेस सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत अपक्ष निर्णायक भूमिका बजावतात. यंदाच्या निवडणुकीत 11 अपक्ष निवडून आले आहेत. बाळ हरदास, मोहन उगले व सरोज भोईर यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांना पुन्हा शिवसेनेकडे वळविण्याचे कसब शिवसेना नेत्यांना करावे लागणार आहे. हरदास यांनी आपली निष्ठा राष्ट्रवादीकडे असल्याचे बोलून दाखवले आहे. अपक्ष शिवसेनेकडे वळतात का, याविषयी सुस्पष्टता नाही. श्रेयस समेळ, उषा वाळंज व विक्रम तरे यांचा पाठिंबा आपल्यालाच राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी या तिघांनी त्यांचा कल अद्याप स्पष्ट केलेला नाही. उर्वरित संजय पावशे आणि महेंद्र गायकवाड हे कोणाला पाठिंबा देतात, याविषयीही साशंकता आहे

सोमवार, 1 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत मनसेच किंगमेकर

कल्याण-डोंबिवलीत मनसेच किंगमेकर!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 02, 2010 AT 01:00 AM (IST)
 
मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 107 पैकी 25 जागांवर विजय मिळवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तारुढ शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. युतीपैकी केवळ भाजपचे बाहुबल घटवण्यात मनसेला यश आले असले, तरी शिवसेनेच्या मतांवर मनसेचा पर्यायाने राज ठाकरे यांच्या करिष्म्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही. मात्र कल्याण-डोंबिवलीतील सत्तेची दोरी पूर्णतः मनसेच्याच हाती आहे. काठावरच्या बहुमतासाठी आवश्‍यक असलेला 54 चा जादुई आकडा गाठण्यासाठी आघाडी किंवा युतीला मनसेवरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे मनसेला हाताशी धरून सत्ता कोण स्थापन करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक राजकीय पक्षांप्रमाणे उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी प्रतिष्ठेची केली होती. म्हणूनच निकालाबाबत कधी नव्हे एवढी उत्सुकता होती. 107 पैकी 62 जागा शिवसेनेने लढविल्या. त्यापैकी 32 जागा त्यांच्या पदरात पडल्या. जवळपास 50 टक्के यश त्यांनी मिळवले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 29 जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यांच्या तीन जागा वाढल्या. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपने 45 जागा लढविल्या आणि फक्त नऊ जागांवर विजय मिळविला. गेल्या वेळी भाजपकडे 16 जागा होत्या. यंदा त्यांच्या सात जागा घटल्या. भाजपच्या पीछेहाटीचा फटका युतीला बसला आहे. युतीच्या एकूण जागांची संख्या 41 होते. त्यामुळे "54'चे संख्याबळ गाठण्यासाठी मनसे फॅक्‍टर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सत्तास्थापनेसाठी जवळचे काही अपक्ष गृहित धरले, तरी युतीला 54 चा आकडा गाठणे शक्‍य होणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. 

युतीचे 41 व अपक्षांतील सहा-सात सदस्य धरूनही सदस्यसंख्या बहुमताच्या आसपासही जाण्याची शक्‍यता दिसत नाही. भाजपच्या हक्काच्या मानल्या गेलेल्या शहरी मतांवर मनसेने डल्ला मारल्याने युतीचे सत्तास्वप्न भंग होण्याची शक्‍यताच अधिक आहे.

आघाडीलाही धक्का
कॉंग्रेसने यावेळी 55 आणि राष्ट्रवादीने 52 जागा लढविल्या होत्या. मनसे फॅक्‍टर युतीला मारक ठरणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता; परंतु मनसेने भाजपबरोबर आघाडीलाही धक्का दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 15 जागा मिळाल्या आहेत. आघाडीचे एकूण संख्याबळ 30 च्या घरात आहे. मनसेने जशी भाजपला हानी पोचवली आहे, तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मागे खेचत धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यांच्या सहा जागा घटल्या आहेत. राष्ट्रवादीला गेल्यावेळी 22 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यांना सात जागांवर पाणी सोडावे लागले आहे. आघाडीला 40 जागांची अपेक्षा होती. त्यांच्या पदरात दहा जागा कमी पडल्या आहेत.

या निवडणुकीत "ठाकरे विरुद्ध ठाकरे' असा सामना रंगला होता. दोन्ही ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना आहे त्याच जागा राखण्यात यश आले असले, तरी मनसेने मिळविलेल्या 25 जागा त्यांना आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीचा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. अंबरनाथ पालिकेत शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला असला, तरी मनसे आता कल्याण-डोंबिवलीत सत्तेसाठी युतीला पाठिंबा देणार नाही. महापालिकेतील आघाडीच्या तीस सदस्यांना मनसेने पाठिंबा दिला, तर "54' ची मॅजिक फिगर गाठणे त्यांना सहज शक्‍य आहे. मनसेने आघाडीला पाठिंबा दिला, तर "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' असा युतीचा प्रचार सुरुच राहील. शिवाय या स्थितीत किती अपक्ष या नव्या राजकीय सूत्रात सहभागी होतात, ते लवकरच स्पष्ट होईल. ज्या अपक्षांना युती व आघाडीने उमेदवारी नाकारली, ते सत्तेचे पारडे जेथे जड आहे तेथेच झुकण्याची दाट शक्‍यता आहे. काहीही असले, तरी नव्या राजकारणात कल्याण-डोंबिवलीतील सत्तेची दोरी सध्या तरी मनसेच्याच हाती आहे.

मनसेचा करिष्मा उल्लेखनीय 
प्रचारात राज ठाकरे यांनी मतदारांना पूर्ण सत्ता देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या भाषणांना जमलेली गर्दी ते मतांमध्ये परावर्तीत करू शकल्यानेच मनसेला 25 जागांवर विजय मिळविता आला. याचा विचार शिवसेनेने गांभीर्याने करणे गरजे आहे. 31 जागा मिळवून शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली असली तरी 25 जागा मिळवून मनसे दुसऱ्या स्थानी आहे, ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल

त्रिशंकू"राज'

त्रिशंकू"राज'
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 02, 2010 AT 01:00 AM (IST)
 
डोंबिवली - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादाने राज्यभरात गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील मतदारांचा कौल आज स्पष्ट झाला. या निवडणुकीत मनसेच्या "इंजिना'ने युती आणि आघाडीला "धडक' देत तब्बल 26 जागांवर विजय मिळविला. मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या मनसेच्या हाती आल्या आहेत.

आघाडी किंवा युती कोणालाही सत्ता मिळवायची असेल, मनसेची मदत घेण्यावाचून पर्याय नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मनसे कोणाला पाठिंबा देणार, याबाबत अनेक मतप्रवाह आहेत किंवा महापौर मनसेचा आणि अन्य पदे मदत करणाऱ्या पक्षांना अशीही समीकरणे जुळू शकतात, ही चर्चाही रंगली आहे. सत्तेच्या सारीपाटावर मनसे कोणती चाल खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपले पत्ते खुले न केल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. सत्तेबाबत राज ठाकरे यांनीच पुढाकार घ्यावा म्हणून आघाडीचे नेते तूर्त गप्प आहेत; तर शिवसेनेने सत्तेसाठी, महापौरपदासाठी समविचारी नगरसेवकांसोबत जाण्याचे संकेत दिल्याने राजकीय चित्र नेमके कसे असेल, याबाबत उत्सुकता आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 107 पैकी 40 जागा सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला मिळाल्या आहेत. शिवसेनेने 31, तर भाजपने अवघ्या 9 जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत भाजपला लढविलेल्या जागांपैकी 10 टक्केच प्रतिसाद मिळाला आहे. डोंबिवली हा संघाचा बालेकिल्ला समजला जातो; मात्र डोंबिवलीतील पांढरपेशा मतदाराने भाजपला सपशेल नाकारले आहे. शिवाय शिवसेनेच्या बंडखोरीचा फटकाही भाजपला बसला आहे. मनसेच्या "इंजिना'ने सर्वच पक्षांना मोठी "धडक' दिल्याचा ठाम दावा मनसेच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. शिवसेनेने आपल्याकडील बहुतांश प्रभाग राखले आहेत. मात्र भाजपला मिळालेल्या कमी जागांमुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. निवडून आलेल्या अपक्षांपैकी पाच जण आम्ही पुरस्कृत केलेले आहेत, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यांचा पाठिंबा गृहीत धरता युतीचे संख्याबळ 45 पर्यंत जाते. मात्र शिवसेना-भाजप युतीने उमेदवारी नाकारलेल्या; तरीही निवडून आलेल्यांपैकी किती अपक्ष सत्तेसाठी पुन्हा युतीच्या छताखाली येतील, याबाबत राजकीय वर्तुळात शंका आहे.

