मंगलवार, 5 जुलाई 2011

अण्णांच्या 'कोर्टात' राज ठाकरेंची 'खास याचिका'

अण्णांच्या 'कोर्टात' राज ठाकरेंची 'खास याचिका'
विश्‍वास देवकर
Wednesday, July 06, 2011 AT 12:30 AM (IST)
 

वेध : उत्तर महाराष्ट्र

राज्य भ्रष्टाचाराने बरबटले आहे, त्यामुळे लोकपाल राहू द्या, महाराष्ट्राकडे लक्ष द्या, असे अण्णा हजारे यांना आवाहन करतानाच अजित पवार व छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्यास "मनसे' हजारेंना पाठिंबा देईल, असा पवित्रा मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतला आणि साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. अर्थात, राज ठाकरे महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून काहीही बोलले तरी सारा महाराष्ट्र हेच त्यांच्या भूमिकांचे "टार्गेट' असते. गेल्या आठवड्यात असेच लक्षवेधी टार्गेट राज ठाकरेंनी "अचिव्ह' केले आहे. नाशिकमध्ये येऊन हजारे, पवार व भुजबळ यांच्यासंदर्भात भाष्य करून ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचा खास ठाकरी शैलीत "राज'कीय फायदा उठविला, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र व एकूणच देशपातळीवर सध्या अण्णा हजारे हे लोकांचे लक्ष वेधून घेणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहे. एरवी लोक, विशेषतः युवा पिढी राज ठाकरेंच्या वागण्या-बोलण्यावर फिदा होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून मात्र प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून माध्यमांसह सर्वांनाच हजारेंनी भुरळ घातल्याचे दिसत आहे. इतकी की महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर जाऊन थेट राजधानी दिल्लीवर स्वारी करत हजारेंनी भ्रष्टाचाराच्या, लोकपालाच्या मुद्यावर सारा देश हलवून सोडला आहे. त्यामुळे सध्या जणू फक्त हजारे फॉर्म्युल्याचीच चलती आहे, राज ठाकरेंनाही हजारेंच्या फॉर्म्युल्याची दखल घ्यावी लागली आहे. मराठी अस्मिता असो वा महाराष्ट्राचे अन्य प्रश्‍न, राज ठाकरे महाराष्ट्राबाबत आक्रमक असतात. असे असतानाही लोकपाल राहू द्या, महाराष्ट्राकडे लक्ष द्या, असे हजारेंना सांगण्याची वेळ राज ठाकरेंवर का आली, असा प्रश्‍न नाशिकमध्ये विचारला जात आहे. अजित पवार व छगन भुजबळ यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्यास आपण हजारेंना पाठिंबा देऊ, या राज ठाकरेंच्या वक्तव्याने सामान्य माणसाच्या मनात "अरे राज ठाकरे या स्वतःचा करिश्‍मा असलेल्या युवा नेत्याला हजारेंच्या कोर्टात याचिका सादर करण्याची वेळ का आली', असा प्रश्‍न पडला आहे. एरवी महाराष्ट्रात रस्त्यावरच्या आंदोलनात काहीही घडवायचे असेल तर केवळ राज ठाकरे, ही "मनसे' भावना बळावत असताना ठाकरेंना हजारे का हवेत, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. अर्थात, नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंना आपला "राज'गड अभेद्य करायचा आहे. बाळासाहेब हेच आपला विठ्ठल असे मानणारा हा वारकरी अस्वस्थ झाला, तेव्हाही नाशिकमध्येच आला होता. आपल्या अस्वस्थतेचा हुंकारही त्यांनी याच भूमीत दिला, बंडाचा झेंडाही नाशिकमध्येच फडकावला आणि पक्ष मोठा करण्यासाठीची व्यूहरचनाही ते अनेकदा नाशिकमध्येच रचतात. त्यासाठी नाशिकमध्ये मोक्‍याच्या जागेवर कॉर्पोरेट चेहरा असलेले कार्यालय त्यांनी आता थाटले आहे. मात्र, त्यानिमित्ताने झालेल्या मेळाव्यातच हजारेंना पाठिंब्याची तयारी दाखविणे म्हणजे "राज'गडाला हजारेंच्या आंदोलनाची कुबडी हवी आहे की काय, असा प्रश्‍न त्यांचे विरोधक विचारू लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राज ठाकरे असो वा अण्णा हजारे, कोणीही बोलले तरी सामान्य माणसांच्या संवेदनाच यानिमित्ताने जाग्या होतात. ज्यांना "राज'कारण करायचे असेल त्यांनी जरूर करावे, त्या गदारोळात सामान्य माणसांच्या भावनांचे राजकारण करू नये, हीच अपेक्षा

रविवार, 3 जुलाई 2011

राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?

राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?
सकाळ वृत्तसेवा
Monday, July 04, 2011 AT 03:45 AM (IST)
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकरणे बाहेर काढा. महाराष्ट्रात मनसेची ताकद पाठीशी उभी करेन, असे आवाहन राज ठाकरे यांनी अण्णा हजारे यांना केल्याने राष्ट्रवादी अचंबित झाली आहे. सरकारविरोधात माझे आमदार विधानसभा डोक्‍यावर घेतील, अशा राज ठाकरे यांनी राणा भीमदेवी थाटात केलेल्या घोषणेला राष्ट्रवादीने सडेतोड उत्तर दिले आहे. मनसेतील नेत्यांची, लोकप्रतिनिधींची ताकद घटली काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी मनसेच्या नेत्यांचे हात बांधले आहेत काय, असा जोरदार प्रतिहल्ला करीत प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची गरजच काय? राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याची मनसेची ही नीती म्हणजे दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीने आज केली.

शिवसेना व भाजप या विरोधी पक्षांवर टीका करताना राज यांची मनसे ही राज्यात विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे, याचा राज ठाकरे यांना विसर पडला असावा. प्रमुख विरोधी पक्षांना विरोधकांची प्रभावी भूमिका पार पाडता येत नसेल तर राज ठाकरे यांचे प्रकरणे बाहेर काढण्यासाठी हात कुणी बांधलेत. त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढावीत. अण्णा हजारे यांची वाट कशाला बघावी? असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या विरोधात अण्णांना पुढे करीत "हम कपडे संभालते हैं' अशी भूमिका घेतल्याने राज ठाकरे यांचा वैचारिक गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होते. त्यांना दोन्ही दगडांवर पाय ठेवून राजकारण करायचे आहे काय, अशी शंका घेतल्यास वावगे ठरणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे.
राज्यात नवनिर्माणची हाक देत स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या राज ठाकरे यांना अजूनही आपण सराकारच्या विरोधात आहोत की शिवसेना-भाजपच्या विरोधात आहोत ही भूमिका ठरविता आलेली नाही, याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आश्‍चर्य व्यक्‍त करीत आहेत.

राज यांच्याकडे राज्यातील कार्यकर्त्यांची फळी आहे. विधानसभेत त्यांचे आमदार आहेत. एवढेच नव्हे, तर माहितीच्या अधिकाराचा कायदा वापरण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी या सर्व आयुधांचा वापर करून राष्ट्रवादीला आव्हान द्यावे, पण अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चे हसू करून घेऊ नये. अण्णांनी काय करावे, हे सांगण्यापेक्षा राज ठाकरे राष्ट्रवादीच्या विरोधात काय करू शकतात ते स्पष्ट करावे. अण्णांना पुढे करून त्यांनी अण्णांची टिंगल करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला आमदार आव्हाड यांनी लगावला आहे; तर विरोधी पक्षाला पोकळ ढगांची उपमा देणाऱ्या राज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करताना ढगात गोळ्या मारू नयेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते मदन बाफना यांनी केली आहे.

अण्णा, लोकपाल राहू दे; महाराष्ट्राकडे पाहा - राज

अण्णा, लोकपाल राहू दे; महाराष्ट्राकडे पाहा - राज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, July 03, 2011 AT 01:15 AM (IST)
  
नाशिक - ""उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. मग तेथील लोकांना इतर राज्यांत का जावे लागते? महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना घरे द्या, अशी मागणी मायावतींनी केली होती. येथे मराठी माणसाला घर मिळत नाही, तेथे त्यांना घरे मागण्याची त्यांच्यात हिंमत कोठून येते? महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. विरोधकांचे ढग बरसत नसल्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकायला काढलाय. त्यामुळे भ्रष्ट राजकारण्यांच्या विरोधात अण्णा, बाबा पुढे येत आहेत,'' अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली, तर "अण्णा, लोकपाल राहू दे; महाराष्ट्राकडे लक्ष द्या. महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकारण्यांच्या फायली बाहेर काढा. असे केले तर मनसे तुमच्या पाठीशी उभी करतो,' असेही ते म्हणाले.

येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी आमदार वसंतराव गिते, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, आमदार उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, शिशिर शिंदे, हेमंत गोडसे, मंगेश सांगळे, सुधाकर चव्हाण, विनय येडेकर, रीटा गुप्ता, शिरीष पारकर, अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक रमेश धोंगडे, सुजाता डेरे, यतीन वाघ, अशोक मुर्तडक, शीला भागवत, रंजना जोशी आदी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, ""बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे वाढत आहेत. त्यामुळे आता मुंबईनंतर पुणे आणि नाशिकला बकालपणा यायला लागला आहे. त्यातच भ्रष्ट नेत्यांमुळे आणि सुस्त विरोधकांमुळे शहराचे नियोजन कोलमडले आहे. बाहेरून आलेल्यांबद्दल बोलतो, मराठीच बोला म्हणतो, म्हणजे भावनेला हात घालतो, अशी टीका माझ्यावर केली जाते. पण येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांचा वाढलेला बकालपणा व मराठीचा मुद्दा हा भावनेचा मुद्दा नाही, तर आता अस्तित्वाचा मुद्दा झाला आहे. शहरात उभ्या राहणाऱ्या टाउनशिप कोणत्याही नियोजनाशिवाय उभ्या राहत असतील व तेथे फ्लॅट घेणाऱ्याला पाणी मिळाले नाही, तर हा भावनेचा मुद्दा होतो का?, याचा विचार महापालिकेने, नगरसेवकांनी करायला नको का?''

