रविवार, 3 मार्च 2013

राज ठाकरेंना "पुणे बंदी' नाही

राज ठाकरेंना "पुणे बंदी' नाही
 

-
Monday, March 04, 2013 AT 04:00 AM (IST)
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात येऊ न देण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा व खासदार वंदना चव्हाण यांनी रविवारी जाहीर केले. "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ठाकरे येत्या गुरुवारी (ता. 7) पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी एक दिवसाच्या मुक्कामासाठी येणार आहेत. राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी, "राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन दाखवावे,' असे आव्हान दिले होते. त्यास ठाकरे यांनी जालना येथील सभेत, "पुण्यात येतो, अडवून दाखवा,' असे प्रतिआव्हान दिले. या पार्श्‍वभूमीवर, पुणेकरांना कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने याबाबतचा निर्णय मागे घेतल्याने तणाव निवळण्यास मदत होणार आहे.

चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, "राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन व बेभानपणे केलेल्या टीकेमुळे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी, "राज ठाकरे यांना पुण्यात येऊ देणार नाही,' अशी भूमिका जाहीर केली होती. मात्र, पवारसाहेब व पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पक्षाचे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ठाकरे यांच्या या भडकावू वृत्तीला अत्यंत संयमाने सामोरे जातील. प्रत्येक नागरिकाला भारतात कोठेही जाण्याचा व विचार व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्याचा आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदर करतील,' असे नमूद केले आहे.
काही मंडळी गेल्या काही दिवसांपासून जनतेच्या मनात विष पेरण्याचे काम करीत आहेत. 21 व्या शतकात युवकांना योग्य दिशा दाखविण्याऐवजी घरात घुसून तोडफोड करून रक्तपात करा, अशी प्रक्षोभक भाषा करीत आहेत. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. या झुंडशाहीचा आम्ही निषेध करतो, असेही चव्हाण यांनी सांगितले.
...
राजकीय पोळी भाजणार नाही
"राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याची आमची प्रवृत्ती नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडविण्याचे प्रयत्न काही जण जाणीवपूर्वक करीत आहेत. त्याला बळी न पडता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या विधायक कामासाठी आपली ताकद लावतील,' असे चव्हाण यांनी नमूद केले.