दरम्यान, "मनसे फॅक्‍टर'चा फटका आघाडीलाही बसला आहे. आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी 15 जागांवर विजय मिळविला आहे; तर 11 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली विकास आघाडीचे 12 बंडखोर रिंगणात होते. त्यापैकी एकच निवडून आला आहे. या बंडखोरांनी कॉंग्रेसविरोधात उघडलेल्या विकास आघाडीचा फार फटका बसलेला नाही, तर आघाडीला "मनसे फॅक्‍टर' मारक ठरला. मनसेमुळे आघाडीची पीछेहाट झाली, असे निकालांवरुन दिसते.
निवडणुकीच्या प्रचारात मनसे विरुद्ध शिवसेना असा "ठाकरी' प्रचार रंगला होता. "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' अशी टीका शिवसेनेकडून होत असल्याने मनसे आघाडीसोबत जाणार का किंवा आपल्या महापौरपदासाठी आघाडीचा पाठिंबा घेणार का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांत चर्चिला जात आहे. त्याचवेळी मनसे शिवसेनेबरोबर जाणार नाही. कॉंग्रेस आघाडीला समर्थन देईल, असे दावे आघाडीच्या नेतेमंडळींकडून सुरू आहेत.

पक्षीय बलाबल
शिवसेना -31
भाजप -09
मनसे -26
कॉंग्रेस -15
राष्ट्रवादी -15
अपक्ष व इतर -11
एकूण -107

कल्याण-डोंबिवलीत त्रिशंकू स्थिती

कल्याण-डोंबिवलीत त्रिशंकू स्थिती
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 01, 2010 AT 10:21 AM (IST)

मुंबई - कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या १०७ जागांपैकी सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला ४१ जागा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३०, मनसेला २५ आणि अपक्षांना ११ जागा मिळाल्या. यामुळे कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही पक्षाला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ५४ नगरसेवक बरोबर असणे आवश्यक आहे.

शिवसेना आणि मनसे यांच्यात प्रमुख लढत पहायला मिळालेल्या या महापालिकेत मनसेने शिवसेनेला धक्का दिला. मनसेने सर्वच १०७ जागांवर आपले उमेदवार उभे करून २५ जागा मिळविण्यात यश मिळविले. तसेच काही प्रभागांमध्ये त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. यामुळे याचा फटका शिवसेनेला बसला. शिवसेनेने ३२ जागांवर, तर भाजपने ९ जागांवर यश मिळविले. काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा जिंकण्यात यश आले.
कल्याण-डोंबिवलीचे महापौर आणि उपमहापौरांना पराभव स्वीकारावा लागले. महापौर रमेश जाधव यांचा वॉर्ड क्र. ३८ मधून आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. जाधव यांचा मनसेचे उमेदवार नितीन निकम यांनी पराभव केला. खडेगोळवली या वॉर्ड क्र. ४८ मधून संध्या तरे यांनी विजय मिळविला. संध्या तरे यांनी १०५८ मते मिळवीत अपक्ष उमेदवार वैशाली तरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या

रविवारी झालेल्या मतदानानंतर आज (सोमवार) सकाळी दहापासून डोंबिवली क्रीडासंकुलात मतमोजणी झाली.

कल्याण-डोंबिवलीत महापौरांचा पराभव

कल्याण-डोंबिवलीत महापौरांचा पराभव
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 01, 2010 AT 10:21 AM (IST)
 
मुंबई - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर रमेश जाधव यांचा वॉर्ड क्र. ३८ मधून आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. जाधव यांचा मनसेचे उमेदवार नितीन निकम यांनी पराभव केला. शिवसेनेनेही याठिकाणी खाते उघडले असून, खडेगोळवली या वॉर्ड क्र. ४८ मधून संध्या तरे यांनी विजय मिळविला. संध्या तरे यांनी १०५८ मते मिळवीत अपक्ष उमेदवार वैशाली तरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीलाही पहिली जागा जिंकण्यात यश मिळविले असून, मनिषा गायकवाड यांनी विजय मिळविला.