""शहरांना सुविधा पुरविताना ग्रामीण भागाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तेथील शेतकरी आत्महत्या करतो. त्यांच्या मुलांना शहरात नोकऱ्या मिळत नाहीत, याकडे कोण लक्ष देणार? धरणे कशासाठी बांधली जातात? पाण्याचे वाटप आणि नियोजन करताना आपण कशाला प्राधान्य देतो, याचा विचार कोण करणार? शहरांचा विस्तार कसाही वाढतो आहे. त्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज वाढत असताना नवीन धरणांचा विचार होतो का? शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी उद्योग आणि पिण्याच्या पाण्याकडे वळाल्यावर शेतकऱ्याने काय करायचे, याचा विचार आता व्हायला हवा. धरणाच्या अवतीभवती उभ्या राहत असलेल्या टाउनशिप कोणाची स्वप्ननगरी असेल, पण धरणात अतिक्रमण करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? देशाच्या व राज्याच्या संपत्तीचे सुरू असलेले खासगीकरण धोकादायक असून, आपल्या मराठी माणसाच्या जमिनीवर तो उपरा होत आहे,'' असे ते म्हणाले

भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या "पीडब्ल्यूडी'मधील ठेके कोणाला द्यायचे हे आधीच ठरलेले असते. त्यामुळे कामचुकार आणि भ्रष्ट कंत्राटदारांना मनसेच्या भाषेतच रट्टे दिले पाहिजेत, तरच ते जाग्यावर येतील, असे श्री. ठाकरे म्हणाले. ""मराठी माणूसच हिंदी बोलत असेल तर हिंदी भाषिकाला महाराष्ट्र त्याचाच वाटणार. त्यामुळे आपण मराठीत बोलले पाहिजे. भाषेच्या मुद्याची भिंत उभारली तरच परराज्यातील लोंढे थांबतील,'' असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना नितीन भोसले यांनी, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महापालिकेतील युतीची सत्ता उलथून लावण्याचे आवाहन केले. मेळावा यशस्वितेसाठी प्रकाश दायमा, समीर शेटे, अनिल वाघ, मोहन मोरे, संजय गायकवाड आदींनी प्रयत्न केले. प्रकाश दायमा यांनी सूत्रसंचालन केले.

नव्या संघर्षाची "ठिणगी'
"राजकारण्यांनी संपत्ती कमवावी, पण मराठी माणसाला ओरबाडून नको. राज्य विकायला काढले असले, तरी ते आम्ही विकू देणार नाही. आताच हात उचलला नाही तर नंतर काही खरे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हाकेच्या प्रतीक्षेत राहावे. हाक मारल्यावर रस्त्यारस्त्यांवर मनसेचे मोहोळ दिसले पाहिजे. पुन्हा संघर्षाची तयारी ठेवा, तर महाराष्ट्र वाचविता येईल,' असे सांगताना राज ठाकरे यांच्या देहबोलीने नव्या संघर्षाची ठिणगी टाकली. मेळाव्यानंतर आता राज ठाकरे कोणता मुद्दा घेऊन "मनसेचे मोहोळ' उठविणार आहेत याविषयी कार्यकर्त्यांत चर्चा आणि उत्सुकता होती, तर हे मोहोळ पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून काढणार, अशा चर्चेचे मोहोळ सभागृहात उठले होते.

पालिका जिंकायचीच!
हा मेळावा फक्त मेळावा नाही, तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व आगामी पालिका निवडणुकांची तयारी असल्याचे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितल्यावर कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. आगामी निवडणुकांत "मनसे'चाच झेंडा पालिकेवर दिसला पाहिजे, असा निर्धारच मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. नाशिक महापालिका काबीज करण्याचा निश्‍चय आमदार वसंतराव गिते यांनी व्यक्त केला. इतर सर्व आमदारांच्या भाषणातही पालिका निवडणुका व पालिकेतील भ्रष्टाचारावर भर होता. पालिका नव्हे, तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून मनसे तळागाळापर्यंत जाईल व यश मिळवील, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

"मनसे'त भेसळ नाही : आमदार शिंदे
मनसेच्या यशात कुठलीही भेसळ नाही. राज ठाकरे यांचे विचार व कार्यकर्त्यांच्या खणखणीत नाण्यावर गेल्या पाच वर्षांत मनसेने यश मिळविले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेने झेंड्यात रंग भरलेले नाहीत. मनसेचा रंग कायमचा आहे. इतर पक्षांप्रमाणे "इथ जमलं नाही म्हणून तिथं जायचं,' असे प्रकार करणारे आता भगव्याजवळ निळा झेंडा घेऊन गेलेत. पण मनसेत निळा रंग कायमचा आहे; निवडणुकांपुरता नाही, असा टोला आमदार शिशिर शिंदे यांनी लगावला.