मंगलवार, 15 दिसंबर 2015

'दिलवाले'वर बहिष्काराबाबत भूमिका अधिकृत नाही - राज

मुंबई - ‘दिलवाले‘ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले होते. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेगळी भूमिका मांडत चित्रपटावर "बहिष्कार टाकणे ही मनसेची अधिकृत भूमिका नसल्याचे‘, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले.
android-slow? click here

राजकीय पक्षांची भूमिका हीच त्यांच्या पोटशाखा असणाऱ्या संघटनांची अधिकृत भूमिका मानली जाते. मनसेमध्ये मात्र मुख्य पक्षाची भूमिका आणि पक्षाची पोटशाखा असणाऱ्या चित्रपट सेनेच्या भूमिकेत अंतर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चित्रपट सेनेने "दिलवाले‘ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्यानंतर राज ठाकरे यांनी ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे आज जाहीर करीत चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनाच अडचणीत आणले आहे. "चित्रपट सेनेचे म्हणणे योग्य असले तरी चित्रपटावर बहिष्कार टाकणे ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही‘, असे मनसेने अधिकृतरीत्या कळवले आहे.

अभिनेता शाहरुख खान याने चेन्नईतील पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली, मात्र राज्यातील दुष्काळग्रस्तांना त्याने अद्याप मदत केली नसल्याने संतापलेल्या चित्रपट सेनेने शाहरुखच्या आगामी "दिलवाले‘ चित्रपटाला विरोध करीत हा चित्रपट पाहण्यापेक्षा नाना पाटेकर यांच्या दुष्काळग्रस्तांना मदत करणाऱ्या "नाम‘ या संस्थेला चित्रपटाच्या तिकिटीचे पैसे देऊन या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले नसले तरी "महाराष्ट्रात यायचं, मोठं व्हायचं, नाव कमवायचं आणि मग महाराष्ट्राला विसरायचं हे योग्य नाही. ही जाण त्यांनी ठेवली पाहिजे‘ असा टोला मात्र शाहरुख खानला लगावला आहे.

गुरुवार, 10 दिसंबर 2015

राज ठाकरेंची दुटप्पी भूमिका

नाशिक - "माझ्या हातात सत्ता द्या. अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो...‘ अशी गर्जना करणाऱ्या राज ठाकरे यांना राज्यात सत्ता मिळाली नाही; पण ज्या नाशिकने विश्‍वासाने सत्ता दिली, तेथील कारभाराचे धिंडवडे मात्र निघाले आहेत. शहराच्या विकासाच्या आडून मते मिळवण्यासाठी कॉर्पोरेट जगताचा आधार घ्यावा लागला. त्याचवेळी स्मार्ट सिटीमधील "एसपीव्ही‘ला विरोध करत त्यांनी या जगताच्या मात्र विरोधात सूर आळवला आहे.

Slow Android Phone? Click Here
राज यांची ही दुटप्पी कार्यपद्धती राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. राज यांच्यावर नाशिकच्या विकासासाठी बड्या उद्योग समूहांना निमंत्रित करण्याची वेळ आली. राज यांच्या स्वप्नातील गोदापार्क साकारण्यासाठी रिलायन्स जिओ फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. टाटा उद्योग समूहाच्या प्रयत्नातून बॉटनिकल गार्डनची निर्मिती केली जात आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्जीवित करण्यासाठी एल. ऍण्ड टी. पासून रामोजी फिल्म सिटीपर्यंत अनेक कंपन्यांचे अधिकारी दर महिन्याला स्मारकाची वारी करताहेत. पाथर्डी फाटा ते आडगाव नाका दरम्यानच्या उड्डाण पुलाखालील जागेत झाडे लावण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला निमंत्रण देण्यात आले आहे. सिडकोतील संभाजी स्टेडियम, तारांगण एवढेच काय उद्यानेदेखील खासगीकरणातून विकसित केली जात आहेत.
नाशिकच्या विकासासाठी भांडवलदारांच्या जिवावर उभारले जाणारे प्रकल्प राज यांना चालतात; मग "भांडवलदारांसाठी स्मार्ट सिटीचे प्रयोजन‘ हा आरोप कुठल्या आधारे ते करताहेत, असा थेट प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

बुधवार, 9 दिसंबर 2015

केंद्र सरकार राजकीय खेळी करतेय- राज ठाकरे

मुंबई- स्मार्ट सिटी योजनेवरून केंद्र सरकार राजकीय खेळी करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केला.

ठाकरे म्हणाले, ‘प्रत्येकाला आपले शहर उत्तम झालेले आवडते. परंतु, स्मार्ट सिटी ही योजना पूर्णपणे फसवी आहे. या योजनेबाबत राज्यांनाच अनेक शंका आहेत. महानगरपालिकेत केंद्र सरकारची लुडबूड कशासाठी. शहरे स्मार्ट करणे हे केंद्र व राज्यांचे कर्तव्य आहे. स्मार्ट सिटी योजनेला अत्यल्प निधी देणार आणि महापालिकांकडून जी चांगली कामे होतील त्याचे श्रेय केंद्र सरकार घेणार स्मार्ट सिटी योजनेसाठी वेगळी कंपनी कशाला हवी. शहरात चांगल्या योजना राबवण्यासाठी केंद्र व राज्याने पुढाकार घ्यावा, त्याचे राजकारण करू नये.‘

‘नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्राला प्राप्तिकर देणार नसल्याचे सांगितले होते, मग आता राज्यांकडून मागणी का करत आहेत? निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीसाठी पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. चांगल्या गोष्टींना माझा पाठिंबा असेल, मी विनाकारण राजकारण करणारा माणूस नाही,‘ असेही ठाकरे म्हणाले.

स्वतंत्र विदर्भाची मागणी चुकीची- ठाकरे
राज्याचे महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे स्वंतत्र विदर्भाचा केलेली मागणी अत्यंत चुकीची आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे पाहिले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य एक राहिले पाहिजे.

रविवार, 8 नवंबर 2015

आता महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबबावेत- राज

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल मी नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांचे अभिनंदन करतो. आता त्यांनी महाराष्ट्रात येणारे बिहारी नागरिकांचे लोंढे थांबवावेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले, की प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय आहे. आता त्यांनी बिहारचा विकास इतक्या गतीने करावा, की महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत. तसेच विकासाची दिशा अशी असावी की बिहारमधून बाहेर गेलेले बिहारीही परत बिहारकडे यावेत. विजयाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.
Slow Android Phone? Click Here

बिहार विधानसभा निवडणूकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी 150 पेक्षा अधिक धावांवर आघाडीवर आहे. तर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) 80 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर बिहारमधील जनतेने पुन्हा विश्वास ठेवला आहे आणि पुढील मुख्यमंत्री नितीश कुमारच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

No Need to worry about Clearing Browser History  

सोमवार, 2 नवंबर 2015

कल्याणमध्ये फसला मनसेचा 'नाशिक पॅटर्न'

