शनिवार, 30 सितंबर 2017

मुंबईत बुलेट ट्रेनची वीटही रचू देणार नाही : राज ठाकरे Full Video

मुंबई : 'जगायचं कसं हा प्रश्‍न लोकांसमोर पडला आहे आणि तुम्ही त्यांना योगा करायला सांगताय.. स्वच्छता करायला सांगताय.. कॉंग्रेस गेले आणि भाजप आले.. देशात फरक काय पडला? गेल्या साडेतीन वर्षांत फक्त नोटांचा रंग बदलला. असलेल्या गोष्टी सुधारण्याऐवजी आम्ही काहीतरी नवीन गोष्टी आणतोय. मेट्रोमुळे मुंबईची आणखी वाट लागली आहे. आता मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. बुलेट ट्रेन हवीच असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्येच ती फिरवावी.. यासंदर्भात जबदरस्ती करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सरकारला इशारा दिला.
मुंबईत एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि प्रशासनाची ढिलाई याविरोधात येत्या 5 ऑक्‍टोबर रोजी मनसे चर्चगेटला मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व राज ठाकरे करणार आहेत. 'या मोर्चात सर्व मुंबईकर आणि ठाणेकरांनी सहभागी व्हावे. या मोर्चांचे परिणाम होत असतात. हा गर्दीचा विषय नाही; राग व्यक्त करण्याचा आहे', असे आवाहन राज यांनी केले.

राज ठाकरे म्हणाले.. 
  • काल घटनास्थळी मुद्दाम गेलो नाही. कारण तिथे जाऊन आपल्या यंत्रणेवर ताण देण्याची इच्छा नव्हती. पोलिस, फायरब्रिगेड, डॉक्‍टर त्यांची जबाबदारी पार पाडत असतात. पण तिथे मीडिया असते म्हणून सगळे पुढारी, मंत्री घटनास्थळी जातात. मदतकार्य सुरू असताना चिंतेचा आव आणून तिथे जाण्यात उपयोग नसतो. 
  • गेली दहा-पंधरा वर्षे याच एका एल्फिन्स्टन पुलाबद्दल भांडत आहेत; पण काहीही झालं नाही. 
  • आपल्या शहरांमध्ये इतक्‍या सरकारी संस्था काम करतात आणि सगळ्या संस्था आपापली जबाबदारी झटकत आहेत. कुणीही उत्तर द्यायला तयार नाही. 
  • कसलं 'मुंबई स्पिरीट'? रोज सकाळी उठून ऑफिसला जावंच लागतं.. त्याला पर्याय नाही. 
  • शहरांवर बाहेरचे लोंढे येऊन आदळणे थांबत नाहीत, तोपर्यंत अशा घटनांवर उपाय नाहीत. मुंबई, ठाणे, पुणे ही शहरे आचके देत आहेत. इथे पायाभूत सुविधाच नाहीत. 
  • रेल्वे स्थानकांची परिस्थिती सुधारण्यासाठी यंत्रणा नाही आणि आपण बुलेट ट्रेन आणायला चाललो आहोत. 
  • आपल्या देशात बाहेरचे दहशतवादी हवेच कशाला? आपणच आपली इतकी माणसे मारत असतो..

मंगलवार, 26 सितंबर 2017

सोशल मिडीयाच अस्त्र भाजपवर बुमरँग झालयं: राज ठाकरे

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर, नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला 'जुमला' होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत, असे राज यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज म्हणाले, ''तुम्ही केलेल्या नोटबंदीने अर्थव्यवस्था डबघाईला गेली, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाईने कळस गाठलाय आणि एवढं होऊन देखील लोकांनी तुम्हाला जाब विचारायचा नाही? पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत? आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटिसा धाडणार? पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो 'ट्रोल्सचं' काय? फोटोशॉपचा वापर करून नव्हत्याच, होतं केलंत. तुम्हाला विरोध करणाऱ्या पत्रकारांबद्दल, विचारवंतां बद्दल भारतीय जनता पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडियाकरवी इतकं गलिच्छ लिहिलं गेलं की ते वाचून मरू दे तो सोशल मीडिया असं वाटावं. तेंव्हा नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला? दुसऱ्या राजकीय पक्षांची,त्यांच्या नेत्यांची थट्टा करताना तुम्हाला आनंद मिळत होता पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार?''
स्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकार बाईंनी लिहिलेल्या I am a Troll पुस्तकांत भारतीय जनता पक्षाची आयटी आणि सोशल मीडिया टीम कसं काम करते याची पूर्ण माहिती आहे. या भस्मासुरांना तुम्ही पोसलंत, त्यांच्या बरोबर पंतप्रधान सेल्फी घेतात, त्यांना ट्विटरवर फॉलो करतात याचा अर्थ अराजक पसरावणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. आणि तुमच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत बसवताय हा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी connectrajthackeray@gmail.com या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा,तुमचं नाव,पत्ता,पोलीस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा. पुढे पाहू काय करायचं ते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नाही तरी कोणाही सामान्य माणसाला जरी अशी नोटीस आली तरी मला कळवा. अजून एक बाब, मी पहिल्यापासून पोलिसांच्या पाठीशी ठाम उभा होतो, आहे आणि राहणार. माझी पोलिस बांधवाना विनंती आहे की तुम्ही सरकारच्या दडपणाखाली असल्या गोष्टी करू नका, सरकार बदलत राहतात, सरकारच्या सांगण्यावरून असल्या चुकीच्या गोष्टी करू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.