शुक्रवार, 20 जनवरी 2017

घसरलेले इंजिन रुळावर आणण्याचे आव्हान

अचूक राजकीय टायमिंग साधण्याची हातोटी असणारे राज ठाकरे आणि त्यांची मनसे यंदाच्या महापालिका रणधुमाळीत अजून स्वत:चाच अंदाज घेत असल्याचे चित्र आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची बदललेली राजकीय समीकरणे पाहता, उगाच सर्वत्र फटकेबाजी करण्यापेक्षा निवडक ठिकाणी पक्षाची ताकद लावावी आणि यश पदरात पाडून घ्यावे, अशी रणनीती मनसेने आखली आहे...

आधी लोकसभा, मग विधानसभा आणि त्यापाठोपाठच्या सर्वच निवडणुकांमध्ये मनसेला मोठा फटका बसला. अडीच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मनसेचे घसरलेले इंजिन अद्याप रुळावर आलेले नाही. पक्षातील सद्यस्थिती पाहता, नजीकच्या काळात ते रुळावर येण्याची चिन्हे दिसत नाहीत. यंदा सर्वच ठिकाणी अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असला तरी मुंबई महापालिका निवडणुकीत "दादरचा किल्ला' राखण्यासाठी मनसेने विशेष मोहीम आखली आहे. मराठीबहुल दादर-माहीममध्ये गेल्या पालिका निवडणुकीत मनसेला भरघोस यश मिळाले होते. यंदाही या परिसरातून जास्त नगरसेवक निवडून आणण्याठी मनसेने प्रभादेवीत "वॉर रूम' सुरू केली आहे. शिवसेनेकडून खेचून आणलेल्या या बालेकिल्ल्यावर यंदाच्या निवडणुकीतही मनसेचे वर्चस्व असावे, अशी अध्यक्ष राज ठाकरेंची इच्छा आहे. पण प्रकाश पाटणकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रवेश केल्याने हा गड राखण्याचे मोठे आव्हान आहे. मुंबईप्रमाणेच नाशिक महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली असून मनसेला अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसेने सुरुवातीला निवडणूक लढविणार नसल्याची भाषा केली. नरेंद्र मोदी आणि भाजपला न मागितलेला एकतर्फी पाठिंबा दिला. शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी त्यांच्याविरोधात उमेदवार उभे केले. या गोंधळामुळे मतदार मनसेपासून दुरावला. विधानसभेतील दारुण पराभवानंतर, मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाण्यातील निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी पक्षापासून फारकत घेतली आहे.
निम्म्या नगरसेवकांची सोडचिठ्ठी 
मुंबईतील 28 पैकी निम्मे नगरसेवक आता पक्षासोबत नाहीत. काहींनी स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला, तर काहींनी भाजपचा रस्ता धरला आहे. जे काही बोटावर मोजण्याइतके नगरसेवक मुंबईत शिल्लक आहेत, त्यातील अनेक जण राजकीय पर्यायाच्या शोधात असल्याचे चित्र आहे. अशा वेळी वॉर रूममधून सोशल मीडियाद्वारे मनसे उमेदवारांचा "हायटेक प्रचार' करणार आहे. सोशल मीडियातील तज्ज्ञ मंडळींच्या मदतीने उमेदवारांची माहिती वॉर्डातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. व्हॉट्‌सऍप, ट्विटर, फेसबुक आदी माध्यमातून नवीन स्लोगन्स तयार केली जाणार असून ती "व्हायरल' करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.