नाशिक : ‘गेल्या पावणे चार वर्षापासून सत्ता असलेल्या मनसेने नाशिकमध्ये काय केले,‘ याचे प्रेझेंटेशन सादर करीत राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता देण्याचे आवाहन करीत जाहीर सभेतून टाळ्या मिळविल्या असल्या तरी त्या टाळ्यांचे रुपांतर मतांमध्ये करण्यात अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत अठ्ठावीस डब्यांचे इंजिन यंदाच्या निवडणुकीत सहा डब्यांवर आल्याने मनसेचा नाशिक पॅटर्न अयशस्वी झाला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत विकासाचे ढोल वाजविताना राज यांना नवा पॅटर्न आणावा लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप एकमेकांवर कुरघोडी करीत असताना मनसेने प्रचारात ‘विकास‘ हा मुद्दा लावून धरला होता. विकासाचे मुद्दे स्पष्ट करताना ‘नाशिकमध्ये काय केले,‘ याचे प्रेझेंटेशन राज ठाकरे यांनी केले होते. गोदापार्क, बोटोनिकल गार्डन, ट्रॅफीक सिग्नल पार्क या हक्काच्या मुद्यांबरोबरचं सिंहस्थाच्या निमित्ताने पायाभुत सुविधांचा झालेला विकास, महापालिकेने विकसित केलेले ऍम्प्लिफिकेशन, भव्य रस्त्यांच्या कामांचेही श्रेय घेत राज ठाकरे यांनी कल्याणमधील नागरिकांच्या टाळ्या मिळविल्या होत्या. ‘कल्याणमध्येही मला सत्ता द्या.. मग बघा कसा विकास करतो‘ असा शब्द त्यांनी दिला होता. परंतु, ठाकरे यांच्या ‘नाशिक पॅटर्न‘ला कल्याणकरांनी दाद दिली नाही. येथे मनसेचे अवघे सहा नगरसेवक निवडून आल्याने सत्ता तर दूरच, विरोधी पक्ष म्हणूनही फारसे स्थान मिळविता आलेले नाही. पुढील वर्षभरात मुंबई आणि नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे ढोल वाजण्यास सुरवात होणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षाला मिळालेल्या अल्प प्रतिसादातून नाशिकमध्ये काय होईल, या विचाराने पक्षाच्या नेत्यांना आताच धडकी भरली आहे.

थापा मारून एकवेळ सत्ता आणता येते; पण हा प्रयोग वारंवार यशस्वी होत नाही, हे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीतून लोकांनी मनसेला दाखवून दिले आहे. ‘नाशिक पॅटर्न‘मधून थापा मारण्याचा प्रयोग फसला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये काय होईल, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. - अजय बोरस्ते, शिवसेना

गुरुवार, 29 अक्तूबर 2015

केडीएमसीच्या नवनिर्माणाची संधी द्या - राज ठाकरे

कल्याण - नाशिकमध्ये करून दाखवले आता कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्माण करण्याची संधी द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता. 28) येथे केले. साई चौकातील सभेत नाशिकच्या विकासाचा लेखाजोखा त्यांनी मांडला.
नाशिकचा विकास कुंभमेळ्यामुळे झाला. मनसेचे त्यात कर्तृत्व नाही, अशी टीका विरोधक करत असल्याने राज यांनी महापालिकेने शहराचा कसा विकास केला याचे सादरीकरण केले. तेथे जे नव्हते ते करून दाखवले. इथे मात्र होत्याचे नव्हते केले, अशी टीका त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली. नाशिक महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर 11 महिने आयुक्त नव्हते किंवा काहीकाळ सक्षम आयुक्त नव्हते. त्यामुळे 33 महिन्यांत मनसेने काय काय केले याची झलक सादर करतोय, असे ठाकरे म्हणाले. शहरातील रस्ते, गोदा नदीवरील पूल आणि गोदापार्क अशा अनेक प्रकल्पांचे फोटो त्यांनी दाखवले. ही सर्व कामे राज्यात भाजपचे सरकार येण्यापूर्वी सुरू केल्याचे त्यांनी तारीखवार सांगितले.

सामान्य नागरिकांचा विचार करून महापालिकेने केलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. तेथे 33 महिन्यांत जे केले ते इथे करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या कामांसाठी अनेक उद्योजक पुढे आले. त्यांनी सढळ निधी दिला. राज्यकर्त्याची इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर असे हात पुढे येतात; मात्र कल्याण-डोंबिवलीमध्ये 20 वर्षे सत्ता हातात असतानाही या शहरात काहीच करता न आल्याने आज पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने मते मागावी लागत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
विधानसभेतील पराभवाने खचलो नसल्याचे सांगताना असे पराभव पाहतच लहानाचा मोठा झालोय, असे त्यांनी सांगितले. संघाच्या स्थापनेनंतर पक्षाला बहुमत मिळण्यासाठी किती वर्ष वाट पाहावी लागली ते पाहा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मला लोकांशी प्रतारणा करायची नाही. एकदा विश्‍वास ठेवून पाहा तुम्ही विचार केला नसेल इतकी चांगली कामे करून दाखवीन, असे आश्‍वासन त्यांनी नागरिकांना दिले

शनिवार, 24 अक्तूबर 2015

'ध'चा 'मा' टाळण्यासाठी 'राज ठाकरे लाइव्ह'

मुंबई - परप्रांतीयांच्या विरोधात बोलताना राष्ट्रीयस्तरावर राज ठाकरे यांची प्रतिमा वादग्रस्त ठरली आहे. या पार्श्वभूमीवर राज यांच्या भाषणांची विशेषतः इंग्रजी आणि हिंदी माध्यमांकडून होणारी तोडफोड टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवीन फंडा अमलात आणला आहे. यासाठी राज ठाकरे यांची भाषणे यूट्यूबवर लाइव्ह होण्यास सुरवात झाली असून, याचा लाभ प्रत्यक्ष सभेला उपस्थित न राहणाऱ्यांनाही होणार आहे. तसेच सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणारा भाजप एकमेव पक्ष असल्याचे भाजपचे नेते सांगत असले तरी सर्वप्रथम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या बाबतीत मनसेचे एक पाऊल पुढेच असल्याचा दावा मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी केला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. यामुळे त्यांच्यावर अनेकदा माध्यमांतून आणि राजकीयस्तरावरून टीका होत असल्याने माझ्या भाषणांचा अर्थ आणि माध्यमांनी केलेली मोडतोड यावर राज यांनी अनेकदा नाराजी व्यक्‍त केली होती. विशेषतः हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमे आपली प्रतिमा परप्रांतीयांच्या विरोधात निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हाच "ध चा मा‘ टाळण्यासाठी मनसेने राज ठाकरे यांची भाषणे यूट्यूबवर लाइव्ह करण्यास सुरवात केली आहे. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल गुरुवारी डोंबिवली येथे झालेले पहिले भाषण यूट्यूबवर लाइव्ह करण्यात आले. त्यामुळे कोणतेही विधान, त्याची पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांचा बोलण्याचा हेतू याबाबत प्रसारमाध्यमांसह जनतेला उकल होण्यास मदत होणार असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

मंगलवार, 22 सितंबर 2015

राज-उद्धव यांचे दुर्मिळ फोटो प्रसिद्ध

महाराष्ट्रातील राजकारणात प्रतिस्पर्धी असणाऱ्या राज ठाकरे व उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंचे दुर्मिळ फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) अधिकृत फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरून राज, उद्धव यांच्यासह जयदेव ठाकरे यांचेही फोटो समोर आणण्यात आले आहेत.

