शुक्रवार, 6 मई 2016

'मोदी भक्तांनो राज ठाकरेंबाबत काय म्हणता'

मुंबई - "मोदी भक्तांनो राज ठाकरेंबाबत काय म्हणणे आहे?‘ असे म्हणत कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

वेगळ्या विदर्भाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 2013 मध्ये वेगळ्या विदर्भाची जनमत चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेली छायाचित्रे राज यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर पुराव्यासह सादर करत ‘विदर्भ राज्यासाठी मतदान करणाऱ्या अशा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का?‘ असा प्रश्‍न उपस्थित केला होता. तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईतील हुतात्मा चौकाची सजावट केली नसल्याचेही निदर्शनास आणून देत "भाजप सरकारपेक्षा कॉंग्रेसचे सरकार चांगले होते‘ असे वक्तव्य केले होते.

या पार्श्‍वभूमीमवर दिग्विजयसिंह यांनी ट्‌विटरद्वारे "मोदी भक्तांनो राज ठाकरेंबाबत काय म्हणणे आहे?‘ असे म्हणत एक छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्रात "आज मोदींचे मित्र म्हणत आहेत की भाजपपेक्षा कॉंग्रेस चांगले होते. उद्या संपूर्ण देश पुन्हा एकदा म्हणेल कॉंग्रेसपेक्षा चांगले कोणतेही सरकार नाही‘ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.