रविवारी झालेल्या मतदानानंतर आज (सोमवार) सकाळी दहापासून डोंबिवली क्रीडासंकुलात मतमोजणीस सुरवात झाली. दुपारी दोनवाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंमधील वादामुळे याठिकाणी सत्ता कोणाची येते याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्यात प्रमुख लढत याठिकाणी होत आहे. महापालिकेच्या १०७ जागांसाठी ६११ उमेदवार उभे राहिले होते. मात्र, मतदारांनी निरुत्साह दाखविल्याने फक्त ४८ टक्के मतदान झाले. कमी मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

वॉर्डनुसार निकाल - प्रभाग क्र. २१ - विजयी उमेदवार - जवाद डोन (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्र. ३८ - विजयी उमेदवार - नितीन निकम (मनसे)
प्रभाग क्र. ४४ - विजयी उमेदवार - कल्याण धुमाळ (शिवसेना)
प्रभाग क्र. ४६ - विजयी उमेदवार - जनार्दन म्हात्रे (शिवसेना)
प्रभाग क्र. ४८ - विजयी उमेदवार - संध्या तरे (शिवसेना)
प्रभाग क्र. ५३ - विजयी उमेदवार - कल्याण पाटील (शिवसेना)
प्रभाग क्र. ७७ - विजयी उमेदवार - नंदू म्हात्रे (काँग्रेस)

रविवार, 31 अक्तूबर 2010

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 31, 2010 AT 12:30 AM (IST)
 
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत प्रचारासाठी मुक्काम ठोकणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त भुजंगराव शिंदे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या 9 एप्रिल 2010 च्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेरून येणाऱ्या राजकीय नेत्याने प्रचार संपण्यापूर्वी ही निवडणूक ज्या परिसरात होते, तो परिसर सोडून जावे, असे आदेश आहेत. निवडणुकीचा प्रचार 29 ऑक्‍टोबरला रात्री संपला. तत्पूर्वी पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज ठाकरे यांना शहर सोडून जाण्याची नोटीस बजावली होती; मात्र ठाकरे यांनी शहर न सोडता ते निवडणूक परिसरात होते. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे यांच्याविरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या संदर्भात मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले, की मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही.
प्रचारासाठी मनसेने सरकारी वाहने वापरली
29 ऑक्‍टोबरला झालेल्या मनसेच्या प्रचारसभेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर, भिवंडी, डहाणू व पनवेल या आगारांतून 27 बसेसमधून कार्यकर्ते सभेला आले होते. या सभेचे आयोजक मनसेचे जिल्हा चिटणीस यांनी इरफान शेख यांच्याविरोधात प्रचारासाठी सरकारी वाहनांचा वापर करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी रामनाथ सोनवणे यांनी बाजरपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीच्या आधारे बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित बस आगार व्यवस्थापकांनी बसेस प्रचारासाठी कशा दिल्या आणि कोणी परवानगी दिल्या याचीही या प्रकरणात चौकशी करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी सोनवणे यानी सांगितले. प्रचारसभेचा आयोजक व बस पुरविणारे या दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली, कोल्हापुरात शांततेत मतदान

कल्याण-डोंबिवली, कोल्हापुरात शांततेत मतदान
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 31, 2010 AT 10:49 AM (IST)
 
मुंबई - कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीमध्ये सुमारे ४० टक्के मतदान झाले असून, कोल्हापूरमध्ये ७० टक्के मतदान झाले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील १०७ जागांसाठी, तर कोल्हापूर महापालिकेतील ७७ जागांसाठी मतदान झाले.

कल्याण डोंबिवलीमधील १०७ जागांसाठी ६७५ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले १०७ उमेदवार उतरविल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे. प्रचारादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परांवर केलेल्या टिकेमुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे शिवसेना-भाजप युतीला आणि मनसेला आव्हान असणार आहे.

कोल्हापूरमधील ७७ जागांसाठी ४८० उमेदवार उभे आहेत. कोल्हापूरमध्ये दोन्ही कॉंग्रेससह शिवसेना-भाजप युती, जनसुराज्य शक्ती व शाहू आघाडीसह अपक्षांचे भवितव्य पणाला लागले आहे.