राज ठाकरे यांच्या आई-वडिलांच्या लग्नात उभे असलेले छोटे जयदेव ठाकरे


उद्धव, राज व जयदेव ठाकरे निवांत क्षणी



मंगलवार, 15 सितंबर 2015

नाशिकच्या विकासासाठी झटतो आहे - राज ठाकरे

नाशिक - "नाशिकमध्ये माझी इंचभरही जमीन नाही. महापालिकेत मनसेची सत्ता आहे म्हणूनच कायम नाशिकला येतो असेही नाही. तर शहरे सुंदर ठेवणे माझी आवड आहे. याच भावनेतून मी नाशिकच्या विकासासाठी झटतो आहे,‘‘ असे उद्‌गार महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) काढले. राज यांनी यावेळी शहरात होणाऱ्या विकासकामांसाठी नगरसेवकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे आवाहन करत पक्षास निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले. कालिदास कलामंदिरमध्ये महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या "स्मार्ट नाशिक ऍप्स‘चे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले.

"इतर महापालिकांमध्ये किती कामे होतात, कशी व कधी मंजूर होतात हे कुणाला कळतही नाही,‘ असा टोला लगावत नाशिक महापालिकेने विकसित केलेले हे ऍप्स पारदर्शक असल्याचे गौरवोदगार ठाकरे यांनी काढले. ऍप्लिकेशनमध्ये धन्यवाद देण्याचीही सोय करण्याची अपेक्षा व्यक्त करताना शहराच्या विकासावर त्यांनी भाष्य केले. ""शहरात चांगली कामे झाली आहे हे आता नागरिकांना दिसत आहे. इतर राज्यात कुठेही पुरविल्या जाणाया सुविधांच्या तुलनेत नाशिकमध्ये चांगली सोय झाल्याची कबुली साधुंनीही दिली आहे. मी नाशिक मध्ये काय केले हे मला पाच वर्षांनी विचारा,‘‘ असे ठाकरे म्हणाले. गोदापार्क, जीववैविध्य उद्यान, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क या कामांचा उल्लेख करताना भविष्यातील योजना त्यांनी मांडल्या. "सुरक्षेच्या नावाखाली रस्त्यात बांबू घालून ठेवण्यात आले आहेत,‘ असे सांगत शेवटच्या पर्वणीनंतर ते बांबू तातडीने हलवून शहराचे सौंदर्य पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, डॉ. प्रदीप पवार, उपाध्यक्ष ऍड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते.

नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, अपक्ष गटनेते संजय चव्हाण, सभागृह नेते सलीम शेख, शहर अभियंता सुनील खुने, अधीक्षक अभियंता यु.बी. पवार, अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, अनिल चव्हाण, बी.यु. मोरे, गौतम पगारे या अधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावून ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला. आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा खास उल्लेख करून "महाराष्ट्राची सत्ता एकदा मला द्या आणि त्याचबरोबर गेडाम यांच्यासारखे दहा अधिकारी हाताखाली घेऊन महाराष्ट्र कसा ठीक होत नाही ते बघतो,‘ असे उद्‌गार त्यांनी काढताच सभागृहाने टाळ्यांतून दाद दिली.

शुक्रवार, 4 सितंबर 2015

दौरे कसले करताय, काय पाहिजे ते पुरवा- राज

दुष्काळ दौऱ्यावरून राज यांची सरकारवर टीका

नाशिक- पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह निघालेल्या मंत्र्यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. शेतकऱ्यांना आज पाणी, गुरांना चाऱ्याची गरज असताना दुष्काळाचे दौरे कसले करता या शब्दात त्यांनी टीका केली.

विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही ते घसरले. पंधरा वर्ष सत्ता असताना जलसिंचनाचे अपूर्ण ठेवलेल्या प्रकल्पांमुळे आज ही वेळ आली आहे त्यामुळे राष्ट्रवादीला दुष्काळी दौरे काढण्याचा व त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. सत्ता येऊन वर्ष उलटत आले तरीही सरकारला मांड ठोकता आली नसल्याचा पुनरुच्चार करून ठाकरे यांनी सरकारची अकार्यक्षमता मांडली.

तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वनौषधी उद्यानाच्या भुमिपूजनावेळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाने तोंड वर काढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी व गुरांना चारा पुरविण्याची गरज असताना मुख्यमंत्री व मंत्री दौरे करताय हे चांगले नाही शेतकऱ्यांना नेमके काय हवंय याचा विचार व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचे तळे उभारून मदतीचा हात दिला होता. त्याच धर्तीवर काम करण्याची गरज आहे. एकीकडे मला सत्ता द्यायची नाही व दुसरीकडे मनसेची भूमिका काय असे उत्तर देत दुष्काळाच्या विषयाला विनोदी शैलीत श्री. ठाकरे यांनी बगल दिली.

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही

कोठे प्रयोग झाले का?
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन वनमंत्री पंतगराव कदम यांच्याकडे नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचा विषय काढला होता, परंतु त्यावेळी या आधी असे प्रयोग कुठे झाला आहेत का? असे उत्तर त्यांच्याकडून मिळाल्याने या एका वाक्‍यातच प्रकल्प सरकारी कामकाजात का अडकतात लक्षात येते. विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ मान्यता दिल्याने नाशिककरांना गिफ्ट मिळाली आहे, असे सांगून त्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बुधवार, 19 अगस्त 2015

शर्मिला ठाकरेंना कुत्र्याचा चावा; चेहऱ्यावर 65 टाके

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना घरातील पाळीव कुत्रा चेहऱ्याला चावल्याची घटना घडली आहे. चेहऱ्यावर 65 टाके घालण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी आज (बुधवार) दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिला ठाकरे यांना घरातील पाळीव कुत्र्याने चावा घेतला आहे. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चेहऱ्यावर तब्बल 65 टाके घालण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज‘ या निवासस्थानी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेच्या काही वेळ आधी ही घटना घडली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरे यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती.

दरम्यान, राज ठाकरे यांचे घरातील पाळीव कुत्र्यांवर प्रेम आहे. त्यांच्या घरामध्ये अनेक पाळीव कुत्रे आहेत. यामध्ये ‘पग‘, ‘जर्मन शेफर्ड‘ जातीचे कुत्रे आहेत. ‘बॉण्ड‘ नावाच्या कुत्र्याने शर्मिला ठाकरे यांना चावा घेतल्याचे समजते

मंगलवार, 18 अगस्त 2015

मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने पुरंदरेंसंबंधी वाद- राज

मुंबई- पुरस्कारावरून करण्यात येणार वाद हा भाजपमधील काही मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रचलेले कुभांड आहे. मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने हा वाद निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी केला.
Slow Android Phone? Click Here
भारतीय जनता पक्षामध्ये छुपी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी भाजपचे मंत्री का पुढे आले नाहीत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण‘ देऊ नका असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले होते. त्यावर राज ठाकरे म्हणाले, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर कसे वागावे हे नेमाडे यांनी विंदा करंदीकर, कुसुमाग्रज यांच्याकडून शिकावे. पुरंदरेंना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे काही साहित्यिकांचा पोटशूळ उठला आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात असे वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

...तर राज्यात तांडव करीन
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रमाचे आयोजन अगदी साध्या पद्धतीने करण्यात आले आहे. पुरंदरे यांना संरक्षण पुरेसे संरक्षण देण्यात आलेले नाही हे लक्षात आणून दिले असता राज ठाकरे म्हणाले ‘हे राज्य सरकारचे काम आहे. ते मूग गिळून गप्प बसले आहेत. पण बाबासाहेबांना कुणी हात लावला तर याद राखा

मंगलवार, 11 अगस्त 2015

सरकारकडून चांगल्या रनऐवजी चिकी रन- राज

ठाणे - पूर्वीच्या सरकारमध्येही भ्रष्टाचार होता; तर आताही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सरकारकडून चांगल्या रनऐवजी चिकी रन काढल्या जात आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लगावला.

