सोमवार, 23 दिसंबर 2013

अमिताभ- राज यांचा पुन्हा 'याराना'

मुंबई - उत्तर प्रदेशमधील गंगेवरही आमचे प्रेम असल्याचा दाखला देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आपला कोणताही वाद राहिला नसल्याचे जाहीर करून "झाले गेले "गंगे'ला मिळाले' असा जाहीर निर्वाळा देऊन बच्चन कुटुंबीयांबरोबर सुरू असलेल्या वादाला आज पूर्णविराम दिला.

विकासाच्या मुद्‌द्‌यावर विशेष यश मिळत नसल्याने मराठीच्या विषयावरून राज ठाकरे यांनी आक्रमक आंदोलन सुरू केल्याच्या काळात अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशची जाहिरात केली होती. तसेच, या राज्यात शाळाही सुरू केली होती. त्यावेळी राज यांनी त्यांच्यावर टीका करून अशी कामे करावयाची असल्यास यूपीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. अखेर अमिताभ यांनी माफी मागून हा विषय संपविला होता. या पार्श्‍वभूमीवर राज या सर्व वादावर कोणती भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता होती; पण त्यांनी षण्मुखानंद सभागृहात मनसेच्या चित्रपट सेनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून वादावर पडदा टाकला.

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्यावर देशभरातील लोक प्रांतापलीकडे जाऊन प्रेम करतात. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर हिंदीवरील प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अमिताभ असल्याची स्तुती राज यांनी या वेळी केली.

अमिताभ यांनी मराठीतून भाषणाला सुरवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले, ""स्टारडम हे क्षणिक असते. सत्तर- ऐंशीच्या दशकातील एक गोष्ट. त्यावेळी मी गाडी घेऊन निघालो होतो. तेव्हा चाळिशी- पन्नाशीतील एका सुपरस्टारला बसस्टॉपवर उभे असलेले पाहिले. त्यांनी फाटके कपडे परिधान केलेले होते. त्यांना पाहिल्यानंतर मी माझी गाडी थांबविली आणि त्यांना तुम्हाला कोठे सोडू असे विचारले; परंतु त्यांनी त्याकरिता नकार दिला. ते म्हणाले, मला प्रेक्षकांनी जेवढे प्रेम केले तेवढ्याचा मी धनी झालो. आता या परिस्थितीला मलाच तोंड द्यायचे आहे. त्यांनी माझ्याकडून मदत नाकारली. त्याच वेळी स्टारडम किती क्षणिक आहे याची प्रचिती मला आली.''

सचिन पिळगावकर यांनीदेखील महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले.