रविवार, 12 अगस्त 2018

'साठ वर्षातील सिंचनाचा पैसा गेला कुठे'

पुणे- गेल्या साठ वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला आहे, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी यांनी अभिनेता अमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुकही केले.
गेल्या साठ वर्षात जर सिंचनाचा पैसा व्यवस्थित कामाला लागला असता तर गावे केव्हाच जलयुक्त झाली असती असेही राज यांनी म्हटले आहे. जे सर्व सामान्य लोकांना प्रश्न पडतात तेच मलाही पडतात. काहीवेगळे प्रश्न पडत नाहीत. पाटबंधारे खात्यात पैसा मुरला नसता तर आज गावे पाणीदार झाली असती, अशी टीका राज यांनी केली. पानी फाऊंडेशनला जे काम केले आहे ते सरकारने केले नाही. ते सरकारने केले असते तर आज पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी असती. पक्ष, धर्म आणि जातीच्या पलिकडे पानी आहे, यामुळे अमिर खान यांचे काम मोठे आहे. अमीर खान कोणताच पुरस्कार स्विकारत नाही. पण त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी तो अवश्य स्विकारावा, अशी विनंतीही राज यांनी अमिर खानला केली.
पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता अमीर खान, किरण राव, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्यासोबतच अनेक मान्यवर उपस्थित होते.