राज्याचे वाटोळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा. मी सत्तेसाठी नाही; तर आपली सत्ता रस्त्यावर आहे, असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले. या परिस्थितीत तुम्ही जनतेसोबत राहा, असे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. मनसेच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये ठाण्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला; मात्र त्या मेळाव्याला राज्यस्तरीय मेळाव्याचे स्वरूप आले. या मेळाव्यातच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्याही जाहीर करण्यात आल्या.

राज्यात आलेल्या उद्योगांमध्ये मराठी मुला-मुलींनाच रोजगार मिळाला पाहिजे, अशी मागणी करीत ठाकरेंनी पुन्हा मराठी कार्ड कायम असल्याचे स्पष्ट केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशालीसारखे राहिले पाहिजे. ज्या ठिकाणी मराठी माणसे आहेत, तेथे त्यांना कार्यकर्त्यांचा आधार वाटला पाहिजे. महाराष्ट्राचे वाटोळे करणाऱ्यांना आपण सत्तेवरून खाली खेचू. त्यात कितीही खटले झाले तरी काळजी करू नका. सत्ता आल्यावर खटले मागे घेऊ, असा कार्यकर्त्यांना सल्ला देत राज ठाकरे यांनी आपली सत्ता रस्त्यावर असल्याचे स्पष्ट केले.

केंद्र व राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. सरकार बदलले तरी बातम्या त्याच आहेत. महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांची आत्महत्या, टोल आदी प्रश्‍नच कायम आहेत. काही बदल झाल्याचे वाटतच नाही. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाचा भार कमी करण्याऐवजी शिक्षणमंत्री वजनकाट्याने दप्तराचे वजन मोजतात. एवढ्या लवकर सरकारचा भंडाफोड होईल असे वाटले नव्हते, अशी टीका ठाकरे यांनी केली. याकूबच्या फाशीच्या वेळी मीडियाकडून चवीने चर्चा केली गेली. याकूबच्या मुलाखती घेतल्या गेल्या; तर छोटा शकील वर्तमानपत्रांना मुलाखती देत आहे. टायगर मेमनने आईला फोन केला, अशी माहिती पोलिसांकडूनच दिली जात आहे.

ओवेसी बंधू भडकावणारी वक्तव्ये करीत आहेत; मात्र त्यांच्यावर एकही केस दाखल नाही. त्यामुळे सरकारी आशीर्वादाने हिंदूंची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारचा दंगली व बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यातून सरकारच्या बाजूने मतदान होऊन सत्ता कायम राहील, असा डाव आखला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. कोकणामध्ये अतिरेकी शिरल्याच्या बातम्या आहेत. अतिरेकी खरे आहेत की निवडणूक झाल्यावर गायब होतील, असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बोगस आधार कार्ड वाटली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यावरील निकालासाठी तब्बल 22 वर्षे लागली; मात्र गणपती व दहीहंडीबाबतचा निर्णय झटपट होतो. 20 फुटांची दहीहंडी करून घरातच फोडायची का, असा सवाल ठाकरे यांनी केला. देशभरात न्यायाधीशांची नियुक्ती झाल्यावर त्यांना मोबाईल, इंटरनेट आणि वर्तमानपत्रांपासून दूर ठेवा. त्यानंतर कायद्याने निर्णय येतील, असे ठाकरे यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर मौनी पंतप्रधान म्हणून टीका केली जात होती; मात्र आता मन की बात ही मौन की बात झाली आहे. देश भयभित झाला असताना पंतप्रधान मोदी यांनी बोलले पाहिजे. मोदी ही देशाची शेवटची आशा आहे. अशा परिस्थितीत ते गुजरातचा जप करीत बसल्यास कसे होणार, असा सवालही त्यांनी केला.
भाजपला घाबरविण्यासाठी शिवसेना-मनसे यांच्यातील युतीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. कोणाशीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट करीत राज ठाकरे यांनी शिवसेनेबरोबरील युतीच्या चर्चेचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारप्रमाणे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करण्याचा भाजप सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा बळी दिला जात आहे. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडूनही खतपाणी घातले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात जाहीर चर्चा व्हायला हवी; मात्र कोणीही चर्चेसाठी पुढे येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर महापुरुषांना जातीची लेबल लावली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सलमानच्या शिक्षेवेळी सलीम खान यांच्याबरोबरील वैयक्तिक संबंधांमुळे आपण त्यांची भेट घेतली, पण आपण सलमानची शिक्षा चुकीची आहे असे म्हटले नव्हते. सलमान खान हा बेअक्कल आहे; तर महेश भट, नसिरुद्दीन शहा आणि राम जेठमलानींसारख्या व्यक्ती याकूबची बाजू घेत होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तहसीलदारांकडून गैरव्यवहार करीत परप्रांतीयांना दाखले दिले जात असल्याचा आरोप करीत रिक्षा परवान्यासाठी एकाच व्यक्तीला तीन दाखले मिळाले असल्याची कागदपत्रे त्यांनी दाखविली.

बदल्यांसाठी 100 कोटी
राज्य सरकारच्या एका विभागात बदल्यांसाठी 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही चांगली व्यक्ती आहे, पण त्यांना काम करू दिले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांचे हात-पाय बांधले आहेत; तर त्यांचा राज्यातील काही नेत्यांकडूनही छळ सुरू आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

मराठी माणसांचा जीव मुठीत
ठाण्यात इमारती पडत असून, महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. या इमारतीतील मराठी माणूस जीव मुठीत घेऊन राहत आहे; तर सगळे जण पैसे कमावण्यासाठी गुंतले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरेंचे बोल...
- उद्धव ठाकरे यांच्याशी मनोमीलनाच्या बातम्या निराधार
- भाजपला घाबरवण्यासाठी शिवसेनेने या बातम्या पेरल्या
- या सरकारला दंगली, बॉंबस्फोट हवे आहेत. त्यातून मते पदरात पडावीत यासाठी हे राजकारण सुरू आहे
- बदल्यांसाठी एका खात्यात 100 कोटी घेतले गेले
- सरकार बदलले तरी परिस्थितीत फरक नाही
- फडणवीस चांगले; पण मोदी-शहा त्यांना काम करू देत नाहीत
- ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद दुर्दैवी; पुरंदरेंच्या नावावर राजकारण खेळताना लाज नाही वाटत
- राष्ट्रवादी नावाचा पक्ष आल्यावर हे प्रकर्षाने सुरू झाले. पवारांनी जातीयवादाला खतपणी घातले
- 55 वर्षांनी कळले, महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे
- तहसीलदारांनी पैसे खाऊन परप्रांतीयांना सर्टिफिकेट दिली. यातील 30 ते 40 टक्के लोक बांगलादेशातून आले. यांनाच मतदानाचा अधिकार मिळणार
- याकूबसाठी मध्यरात्री सुप्रीम कोर्ट कसले उघडता? मीडियीनेही त्याच्या फाशीचा खेळ केला
- सलमान खान बेअक्कल
- ओवेसी बंधू हरामजादे. ही बुरशी. महाराष्ट्रात काही वेडंवाकडं घडवण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे
- न्यायाधीशांचे मोबाईल, नेट, वर्तमानपत्रे, टीव्ही काढून घ्या. त्यांची प्रसिद्धी बंद करा. मग पटापटा निर्णय येतील
- नरेंद्र मोदींची मन की बात नव्हे; तर मौन की बात
- मोदी ही शेवटची आशा. तेच जर असे वागायला लागले तर काय होणार
- इमारती कोसळताहेत, पण पालिकांचे लक्षच नाही
- कितीही नव्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या तरी, तेथे मराठी माणसांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत
- कार्यकर्त्यांनो, अन्याय तेथे लाथ घाला

