गुरुवार, 9 अक्तूबर 2014

वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ - राज ठाकरे

मुंबई - वेळप्रसंगी आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ, असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात कोणता पक्ष कुणासोबत आघाडी करेल, याबाबत आतापासून चर्चा सुरू झाली आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुती तुटल्याच्या दिवशी राज ठाकरे आजारी असल्याने रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारणा केली होती. तब्येतीची विचारपूस केली त्यात गैर काय, अशा शब्दांत उद्धव यांनी त्यांच्यातील संभाषणाची कबुलीही दिली होती. तसेच उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी "कृष्णकुंज‘वर जाऊन राज यांची भेट घेतल्याची चर्चा होती. आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना राज आणि उद्धव यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष केल्याने शिवसेना-मनसे एकत्र येणार का, या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच राज यांनी वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ, असे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंगलवार, 7 अक्तूबर 2014

...मोदी देश कधी चालविणार ?

डोंबिवली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात सगळीकडे जाहीर प्रचार सभा घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत, तर ते देश कधी चालविणार ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.

येथील डीएनसी मैदानावर मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका येतील. त्यानंतर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचाही प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी फिरणार आहेत का ? कारण भाजपकडे महाराष्ट्रात एकही चेहरा असलेला नेता नाही. याचा दाखला देण्यासाठी ठाकरे यांनी मोदी यांच्याच विधानाचा आधार घेतला. त्यांनी सांगितले की, मुंडे असते, तर मला प्रचारासाठी येण्याची गरज भासली नसती. यावरून त्यांनी राज्यातील भाजप नेत्याची लायकीच काढली आहे. मोदींनी कितीही सभा घेतल्या, तरी मला काही फरक पडत नाही. भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार आयात केले आहेत. त्यांच्या नावाची जंत्रीच ठाकरे यांनी वाचून दाखविली. त्यामुळे मोदी हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. ज्या लोकांनी राज्याच्या विकासावर वरवंटा फिरविला. त्याच लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठी मोदी त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. हा भाजपचा प्रचार नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाच प्रचार आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. राज यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांची नक्कल करून सभेत एकच हशा पिकविला. खडसे विधानसभेत सहा तास बोलतात. विधानसभा ही काय प्रवचन देण्याची जागा आहे का ? त्यांची जागा आस्था चॅनेलवर आहे, असा सल्लाही राज यांनी खडसे यांना दिला आहे.

सोमवार, 6 अक्तूबर 2014

नरेंद्र मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान?

"मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले आहेत, त्यांची मी जाहीर प्रशंसा यापूर्वी केली आहे. मात्र, ते अद्याप गुजरातमध्येच रमले आहेत. मला वाटले पंतप्रधान झाल्यावर ते बदलले असतील; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला. या वेळी राज यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा तीव्र करीत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही हल्ला केला. 

मुंबईतील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांची घाटकोपर येथे सभा झाली, या वेळी ते बोलत होते. राज म्हणाले की, मोदींनी राज्यातील भाजप नेत्यांची लायकी काढली आहे. "मुंढे असते तर मला महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती,‘ असे मोदी यांनी बीड येथील सभेत विधान केले होते. तो धागा पकडत राज म्हणाले, की स्वतःची ताकद नसतानाही स्वबळाच्या बेटक्‍या भाजप फुगवत आहे. भाजपला स्वतःचे उमेदवार नाहीत, सगळे बाहेरून आयात केलेले आहेत. 

या वेळी राज यांनी भाजपने कोणत्या पक्षांचे उमेदवार आयात केले याची यादी वाचून दाखवली. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.