रविवार, 30 जुलाई 2017

राज ठाकरे यांचे बाबासाहेब पुरंदरेवरचे भाषण विडिओ




मुंबई : राजकारणात श्रीमंत झाले ते बाबासाहेबांवर बोटे उगारत आहेत. इतिहासाला जातीपातीची लेबले लावली जात आहेत. बाबासाहेबांना या वयातही राज्यात पोलिस संरक्षणात फिरावे लागते, हे दुर्दैवी आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले, की यापुढे बाबासाहेबांना पोलिस संरक्षणात फिरण्याची आवश्‍यकता नाही. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 95 वा वाढदिवस सन्मान सोहळा रविवारी रात्री विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. या वेळी सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित होते. स्वरगंधार व जीवनगाणी यांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतरत्न सचिन तेंडलकर यांच्या हस्ते बाबासाहेबांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बाबासाहेब म्हणाले की, वडील हे माझे सर्वांत जवळचे मित्र होते. ते प्रेमाने, मायेने बोलत. त्यांनी माझ्या गुणांवर फुंकर घालण्याचे काम केले. त्यामुळे माझ्या सर्व यशाचे श्रेय त्यांना देईन. आपल्या मुलांवर प्रेम करा. आपला वारसा त्यांच्याकडे द्या. कोणाचा द्वेष, तिरस्कार करू नका. आपण सर्व एक आहोत. मला विरोधी पक्ष हा शब्द आवडत नाही. प्रत्येकाने माझे सरकार आहे, हा भाव ठेवला पाहिजे. मला पुस्तक प्रकाशनासाठी मुंबईत येऊन कोथिंबीर विकावी लागली, याचे वाईट वाटते.