शनिवार, 27 जून 2015

बसवलेला नव्हे बसलेला मुख्यमंत्री हवा - राज

मालवण - सीआरझेडची भीती केवळ महाराष्ट्रातच आहे. अन्य राज्ये सीआरझेडचा विचार करत नाहीत. त्यामुळे बसविलेला मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही तर यासाठी स्वत: बसलेला मुख्यमंत्री असायला हवा, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे लगावला.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सायंकाळी भरड भागात तालुका मनसेतर्फे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. या वेळी परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख शैलेश भोगले, अमित इंभ्रामपूरकर, नारायण कुबल, गणेश वाईरकर यांच्यासह मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, ‘कोकणचा पर्यटन विकास करण्यासाठी प्रथम येथे अँकर प्रोजेक्‍ट यायला हवेत. जोपर्यत सेव्हन स्टार, फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेल्स होत नाहीत; तोपर्यत येथील पर्यटनाचा विकास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार नाही. येथे येणाऱ्या देशी, विदेशी पर्यटकांची राहण्याची व्यवस्था नसेल तर पर्यटक येथे येणार कसे आणि येथील पर्यटन विकास होणार कसा?‘‘
मुख्यमंत्र्यांनी वायंगणी माळरानावर सी-वर्ल्ड प्रकल्प होणार, असे सांगितले आहे. यावर ते म्हणाले, ‘त्यांनी हा प्रकल्प कधी होणार हे सांगितले नाही. प्रत्यक्षात या प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्‍वासात घेतले गेलेले नाही. कोणत्याही गोष्टीत पारदर्शकता नसेल तर स्थानिक लोकांचा विरोध हा होणारच. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत आपण स्थानिकांच्याच बाजूने राहू. मुख्यमंत्र्यांना येथील पर्यटन विकासाचे कोणतेही सोयरसुतक नाही त्यांचे लक्ष केवळ विदर्भाकडे आहे.‘‘
या भागात पर्यटन विकासात सीआरझेडचा प्रश्‍न भेडसावत आहे, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘सीआरझेडची भीती ही केवळ महाराष्ट्रातच आहे; अन्य राज्ये सीआरझेडला विचारत नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकामे केली आहेत. त्या राज्याचे राज्यकर्ते हे आपल्या माणसांचा विचार करतात. मात्र हे आपल्या राज्यात दिसून येत नाही. बसविलेला मुख्यमंत्री असेल तर तो यावर निर्णय घेऊ शकत नाही तर यासाठी स्वत: बसलेला मुख्यमंत्री हवा.‘‘
पारंपारिक, पर्ससीननेट यांच्यातील वादासंदर्भात ते म्हणाले, ‘हा वाद गेली काही वर्षे सुरू आहे. सरकार बदलेले मात्र, हा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. महाराष्ट्र हे माझे क्षेत्र आहे. मात्र, जोपर्यत राज्य माझ्या हातात येत नाही तोपर्यत मी काही करू शकत नाही. माझ्या ताब्यात राज्य असते तर परराज्यातील पर्ससीननेटधारकांची सागरी हद्दीत घुसण्याची हिंमत झाली नसती.‘

शुक्रवार, 19 जून 2015

बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठीच मेट्रो : राज ठाकरे

मुंबई : मुंबईला मेट्रोची गरज नाही. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठीच हा प्रकल्प राबवला जात आहे. अशा मेट्रोसाठी दादरकरांच्या घरांना हात लावू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित दादर स्थानकासाठी दादरमधील काही इमारतींना मुंबई मेट्रो रेल महामंडळाने नोटिसा पाठवल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत दादरमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या मुद्द्यावर नागरिकांच्या पाठीशी असल्याचे आश्‍वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली.
मेट्रो प्रकल्पाच्या निमित्ताने मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठी मेट्रो आणली जात आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रकल्प पुढे न्यायचे असतील, तर तुम्ही सत्तेत कशाला? शिवसेना सत्तेत की विरोधात, हेच कळत नाही. राज्य सरकारने पुनर्वसनाची हमी दिली असली तरी पुनर्वसन या शब्दावर माझा विश्‍वास नाही. मेट्रोसाठी दादरमधील एकाही घराला हात लावू देणार नाही, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे शिष्टमंडळही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
दादरमधील प्रकल्पबाधितांना सोबतीला घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. या शिष्टमंडळात मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांचा समावेश होता. एकही कुटुंब विस्थापित होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे सांगण्यात आले.

बुधवार, 10 जून 2015

महाराष्ट्राच्या मातीशी जुळवून घ्या : राज ठाकरे

पुणे- "मी काय देश तोडायला आलो नाही. महाराष्ट्रात आहात, तर येथील मातीशी जुळवून घ्या. शीख बांधव जसे एकरूप झाले, तसे एकरूप व्हा. तुम्ही मान द्या, आम्ही मान देऊ,‘ अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी आपली भूमिका मांडली.

निमित्त होते, सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे. त्या वेळी ठाकरे बोलत होते. संत नामदेव देशभर भागवत धर्माचा प्रचार करीत फिरले. त्याच बरोबरच त्यांनी एक धागा जोडण्याचेही काम केले. धागा जोडण्याचे काम एक शिंपीच चांगल्याप्रकारे करू शकतो, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""शीख बांधव आले, ते मातीशी एकरूप झाले. स्वत:चा मतदारसंघ काढण्याच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. इतरांनीही तेच करावे, एवढीच माझी इच्छा आहे. जनसंघ आणि अकाली दलाची जेव्हा युती झाली होती. त्या वेळी पंजाबमध्ये हिंदीला विरोध झाला. पंजाबी हीच आमची भाषा राहील, असे सरकारने जाहीर केले. त्या वेळी जनसंघाने पाठिंबा काढून घेतला, हा इतिहास आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे.‘‘

------------------------------------------------------------------------
भाषणाच्या सुरवातीलाच ठाकरे म्हणाले, "काय योगायोग आहे. पावसाळ्याच्या तोडांवरच महाराष्ट्रात "बादल‘ आले. त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळ आता तरी संपेल, एवढीच इच्छा व्यक्‍त करतो.‘‘ ठाकरे यांच्या कोटीला प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. बादल यांचे कौतुक करताना ठाकरे म्हणाले, "राजकारणात आज इतकी ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्ती राहिली नाही. त्यांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्याची मला संधी मिळाली, ही गोष्ट अभिमानास्पद आहे.‘‘
------------------------------------------------------------------------

