गुरुवार, 20 फ़रवरी 2014

टोल घेणाऱ्यांची 'हजेरी' न घेताच राज गेले निघून!

मुंबई- टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्याला धडा शिकविण्यासाठी खुद्द राज ठाकरे खारीगावच्या टोल नाक्‍यावर येणार आहेत, अशी अफवा पसरली आणि ठाण्यात सगळेच बोंबलत फिरू लागले. प्रसारमाध्यमांची धावपळ उडाली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. राज खरोखरच आले; पण ते आपल्या 9 क्रमांकाच्या वातानुकूलित कारमधून नाशिकच्या दिशेने टोल न भरताच निघून गेले.

ही अफवा पेरणारे तोंडही तिथेच कुठे तरी "आ' वासून पाहत राहिले असावे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी धुमशान घालण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले.

लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नवे टोल धोरण जाहीर करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज यांना दिले आहे. धोरण जाहीर होईपर्यंत टोल न भरण्याचे आवाहन राज्यातील वाहनचालकांना राज यांनी केले आहे. त्यामुळे एका वाहनचालकाने ठाण्यातील खारीगाव नाक्‍यावर टोल भरण्यास बाणेदारपणे नकार दिला.

राज यांचे नाव घेतल्यावरही त्याच्याकडून टोल घेण्यात आला. यामुळे तो डिवचला गेला. त्याने हळूच वाऱ्यावर एक अफवा सोडून दिली- राज यांना ही घटना समजली आहे. टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनी राजविषयी अनुद्‌गार काढलेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दस्तरखुद्द राज आज खारीगाव टोल नाक्‍यावर येणार आहेत.

आधी दबक्‍या आवाजात याबाबत चर्चा सुरू झाली. नंतर कर्णोपकर्णी झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांना नवा जोम चढला. कामधाम सोडून सगळे नाक्‍यावर जमले. काही पत्रकारही धावले. याची खातरजमा करण्यासाठी मनसेच्या एका नेत्याशी "सकाळ'ने संपर्क साधल्यानंतर यात तथ्य नसल्याचे समजले.

कार्यकर्ते नाक्‍यावर जमले होते. बराच वेळ वाट पाहिल्यावर अखेर राजसाहेबांची कार आली. कारचा 9 नंबर पाहिल्यावर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले; पण कार आली आणि गेलीही. टोल न भरताच गेली. जल्लोष करणारे कार्यकर्ते "आ' वासून पाहतच राहिले. नाशिक येथील "गोदा पार्क'च्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करण्यासाठी राज खारीगाव टोल नाक्‍यावरून भरधाव निघून गेले.

कार येताच काही कार्यकर्त्यांनी मग टोल नाक्‍यावर "खळ्ळखट्ट्याक'चा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. काही दगड फेकले गेले; पण पोलिसांनी राजची कार निघून जाताच लाठ्या सरसावल्या. दोन-चार जणांना याचा प्रसाद मिळताच कार्यकर्ते पांगले. साहेब का थांबले नाहीत, हे त्यांनाही कळले नाही आणि कार्यकर्ते का जमलेत हे राजसाहेबांनाही कळले नाही. याआधी जबरदस्तीने ज्याच्याकडून टोल घेतला गेला आणि ज्याने ही अफवा पसरवली, त्याने पाहिले की साहेबांकडून टोल घेतला गेलाच नाही! किमान साहेबांनी टोल भरला नाही, याच समाधानात त्यानेही घरची वाट धरली.