बुधवार, 8 जनवरी 2014

मोदींनी संपूर्ण देशाचा विचार करावा - राज

गुरुवार, 9 जानेवारी 2014 - 12:09 PM IST 
नाशिक - ''भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामाचा मला आदरच आहे. परंतू त्यांनी आता गुजरातबाहेर पडून संपूर्ण देशाचा विचार करावा,'' असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (मनसे) राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये विकासकामांच्या आढाव्यासाठी आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ''मला वाटतेय की, भाजपने मोदींची पंतप्रधानपदासाठी घोषणा केल्यानंतर त्यांनी लगेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. पंतप्रधान हा देशाचा असावा, राज्याचा नाही. त्यांनी पूर्ण देशाकडे लक्ष देण्याची गरज असून, एका राज्यापुरते राहू नये. मुंबईत सभा घेऊन तुम्ही गुजराती बांधव आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी बोलता. त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल का बोलत नाही.''

आम आदमी पक्षाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, की काँग्रेसला दिल्लीत कामे न केल्यानेच फटका बसला. दिल्लीतल बदलांचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात 'आप'ची गरज नसून, येथे आम्ही आहोत. महाराष्ट्रात मनसेच बाप आहे. महाराष्ट्र आजही सर्वार्थाने पहिल्या स्थानावर आहे. राज्याचा प्रगतीचा आलेख उंचवायला हवा. वेळ निघून गेल्यानंतर निर्णय घेणे व्यर्थ आहे. यापुढे राज्यांतील विविध भागात बैठका घेणार आहे. नाशिकमधील विकासकामांबाबत मला पाच वर्षांनंतर विचारावे.
महाराष्ट्रात 'आप'चे आहे काय?

'देशाला बदलाची गरज आहे. मात्र महाराष्ट्रात 'आप'चे काय आहे. त्यांचा नेता कोण आहे, असा सवाल करून राज म्हणाले, 'सध्या देशात जे आप, आप चालू आहे, ते मी महाराष्ट्रात गेली सहा वर्षे बोलतोय. पण राज्य बदलण्यासाठी सत्ता हवी. मला सत्ता द्या मी महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवतो. हा माझा निर्धार आजही कायम आहे. इथे 'आप'ची गरज नाही.'

मोदींनी शिवरायांच्या पुतळ्याबद्दलही बोलावे!

मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या कामाबद्दल मला आदर आहे. पण त्यांनी स्वत:ला मर्यादित ठेवू नये. त्यांनी गुजरातमधून बाहेर पडून देशाचा विचार करावा. महाराष्ट्रात त्यांनी पटेलांच्या पुतळ्याबद्दल न बोलता शिवरायांच्या पुतळ्याबद्दल बोलायला हवे,' असेही राज म्हणाले. 'सभांना होणाऱ्या गर्दीचे म्हणाल तर ती माझ्याही सभांना होते,' असा टोलाही राज यांनी हाणला.

महाराष्ट्र 'नंबर वन' पण...

मुंबईतील भाषणात मोदींनी महाराष्ट्र व गुजरातच्या केलेल्या तुलनेबद्दल राज यांनी असहमती दर्शवली. 'महाराष्ट्र हा आजही प्रत्येक आघाडीवर गुजरातच्या पुढे आहे. पण इथे सध्या सुरू असलेल्या कारभाराला लोक विटले आहेत. त्या तुलनेत गुजरातमधील कारभार चांगला आहे. महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यांत जाताहेत ही चिंतेचीच बाब आहे. त्याची चिंता या राज्यकर्त्यांना नको का, असा संताप राज यांनी व्यक्त केला.

नाशिकबद्दल पाच वर्षांनी विचारा!

नाशिकच्या विकासाबद्दल विचारले असता राज यांनी पुन्हा एकदा गोलमाल उत्तर दिले. 'नाशिकमध्ये मला पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे काम करण्यात किती अडचणी येतात हे सर्वांना माहीतच आहे,' असे 'रडगाणे' राज यांनी लावले. सत्ता मला पाच वर्षांसाठी मिळाली आहे. तेवढे दिवस जाऊ द्या, मग मला विचारा,' असे सांगून राज यांनी हा प्रश्न टोलवला.