गुरुवार, 9 अप्रैल 2015

शोभा डेंना सेनेचा वडापाव, दहीमिसळ

मल्टिप्लेक्समधील मराठी चित्रपटांच्या प्राइम टाइमला विरोध करणाऱ्या स्तंभ लेखिका शोभा डेंना शिवसेनेने आपला अस्सल मराठमोळा 'प्राइम टाइम' दाखवायला सुरूवात केली आहे. डेंच्या घरावर मोर्चा काढत शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. तसंच शिवसेनेने शेभा डेंना संध्याकाळपर्यंत झणझणीत दहमिसळ आणि गरमारम वडापाव खाऊ घालण्याचा इशाराही सेनेने दिला आहे. दरम्यान शिवसेनेने पाठवलेला वडापाव आपल्याला आवडला, असं ट्विट शोभा डे यांनी केलंय.  
बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तुलनेत दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहता यावे, या हेतूने राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो सक्तीचा केला आहे. सरकारच्या या निर्णयावर शोभा डे यांनी विरोध करत ट्विटरवरून टीका केली. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत शोभा डेंना मराठी इंगा दाखवण्याचा पवित्रा घेतला आहे.

शिवसेनेने मुंबईत शोभा डेंच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन सुरू केले आहे. मोर्चामुळे शोभा डेंच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेचं शोभा डे यांनी ट्विट करत स्वागत केलं. आणि मला कुठलिही भीती वाटत नाही. मुंबई पोलिसांचे धन्यावाद, असं शोभा डे ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. शिवसेनेच्या मोर्चानंतर ४ आणखी एक मोर्चा येणार आहे. आणि ते संध्याकाळच्या नाशट्यासाठी काय आणणार याची उत्सुकता आहे, असं ट्विटही डे यांनी दुपारी केलं.

मराठी सिनेमा आणि मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष तुम्हाला आहे तर इथे राहताच कशाला? शोभा डेंचं वक्तव्य महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा अपमान करणारं आहे. बघाच तुम्ही. आम्ही शोभा डेंना आज संध्याकापर्यंत वडापावची चाव चाखवूच, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 

बुधवार, 25 मार्च 2015

मनसेच्या बॅनरवरून ख्रिश्चन संघटना संतप्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) सध्या मुंबईत लावण्यात आलेल्या बॅनर्सवरील व्यंगचित्रावर काही ख्रिश्चन संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मुंबईच्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी मनसेकडून भायखळा, सीएसटी आणि गिरगाव परिसरात हे बॅनर्स लावले आहेत. विकास आराखड्यामुळे मुंबईतील मराठी माणसाची अवस्था कशाप्रकारे केविलवाणी होईल, हे अधोरेखित करणारे व्यंगचित्र या बॅनर्सवर आहे. हे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले असून त्यामध्ये मुंबईतील उंच टॉवर्सना मराठी माणूस टांगलेल्या अवस्थेत दाखविण्यात आला आहे. मात्र, ही प्रतिमा क्रुसावर लटकवलेल्या येशूशी सार्धम्य साधणारी असल्याने काही ख्रिश्चन संघटनांनी मनसे आणि विभागीय आर्चबिशप यांच्याकडे तक्रार केली आहे.
मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी हा आरोप फेटाळून लावत हे व्यंगचित्र ख्रिश्चन धर्मातील कोणत्याही प्रतिमेला डोळ्यासमोर ठेवून रेखाटण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईच्या नवीन विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली तर, मराठी माणसाची होणारी दैना आमच्या पक्षप्रमुखांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून वेगळ्याप्रकारे चितारल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या उत्तराने ख्रिश्चन संघटनांचे समाधान झालेले नाही. या व्यंगचित्रातील माणसाला येशूप्रमाणेच लटकवण्यात आल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

 येशूला क्रुसावर लटकवण्याच्या या प्रसंगाला ख्रिश्चन धर्मात विशेष महत्त्व आहे. विशेषत: थोड्याच दिवसांमध्ये येऊ घातलेल्या गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार अधिक गंभीर आहे. मनसेने फुटकळ प्रसिद्धीसाठी लावलेल्या या बॅनर्समुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया कॅथलिक सभेचे अध्यक्ष गॉर्डन डिसोझा यांनी दिली.

सोमवार, 16 मार्च 2015

‘आरे’ला ‘कारे’ करणारच!- राज

राजकारण्यांच्या दुधाच्या डेअऱ्या चालाव्यात म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीनं 'आरे'ची वाट लावली होती आणि आताच्या सरकारनं आरे कॉलनी बिल्डरांना विकायला काढली आहे. मेट्रो-३ चे कारशेड ही केवळ सुरुवात आहे, पण कुठला वाटा कुणी घ्यायचा हे यांचं ठरलंय. म्हणूनच, जोवर जनतेला विश्वासात घेतलं जात नाही, तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात नाही, तोवर आम्ही 'आरे'ला 'कारे' करणारच, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजपला खडसावलं.


कुलाबा ते सांताक्रूझ मार्गावरील मेट्रो-३ प्रकल्पाचं कारशेड गोरेगावच्या आरे कॉलनीत उभारण्याच्या प्रस्तावावरून भाजप-शिवसेना युतीत चांगलीच जुंपली आहे. प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या २५४ वृक्षांचा बळी देण्यास शिवसेनेनं विरोध केलाय, तर भाजपनं विकासाचा सूर लावलाय. त्यावरून गेल्या महिन्यापासून त्यांच्यात बरेच खटके उडालेत. अशातच, मनसेच्या इंजिनानंही आज थेट कारशेडमध्ये धडक मारली. राज ठाकरे यांनी आरे कॉलनीत जाऊन कारशेडची जागा, तिथली झाडं, पुनर्रोपण करावी लागणारी २ हजार झाडं, आरे कॉलनीतील जैवविविधता याबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या कारशेडला विरोध जाहीर केल्यानं भाजपची अडचणीत भर पडली आहे.

मी पाच-सहा वर्षांपूर्वी जे बोललो होतो, तेच आरे कॉलनीच्या विकास आराखड्यातून दिसतंय. लोकांसाठी काहीतरी करतोय, हे दिसावं म्हणून मेट्रो यार्ड, प्राणीसंग्रहालय, बोटॅनिकल गार्डन या गोष्टी त्यात आहेत. पण त्यासोबतच गृहनिर्माण प्रकल्प, व्यावसायिक वापरासाठी ९० हेक्टर जागा दिली जाणार आहे. हे हाउसिंग प्रोजेक्ट आरे कॉलनीत आले कुठून? याचाच अर्थ, या सरकारनं ही जागा बिल्डर, उद्योगपतींनी विकायला काढली आहे. निवडणुकीत मिळालेल्या आर्थिक पाठिंब्याची परतफेड करण्याचाच हा प्रकार आहे, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आपण प्रगती, विकासाच्या विरोधात नाही, पण सरकारचा उद्देश स्वच्छ नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच 'री' हे सरकार ओढतंय, असंही त्यांनी सुनावलं. मेट्रो-३च्या निधीसाठी जपान सरकारला जे पत्र पाठवलंय, त्यात आरे कॉलनीत वन्यप्राणी नसल्याचं म्हटलंय. हा खोटेपणा कशासाठी?, असा संतप्त सवालही राज यांनी केला. मेट्रोच्या कारशेडसाठी तीन पर्याय होते. हाजी अलीजवळ रेसकोर्सच्या खाली, कलिना कॅम्पसमध्ये आणि तिसरा पर्याय होता आरे कॉलनीचा. मग सगळ्यात शेवटचा पर्याय का निवडला?, गोराईजवळची १५०० एकर जमीन डेव्हलपमेंट झोनमध्ये का आणली?, बीपीटीच्या मोकळ्या जागेवर कारशेड का उभारत नाही?, असे प्रश्नही त्यांनी केले.

Subscribe to Youtube Channel

झोपडपट्ट्या होऊ नयेत म्हणून आरे कॉलनीचा विकास करत असल्याचं मुंबईचे आयुक्त म्हणतात. अरे, पण झोपडपट्ट्या होऊ नयेत, अतिक्रमणं वाढू नयेत, ही जबाबदारी महापालिकेचीच आहे ना? पण यांच्याच संगनमताने अनधिकृत बांधकामं झाली आहेत, असं राज यांनी सुनावलं. गुजरातमध्ये जशी अमूल कंपनी वाचवली, तरी जॉइंट व्हेंचर करून आरेही वाचवता आली असती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

मेट्रो-३ साठी सर्व तांत्रिक बाबी तपासल्या आहेत का, सोइल टेस्टिंग केलंय का, ते कुणी केलंय, आजूबाजूच्या इमारतींना काही धोका नाही ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तज्ज्ञांनी द्यावीत. मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, माझ्या तज्ज्ञांशी समोरासमोर बोला, जनतेला विश्वासात घ्या, तोपर्यंत झाडे पाडण्यास मनसेचा विरोधच राहील, असं राज यांनी ठणकावून सांगितलं. आपल्या आंदोलनाची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत

सोमवार, 9 मार्च 2015

स्वच्छतागृहांसाठी मनसेचा आवाज

मुंबईमध्ये स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, या महिलांच्या मागणीला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बळ दिले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनसेने 'स्वच्छतागृह माझा अधिकार' ही मोहीम सुरू करून दिंडोशी येथील सन्मित्र क्रीडा मैदानामध्ये पन्नास बायोटॉयलेट्सची उभारणी केली.

'राइट टू पी मोहिमे'ने वेळोवेळी केलेल्या सर्व आग्रही मागण्यांची नोंद घेऊन मनसेच्या उपाध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी 'स्वच्छतागृह माझा अधिकार' ही जनमोहीम सुरू केली आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता ही केवळ राजकीय मागणी नसून तो त्यांच्या आरोग्यासाठीही अतिशय गंभीर विषय असल्याचे शालिनी यांनी स्पष्ट केले. 'राइट टू पी' मोहिमेच्या मागणीला बळ देण्यासाठी ही मोहीम पूरक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैना पुढे आली. योग्य नियोजनाअभावी बंद पडलेली, बांधकाम खचलेली, पाणी-वीज या मुलभूत सुविधांअभावी दुरवस्था झालेली, अशी सध्याच्या स्वच्छतागृहांची स्थिती आहे. पे अॅण्ड यूज तत्त्वावर चालवायला दिलेल्या स्वच्छतागृहांच्या ठेकेदारांवरही पालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. स्वच्छतागृहांची झाडाझडती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सरकारला नसली तरीही महिलांना लाज आहे, म्हणूनच केवळ एक दिवसाचा महिला दिन साजरा करण्यापेक्षा महिलांसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता वाढवा, असे मत मांडत या मोहिमेच्या उद्धाटन सोहळ्यावेळी सरकारवर टीका केली.

प्रत्यक्ष कृतीवर भर देताना पश्चिम उपनगरामध्ये साठ बायोटॉयलेट्स उपलब्ध करून दिले आहेत. या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यांमध्ये प्रवासादरम्यान महिलांची होणारी कुंचबणा लक्षात घेता हायवेलगत बायोटॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत.

देवेंद्र 'भाऊं'ना बहिणींचे पत्र

राज्याचा मुख्यमंत्री हा तमाम कष्टकरी, नोकरदार स्त्रियांचा भाऊ असतो, असे म्हणतात. या आपल्या भावाने महिलांची कुंचबणा टाळण्यासाठी बहिणींना स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, असे कळकळीचे आ‍वाहन करणारी पत्रे महिला मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत. त्यासाठी अतिशय कल्पक मजकूर असलेली पोस्टकार्ड्स तयार करण्यात आली आहेत.

सोमवार, 2 मार्च 2015

उद्योग पळविणाऱ्यांना संधी नको- राज ठाकरे

नाशिक- खळ्‌-खट्याक आणि तोडफोडीतून मुद्दे मांडणारा पक्ष अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (ता. 1) वीज कामगारांना उठसूट संपाचे हत्यार उपसू नका आणि महाराष्ट्रातील उद्योग पळविणाऱ्यांना संधी देऊ नका, असा सल्ला दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या अधिवेशनात ठाकरे बोलत होते. या वेळी मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी आमदार ऍड. उत्तमराव ढिकले, वीज कामगार नेते शिरीष सावंत, विद्यार्थी नेते आदित्य शिरोडकर उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, "पोलिस आणि वीज या दोन सेवांमधील कामकाज म्हणजे "थॅंकलेस जॉब‘ आहे. सातत्याने कामाचा ताण वाढत असलेल्या या सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रश्‍न मांडायचे तरी संपही करता येत नाही. वीज कामगारांनो उठसूट संप करू नका. राज्यातील पैसा, पाणी अन्‌ उद्योगही बाहेर वळविला जात आहेत. अशांना संधी देऊ नका. वीज माझा विषय नाही; पण शॉक देणे हा माझा विषय आहे. त्यामुळे वीज कामगारांच्या व्यथा मी समजू शकतो.‘

या अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात आले. त्यात वीज कंपनीतील खासगीकरणाला विरोध करणे, कंपन्यांमधील ठेकेदारी पद्धत बंद करणे, नवीन भरतीत ठेकेदारी कामगारांना प्राधान्य देऊन कायम करणे, वीज कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरतीत राखीव जागा ठेवणे, अनुकंपा वारसांना विनाअट नियुक्त करून घेणे, वीज कंपनीच्या आर्थिक बाबींशी निगडित कामे ठेकेदारांना न देता कर्मचाऱ्यांकडून करणे, पायाभूत आराखड्याची व वीज खरेदी कराराची सखोल माहिती घेऊन चौकशीची मागणी करणे, वीज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभाग क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाकडे वर्ग करण्यास विरोध करणे आदी ठरावांचा समावेश आहे.

Visit my Blog
 Will Love you Foreva

Youtube Channel:
Youtube Channel

शनिवार, 28 फ़रवरी 2015

मोदींनी आणखी सूट शिवले असते - राज ठाकरे

मुंबई - नागरिकांनी टीका केली नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी महागडे सूट शिवले असते, अशी टीका करीत मोदींना फक्त गुजरातबद्दल प्रेम आहे, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाणला. मुंबईतील गोरेगाव येथील मनसेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारताच्या दौऱ्यावर आले असताना पंतप्रधान मोदी यांनी स्वतःचे नाव कोरलेला सूट परिधान केला होता. त्याची किंमत काही लाखांच्या घरात असल्याची चर्चा झाली होती. त्याचा लिलाव करून मिळालेले कोट्यवधी रुपये गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी देण्यात आले आहेत. या प्रकरणावर राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत खरपूस टीका केली. चहा विकणारी व्यक्ती पंतप्रधान व्हावी यासाठी लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मोदींच्या पदरात भरघोस मते टाकली. आता मोदींच्या शाही सुटाची कथा ऐकताना याच नागरिकांच्या मनात काय घालमेल होत असेल, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. चोहोबाजूंनी टीका झाली नसती तर त्यांनी आणखी सूट शिवून त्यांचाही लिलाव केला असता, असा टोलाही त्यांनी लगावला. सुटाच्या लिलावातून गंगा नदी कशी शुद्ध होणार, सूट केवढा आणि गंगा केवढी, असे मिस्कीलपणे राज म्हणाले. सुटाचा लिलावही गुजरातमध्येच का केला, अन्य राज्यात का नाही, असा सवाल करीत ते म्हणाले, यावरून मोदींचे प्रेम फक्‍त गुजरातवर असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री असताना तुम्ही गुजरातचे होतात, आता पंतप्रधान या नात्याने तुम्ही सर्व राज्यांवर समान प्रेम केले पाहिजे, असे राज मोदींना उद्देशून म्हणाले.

निवडणुकीच्या आधी टोलबंदीची आश्‍वासने देणारे शिवसेना-भाजपचे नेते सत्तेवर आल्यावर मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा सवाल राज यांनी केला.

Visit My Blog : Will Love you Forever

बुधवार, 18 फ़रवरी 2015

पुन्हा 'मराठा', संपादक राज ठाकरे

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही आपल्या पक्षाचे मुखपत्र काढणार आहेत. राज यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत याबाबत प्रथमच माहिती दिली असून येत्या काही महिन्यांत राज हे 'संपादक' या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. राज यांच्या नव्या दैनिकाचे नाव 'मराठा' असेल असेही सूत्रांनी सांगितले.

बाळासाहेबांनी शिवसेनेवर होणारे 'हल्ले' परतवून लावण्यासाठी 'मार्मिक' हे व्यंगचित्र साप्ताहिक आणि 'सामना' हे दैनिक काढले. या दोन्ही माध्यमांचा बाळासाहेबांनी अत्यंत कुशलपणे वापर करून शिवसेनेचे रोपटे वाढवले. राज्यात सत्ता असताना आणि नसतानाही बाळासाहेबांसाठी 'सामना' हे प्रभावी अस्त्र ठरले. राज आता तोच कित्ता गिरवण्याच्या तयारीत आहेत. मनसेच्या स्थापनेला ८ वर्ष पूर्ण झाली असून या काळात राज यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या राज यांच्या पक्षाचा विद्यमान विधानसभेत केवळ एकच आमदार आहे. त्यामुळेच पक्षाची नव्याने बांधणी करताना मनसे कार्यकर्त्यांच्या विधायक कामांना ठळक प्रसिद्धी मिळावी, विरोधकांची टीका परतवून लावता यावी, पक्षाची बाजू मांडता यावी, आपला संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवता यावा, या उद्देशाने राज पक्षाचे हक्काचे दैनिक काढण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत.

मराठी राजभाषा दिवसानिमित्त मनसेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यासाठी राज यांनी मंगळवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होता. या बैठकीत त्यांनी पक्षाचे मुखपत्र काढण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. हे दैनिक मराठी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

चार महिन्यांपासून चाचपणी

मनसेच्या या नवीन दैनिकाची चाचपणी राज ठाकरे मागील चार महिन्यांपासून करत आहेत. दैनिक चालविण्यासाठी मोठा व्याप करावा लागत असल्याने संबंधितांच्या गाठीभेटी आणि चर्चा केल्यानंतरच राज हे नवीन वृत्तपत्र काढण्याच्या निर्णयाप्रत आल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली.

मुंबई पालिकेच्या निवडणुकांआधी

राज यांच्या नव्या दैनिकाचे नाव 'मराठा' असणार आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांच्याकडून या नावाचे कायदेशीर हक्क आधीच राज यांनी मिळवलेले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. हे दैनिक मुंबई महापालिकेच्या निवडणुकांआधी सुरू होईल, मात्र नेमका मुहूर्त अद्याप सांगता येणार नाही, असे सूत्रांनी पुढे स्पष्ट केले.

शुक्रवार, 30 जनवरी 2015

लाट येते...आणि जातेही!

मनसेच्या शिडात राज ठाकरेंनी भरले वारे

मुंबई

लहानपणापासूनच पराभव पाहत आल्याने मला पराभव नवा नाही. लाट येते आणि जाते. मात्र, आपण डगमगायचे नसते. बाहेर वादळ असले की आपण शांत रहायचे आणि बाहेर वातावरण शांत असले की आपण वादळासारखे बनायचे, असे आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आदेश शुक्रवारी दिले.

मनसेच्या मुंबईतील शाखाध्यक्षापासून ते विभागाध्यक्ष तसेच सरचिटणीस यांच्यासाठी रवींद्र नाट्यमंदिर येथे पक्षाच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी राज बोलत होते. शिवसेनाप्रमुखांना विविध लोक भेटायला यायचे, तेव्हा मी आणि उद्धव त्यांना जवळून पाहायचो. अनेक पराभव आम्ही पाहिले, असे राज यांनी सांगितले.

विभागात कशाप्रकारची कामे करायला हवीत, प्रत्येकाकडे कामांचे कसे वाटप व्हायला पाहिजे, याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना आमिर खान यांच्या थ्री इडियट चित्रपटातील एक क्षण दाखविण्यात आला. त्याचाच धागा पकडून अनेक तरुणांना शाखाध्यक्ष व्हायचे आहे, त्यामुळे तुम्ही चांगले काम केले नाहीत तर ते मागे उभे आहेत, हे ध्यानात ठेवा असे सांगत राज यांनी शाखाध्यक्षांचे कान टोचले.

मान मिळत नसल्याबाबत महिलांकडून होणाऱ्या तक्रारींचा यावेळी राज यांनी समाचार घेतला. मान हा सन्मानाने मिळवायचा असतो आणि अपमान गिळायचा असतो. अपमान पचवायला शिका आणि मान हा सन्मानाने मिळवायला शिका, असे राज म्हणाले. नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत प्रत्यक्षात माझी भूमिका नीट समजून घेतली गेली नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी देशाचे असायला हवेत गुजरातचे नाही, असे आपले म्हणणे होते. मात्र तुम्ही ते समजून घेतले नाहीत आणि लोकापर्यंत तशापद्धतीने पोहोचवले नाहीत, असेही राज यावेळी म्हणाले.

शाखेचे खाते उघडा

प्रत्येक शाखाध्य‌क्षाने बँकेत खाते उघडून पक्षासाठी गोळा केलेली वर्गणी त्यात जमा करावी. एक कोषाध्यक्ष नेमून त्याचा हिशोब ठेवावा आणि या पैशांमधून विभागात कार्यक्रम घ्यावेत, असा सल्ला राज यांनी यावेळी दिला.

डायलॉगने अस्वस्थता

यावेळी काही वक्त्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यातील एका वक्त्याने 'बंदूक की गोली पर जो राज करता है वह बंदूक की गोलीसेही मरता है और मीडिया पर जो राज करता है, उसे मीडियाही खत्म करता है', अशा आशयाचा डायलॉग मारल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.